Kaustubh R

Others

4  

Kaustubh R

Others

समाधान

समाधान

3 mins
23.2K


समाधान खरंच शब्द छोटासा पण अर्थ मोठा . कारण दिसायला हा शब्द चार अक्षरी दिसत असला तरी त्याच्या मागे खूप मोठा गर्भितार्थ दडलेला आहे . प्रत्येकाने स्वत : ला एक छोटासा प्रश्न विचारायचा .मी समाधानी आहे का ? उत्तर निश्चितच नाही येते . कारण , अहो सुरूवातीला मानवाच्या गरजा खूपच मर्यादित होत्या .जसजसे नवनवीन शोध लागू लागले मग माणसाने एक नवीन समीकरणच तयार केले .भौतिक गोष्टी जास्तीत जास्त मिळविणे म्हणजेच आपण सुखासमाधानात आयुष्य घालवू शकू .

मला एक प्रश्न पडतो की सुख आणि समाधान हे बाह्य , भौतिक गोष्टींवरच आधारीत असते का ? निश्चितच नाही कारण जेव्हा या गोष्टी नव्हत्या तेंव्हाही माणसे समाधानात होतीच की . मग आता असे नेमके काय घडते आहे ? समाधानाची व्याख्याच आपण बदलून टाकली आहे . उदाहरणच द्यायचे झाले तर परवाचीच एक गोष्ट . माझ्या शेजारच्या घरात एकीने वॉशिंग मशिन आणली . आता अशा गोष्टींची उत्सुकता महिलांना जरा जास्तच . सर्वजणी गेल्या बघून आल्या . कौतुक झाले .पेढे झाले . सगळे जिकडे तिकडे झाले . हे झाले खरे पण हळूहळू एकेक घरात वादाचे विषय सुरू झालेले ऐकू येवू लागले .विषय काय त्यांनी किती भारी मशिन आणली ? आपण का नाही ?सुरू झाली विचारांची तुलना , स्पर्धा . आपणच आपले मानसिक समाधान यामुळे घालवून बसतोय हे लक्षातच येत नव्हते त्यांच्या .

इथे आपणच आपल्या विचारांना छोटे करतो आणि आहे त्या परिस्थीतीचा आनंदाने उपभोगच घेवू शकत नाही . खरं तर महिलावर्गानी अशा भ्रामक गोष्टीत समाधान , आनंद शोधण्यापेक्षा आयुष्याकडे व्यापक दृष्टीने पाहायला शिकले पाहिजे . छोट्या छोटया गोष्टीत सुद्धा आपल्याला आनंद लुटता आला पाहिजे .

जेव्हा आपल्याला अशी भावना येते त्या वेळेस आपण एकच काम करायचे . निसर्गाच्या सान्निध्यात जायचे .पशू पक्षी , पाखरे , झाडे , वेली यांच्याकडे कुतुहलाने पाहायचे . त्यांच्या कडून जे जे घेण्यासारखे आहे ते ते घ्यायचे . बघा पक्षी जास्त कशात गुंतून पडत नाहीत .झाडे , वेली आपल्याकडून पाण्याव्यतिरिक्त काही घेत नाहीत . परंतु दानत मात्र त्यांची मोठी . या गोष्टींसाठी जेंव्हा आपण आपल्या मनाचे दरवाजे खुले करतो त्या वेळेस आपल्यालाच आपल्या क्षुद्र गोष्टींची , विचारांची लाज वाटते कारण कोणत्याही गोष्टींचा मोह , संचय हीच असमाधानाची सुरुवात .जेंव्हा आपण या सगळ्याच्या पलीकडे जातो आपल्याला एक नविनच शोध लागतो . मग आपल्याला असे वाटू लागते की खरंच या भौतिक गोष्टीत समाधान शोधण्यापेक्षा अशा कितीतरी गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत ज्यामुळे आपल्याला आत्मिक समाधान मिळेल .

बघा आजपासूनच विचार चालू करा आणि शोधा बरे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याने तुम्हाला खरंच आनंद , समाधान मिळेल . मला वाटते प्रयत्न करायला काय हरकत आहे ? कोणाचे समाधान आपला छंद जोपासण्यात असेल तर कोणाचे समाजकार्यात . कोणाचे पर्यावरणाचा समतोल राखण्यात असेल तर कोणाचे अजून काही . पण खरंच सखींनो आपणच आपली नजर व्यापक बनवूया . निश्चितच यातच आपल्याला खरे समाधान हे चिरंतन रूपात मिळूनही जाईल .


Rate this content
Log in