स्वकमाईचे तेज
स्वकमाईचे तेज
दरवर्षी काहीतरी संकल्प करून तो पूर्ण करणे हा नेम होता श्रद्धाचा..... पण मोठे झाल्यावर ती जबाबदारीच्या आेझ्याखाली अडकून जाते आणि तिला तिच्या स्वतःचा अस्तित्वाचा विसरच पडून जातो.. संसारात रमून जाताना प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत घडणारी अशी ही कथा आहे... अश्याच एका स्त्रीचा श्रद्धाचा प्रवास आपण या कथेतून पाहणार आहोत...
श्रद्धा लहान असल्यापासूनच अतिशय हुशार, चुणचुणीत होती.. कळायला लागल्यास सतत स्वताला कशात ना कशात गुंतून ठेवायची.. तीच्या वयाच्या मुलींपेक्षा फारच वेगळी होती श्रद्धा.. त्यामुळे तिला मैत्रिणी फार कमी.. या उलट तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या म्हणजे मुले, मुली नाही बरं का.. अगदी आजी- आजोबा यांच्या वयाच्या व्यक्तींसोबत ती खूप छान रमायची... आजीला फुले आणून दे, आजोबांना बाहेरून औषध आणून दे... आईला भाजी आणून दे, वाचनालयातून बाबांची पुस्तके बदलून आणणे.. अशी बारीक सारीक कामे ती करायची... त्या बदल्यात तिला कॊणी खाऊ आणायला, चोकोलेट्स आणायला पैसे दिले की ती ते पैसे तीच्या गुल्लक मध्ये टाकायची... तसेच तिच्या वाढदिवसाला घरातल्या कॊणी पैसे दिले अन् म्हणाले, तुझ्या मैत्रिणींसोबत पार्टी कर, तरी ती तसे न करता नेहमी त्या पैशांमधून गरजू मुलांना शाळेत उपयोगी येतिल अशा वस्तू द्यायची.. तिच्या आजीला फार कौतुक होते आपल्या नातीचे.. ती श्रद्धाच्या आईला म्हणायची, अगं माझ्या नातीच्या चेहर्यावर दुसऱ्याला मदत केल्यावर जो समाधानाचा आनंद दिसतो ना तो वेगळाच असतो... आजीच्या सर्व मैत्रिणी देखील श्रद्धाचे खूप कौतुक करायच्या.. त्यामुळे श्रद्धाच्या मैत्रिणी मात्र नेहमीच तिचा राग करायच्या तिला आजी बाई म्हणून चिडवायच्या.. तसेच काही नातेवाईक सुद्धा तिला हसायचे..
तिची आई शर्मिला खूप काळजी करायची कसे होणार या मुलीचे? अहो आई, जमाना बदलत चाललाय, असे साधे राहून कसे होईल हो? पण, आजी म्हणजेच शामल ताई म्हणायच्या काही काळजी करू नको लाखात एक आपली पोरं.. जरा साधी आहे, पण बाहेरच्या जगात वावरली कि होईल शहाणी...
तिच्या बरोबरच्या मुली सुट्टीत नुसत्या फिरायच्या पण हि प्रत्येक सुट्टीत कसला ना कसला क्लास करायची.. कॊणी विचारलं की म्हणायची मी संकल्प केलाय, एकही सुट्टी वाया घालवणार नाही.. शर्मिला ऐकतच बसली, एवढ्या लहान मुलीच्या तोंडात संकल्प वगैरे सारखे शब्द काय बोलावे हिला... आईला कौतुक करावे? कि करू नये काहीच कळत नव्हते.. आजीला मात्र खूपच कौतुक... आपली नात किती गुणाची आहे.. आजी नजर काढत सारखी बोटं मोडायची...
प्रत्येक सुट्टी मध्ये तिने कसले ना कसले शिक्षण घेतले, दागिने बनवणे, जरदोसी, पैंटिंग, केक बेकींग, वारली पैंट .. हळू हळू ती मोठी होत होती.. विचाराने मोठी तर ती होतीच पण आता वयात येत होती.. तिच्या वरून सर्वच मैत्रिणींना घरात बोल ऐकावे लागत असत त्यामुळे तिच्यावर जळणार्यांची संख्या जास्त होती.. पण श्रद्धा मात्र नेहमीच सगळ्यांशी चांगलीच वागायची.. पण एकही जवळची मैत्रिण नाही हि खंत तिला कायम होती... तिचे गुण सगळ्यांनाच माहीती होते त्यामुळे आजीच्या एका मैत्रीणीने तिला आपली नात सुन करून घेतली..
सासरी सुद्धा सगळ्यांची आवडती झाली ती, लगेचच आलेले बाळंतपण त्यामुळे थोडी गोंधळून गेली ती... तिच्या वयाच्या मुली मात्र अजूनही स्वच्छंद आयुष्य जगत होत्या... म्हणुन तिला वाईट वाटायचं.. पण मग् तिला आजीचे बोल आठवायचे... लग्न, मुले योग्य वयात झालेले बरे... मग् सारं काही विसरून ती आपल्या संसारात मग्न व्हायची.. एवढी गुंतून गेली की तिच्या मधल्या स्वत्वाचा तिला विसरच पडला... आजी तिला नेहमीं सांगायची, तुझ्या मधल्या कलांचा वापर करत रहा.. संसार हे न संपणार चक्र आहे तें सांभाळून आपण स्वावलंबी व्हायचं..
मधल्या काही वर्षात खूप घडामोडी घडून गेल्या, त्यामुळे परत एकदा ह्या चक्रात ती अड़कुन गेली... दोन्ही बाजूला मोठी त्यामुळे दोन्ही कडच्या जबाबदारी सांभाळताना कसला संकल्प कसले काय? सार मागे पडले.. जगाच्या मागे पडली ती, नवरा मुले सर्वच तिला कमी लेखू लागले त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला.... पण ती तरी काय करणार? एकापाठी एक अशी संकट आली की, संकल्प करणे, घर बसल्या काही करणे तर सोडाच पण तिला स्वतःला सुद्धा वेळ देता येत नव्हता... एका कार्यक्रमात तिच्या एका वर्ग मैत्रिणीने खूपच खिल्ली उडवत विचारलं तिला... काय ग हा अवतार तूझा?? ना जॉब करतेस की काही घरबसल्या उद्योग? तरी स्वताला वेळ देता येतं नाही....कुठे गेली तुझी स्वप्न आणि संकल्प??
तीच्या सासूबाईने ते ऐकताच बोलल्या, अग गेले काही वर्ष ती आमच्यासाठी झटताना तिला तिच्या स्वप्नांचा विसर पडलाय. त्यामुळे आता आम्हीच संकल्प करणार आहोत तिच्या स्वप्नपूर्तीचा..... तिने तिची सर्व कर्तव्य पार पाडलेत आता आमची जबाबदारी आहे..
सासूबाईंचे हे बोलणे ऐकून, तीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली, कुठे तरी हरवत चाललेला आत्मविश्वास तिला परत मिळाला अन् तीच्या स्वप्नांना एक नवीन दिशा मिळाली.
घरी आल्यावर सर्व प्रसंग आठवून, तिला रडायला येत होते.. आजीने दिलेली गुल्लक दिसली तिला... बरीच वर्षे त्या गुल्लक मध्ये काही टाकलेले तिला आठवतच नव्हते.. नेहमीच त्याचा वापर ती गरजू मुलांसाठी करत आली होती.. आजीचे बोल आठवत होते तिला, काहीतरी कर स्वावलंबी हो, अन् आज त्या मैत्रिणीचे बोल ऐकल्यावर तर तिला 'जडे पे नमक छिडका' असेच झाले.. सासूबाईंचा आवाज ऐकल्यावर तर घाई घाई ने ती गुल्लक लपवायला जाताना ती पडून फुटली, त्यात तिला अपेक्षाही नव्हते असे पैसे होते.. आणि आजीची चिठ्ठी होती... त्यामध्ये लिहिले होते, बाळा आता मी तूला जे मी सांगणार आहे, तें नेहमीं लक्षात ठेव...
लहान असताना तू ज्या कला शिकल्या, आणि दुसऱ्यांना जेव्हा जेव्हा मदत केली त्या सर्वानी स्वेच्छेने काही पैसे तीच्या आजी जवळ आणून दिले होते, त्या सर्वांना हिचा स्वभाव माहीती होता म्हणूनच त्यांनी तिच्या आजीला तें पैसे दिले, आणि तिला जेव्हा खरी गरज असेल तेव्हा तिला हे पैसे द्या. असे सांगितलं होते.. आजीने ते पैसे तीच्या गुल्लक मध्ये टाकले, आणि जग सोडून जाताना तिच्याकडून वचन घेतले, जेव्हा माझी कमी तूला जाणवेल तेव्हाच ह्या गुल्लकला हात लाव तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर तूला सहज मिळतील..
स्त्री थकत नाही , हरत नाही ...
हरली , तरी रडत बसत नाही ..,
ती धडपडते, मार्ग शोधते...
स्त्री ...
सतत कार्यमग्न असते...एखाद्या मुंगीसारखी,,सतत कशाचा तरी साठा करत असते...
मुंगीसारखीच,,,शिस्तबद्ध ...आखीव मार्गावरुन चालत राहते,...
स्त्री ..
जगण्यासाठी तिला व्यसनांचा आधार लागत नाही .,,तिच्यातील जिविगिषु वृत्ती हेच तिचं व्यसन....
ती जगते.....गर्शाशयात मारली गेली नसेल, तर नक्कीच जगते....!
स्त्री ..
धारण करते, पोषण करते...
जगते , तशीच जगवते...
ती मोडत नाही , ती थकत नाही ....
अतीव दुःखानेही , ती कोलमडत नाही ....
स्त्री ...
जन्मतःच लढवय्यी असते...
जगण्याची कला ती उपजतच जाणते....
स्वीकार , अनुकंपा , क्षमा ही जगण्याची सूत्रच असतात मुळी तिच्या ....
आपलं अस्तित्व टिकवून, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांना ती जगवते....
ही तपस्या तीच करु शकते....
स्त्री ...
धात्री असते....म्हणूनच , चिवट आणि संयमी असते....!
ती स्वार्थी असूच शकत नाही ....!
संसारात आनंद निर्माण केलाय, रंग भरलेत, आणि मोहपाश निर्माण केलेत ते स्त्रीनेच...
आवश्यकच आहे ते....
म्हणूनच संसार देखणा होतो....
ती चिठ्ठी तिच्या सासूबाई आणि तिने दोघीनीही वाचली, सासूबाई तिच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या अन् त्या गुल्लक मधील पैसे घेऊन भांडवल घेतले, त्या पासुन तिने मटेरिअल घेऊन दागिने बनवायला सुरुवात केली, तिला ऑर्डर मिळू लागल्या, त्यातून मिळालेले पैसे वापरून तिने ज्वेलरी डिझाईनचा कोर्स केला, ते ही दोन मुले, घर सांभाळून.. बारीक-सारीक केकच्या ऑर्डर सुद्धा अधून मधून घेऊ लागली... अन् बऱ्यापैकी पैसे जमल्यावर तीने स्वतःचे ज्वेलरी डिझाईनचे दुकान काढले,ह्या स्वकमाईमुळे तिच्या चेहेऱ्यावर एक वेगळेच तेज दिसू लागले, चाळीशीत ती परत एकदा तरुण दिसू लागली...
तीच्या लाघवी स्वभावामुळे मार्केट मध्ये तिचे खूप छान नाव झाले.. कार्यक्रम कोणताही असो दागिने मात्र श्रद्धाने डिझाइन केलेले हवे, असेच सर्व बायका म्हणू लागल्या... सोशल मिडियाचा वापर करून तिने शहराबाहेर देखील तिचे ग्राहक जमवले... यशस्वी उद्योजिका झाली होती श्रद्धा...
आज गुढीपाडवा, आज तीच्या दुकानाला १० वर्षे झाली होती, मधल्या वर्षात बरेच बदल झाले होते, श्रद्धाने तिचा आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती... मुलेही आता मोठी झाली होती.. आता तिला स्वतःसाठी बऱ्यापैकी वेळ मिळत होता.. लहानपणापासून ती संकल्प करायची ती याच दिवशी, तसाच आजही तीने संकल्प केला बऱ्याच वर्षात मागे राहिलेला संकल्प तो म्हणजे गरजूंना मदत...
आजच्या दिवशी तिने "स्वावलंबन" नावाच्या कार्यशाळेचे उदघाटन केले, या शाळेचे वैशिष्ट्य असे होते की घर, संसार या मध्ये अडकून स्वतःच्या अस्तित्वाचा ज्या महिलांना विसर पडलाय किंवा खूप इच्छा आहे पण काय काम करावे? हे कळंत नाही अशाच महिलांसाठी मोफत मार्गदर्शन आणि क्लास चालु केले...
या स्वावलंबन कार्यशाळेमुळे आज कितीतरी महिलांच्या चेहर्यावर स्वकमाईचे तेज येईल तेच माझ्यासाठी महत्त्वाचं असेल... तीच्या सासूबाई, नवरा, मुले या सर्वांना तिचे कौतुक वाटत होते... अन् या कार्यशाळेची प्रेरणास्थान असलेल्या तीच्या आजीच्या फोटोला हार घालताना तिचे डोळे पाणावले, पण आजी मात्र फोटो मधून हसत होती कारण बऱ्याच वर्षांनी तिला तिच्या नातीच्या चेहर्यावर स्वकमाईचे तेज तर होतेच त्याच बरोबर दुसऱ्याला मदत करतोय या समाधानाचा आनंद देखील...
या कथेतुन मला एवढंच सांगायचं आहे प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी होणं, स्वतःच्या पायावर उभे राहणे, आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे, तुम्हाला सुद्धा पटतय ना...!!! कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.
अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून..
अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....
साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.