सणांचे परिवर्तन:काळाची गरज
सणांचे परिवर्तन:काळाची गरज
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
भारतात प्रत्येक धर्मात सण साजरे केले जातात. सण जरूर साजरे करावे, त्यातील आनंद लुटावा ;पण ज्या सणामधून पर्यावर्णाची,मालमत्तेची,मानवाची हानी होत असेल, असे सण साजरे करणे म्हणजे चिकित्सक मनाला फसविणे होय. मग करायचे काय? तर त्या सणातील आवश्यक बदल करणे होय. असे अनेक सण आपण वर्षभरात साजरे करतो. त्यातून नुकसान होते. पण आपण गोंडस प्रथेत बदल करायला तयार होत नाही व त्याचे परिणाम निमुटपणे सहन करतो.
तिळ संक्रांत येते त्यावेळी पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो. पण ह्या खेळापायी हजारो पक्ष्याचे जीव जातात. अनेक लहान बालकांचे अपघात होतात. स्री पुरुषांचे तीक्ष्ण मांज्याने हात, पाय, मान कापले जातात. यावर कोण विचार करणार?
दसऱ्याच्या दिवशी आपण सोने वाटण्याच्या नावाखाली आपट्याच्या झाडांची पाने, फांदया तोडून त्या झाडाला उजाड करतो. मग का नाही तुम्ही खरे सोने वाटत?
रंगपंचमीच्या दिवशी घातक रसायन, गटाराचे पाणी भरून लहान मुले वाहनांवर, मुलांवर फुगे फेकतात. त्यातून कितीतरी मुलांचे कायमचे डोळे जायबंदी होतात.याला कोण जबाबदार?
दिवाळीच्या दिवशी स्फोटक फटाके वाजवून कर्ण कर्कश आवाज बाहेर पडतात.ध्वनी प्रदुषण, वायुप्रदूषण, कचरा यांना निमंत्रण देतो. मालमत्तेचे आग लागून नुकसान होते. सणाच्या नावाखाली रस्ते आडवून रहदारी ठप्प करणे
वाढदिवसाच्या नावाखाली बेकायदेशीर गल्लीतील रस्ते बंद करणे या कडे कोण लक्ष देणार?सामान्य माणसाला वेठीस धरून दादागिरी करून हवे तस्या देणग्या वसूल करणे? कोण आवर घालणार यांना?
म्हणून समाज व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा आपण स्वतः बदलले पाहिजेत. आपल्या कुटुंबापासून सुरवात केली पाहिजे. मनातील भीती काढून टाकली पाहिजे. आपण ज्यावेळी निर्णय घेतो त्यावर ठाम असले पाहिजे. तंटामुक्त देश कसा होईल असे प्रयत्न व्हायला पाहिजे.अशी प्रतिमा जगासमोर आपण निर्माण करू शकतो. अशा प्रकारे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश यांच्यात परिवर्तन होऊ शकेल. हे कार्य शाळांतून, कॉलेजमधून प्रबोधन करून शिक्षकानी पार पाडले पाहिजे. कृतियुक्त सहभाग झाला पाहिजे.
वरील सर्व सण आपण अनावश्यक रूढी बंद करून साजरे करू शकतो. आपण सुधारलो की आपली पिढी आपले अनुकरण करेल. अन्यथा नको त्या विळख्यात सापडून, कुणाला तरी घाबरून वर्षानुवर्षे तीच प्रथा विनाकारण चालू ठेवतो.