नाळ.....................
नाळ.....................
अचानक मध्यरात्री अनुराधाने आईला गदागदा हलवून उठवले. हो अनु ची आई जोरजोरात म्हणत होती," थांब बाळा दार उघडते " त्या दोघांचे बोलणे ऐकून अण्णा देखील उठले.
अनु ची आई निर्मला नखशिखांत घामाने डबडबले होती. अनुराधा ने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि विचारले," आई काय झाले? स्वप्न पडलं का?"
निर्मला च्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. म्हणाली," आधी दार उघड राघव बाहेर उभा आहे "
अण्णा हसून म्हणाले, "अगं दोन आठवडे झाले नाही का राघव अमेरिकेला गेला आहे."
तरीपण निर्मलाच्या हट्टासाठी अण्णांनी समोरील दार उघडले आणि अंगणामध्ये फेरफटका मारला.
निर्मले ला म्हणाले," तू पण येऊन बघ इथे कोणी नाही, आपल्या राघव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आहे आणि तिथे सुखरूप आहे."
निर्मला चे रडू काही थांबेना. गयावया करून म्हणाली," आधी फोन करा हो राघवला, नक्की काही तरी अडचणीत सापडला आहे, मला स्वप्नात अगदी स्पष्ट दिसलं, जोरजोरात दरवाजा ठोकत होता, म्हणत होता आई दार उघड! तुम्ही त्याला आधी फोन लावा."
राघव 2 आठवड्यापूर्वीच अमेरिकेला रवाना झाला होता. प्रत्येक ठिकाणी काळजीपूर्वक तपासणी होऊन तो विमानात सुखरूप पणे बसला होता, तसेच अमेरिकेला पोहोचल्यानंतर देखील त्याचा फोन आला होता सध्या तो रोजच खुशाली कळत होता मग अचानक निर्मल् ला असे का बर स्वप्न पडले? अण्णा पण विचारातच पडले.
आईचं हृदय ते तिला नक्कीच कळलं असेल , काहीतरी कमी जास्त होत असेल ते.
"चला आपल्याला सगळ्यांना उद्या ड्युटीवर जायचे आहे झोपा आता." अण्णांनी दटावले, निर्मला आणि अनु हॉल मध्ये येउन बसल्या रात्रभर दोघींच्याही डोळ्याला डोळा नव्हता.
अण्णा समजुतीने म्हणाले," अगं जर त्याच्या पैशाची चोरी झाली असेल ना तरी पण मी पैसे पाठवीन हो तू काही काळजी करू नकोस झोप आता."
तरीपण निर्मलाला मात्र काही सुचत नव्हते.
दुसऱ्या दिवशी अतिशय विचित्र वेळेस राघवचा फोन आला.
राघव अण्णांशी जुजबी बोलला आणि मग "आईला फोन द्या" म्हणाला. अण्णा म्हणाले पण," बघ मी म्हणत नव्हतं सगळे व्यवस्थित असेल म्हणून तू ना उगीच काळजी करतेस."
राघव चा फोन अनु ने स्पीकरवर टाकला. आधी अनु बोलली," राघव तू ठीक आहेस ना? काल ना आईला तुझ्या बद्दल काहीतरी विचित्र स्वप्न पडले, रात्री ती रडत उठली आम्हाला सगळ्यांना तुझ्याबद्दल फार काळजी वाटते रे."
राघव चा पण आवाज भारी झाला होता," मला पण तुमची फार आठवण आली ग, काल रात्री युनिव्हर्सिटीमधून यायला रात्र झाली होती, सागी बॉटम च्या खालच्या मजल्यावरती ट्रेन साठी मी आणि माझा मित्र थांबलो होतो, प्लॅटफॉर्मवर कोणीच नव्हते, आणि मी माझी दहा खिशाची पॅंट घालून उभा होतो. तुला तर माहिती आहे ना, सगळे पैसे आईने त्यांच्या खिशातच शिवून दिले होते, अजून आम्हाला घर मिळालेले नाही म्हणून पैसे मी पॅन्ट मध्ये ठेवतो.
प्लॅटफॉर्मवरच्या शांततेने आम्हाला फारच भीती वाटत होती, तेवढ्यात तिकडून दोन काळी माणस आली, विचित्र हावभाव करत होती, त्यातला एक तर आमच्या कडे बोट दाखवून काहीतरी विचित्र म्हणत होता. आम्ही काल पूर्ण लुटलं गेलो असतो, तेवढा ट्रेन आली, दिसेल त्या कंपार्टमेंटमध्ये आम्ही दोघे शिरलो, तर तिथे कोणीच नव्हता, ती दोन्ही माणसं आमच्या बरोबरच कंपार्टमेंटमध्ये शिरले. मला तर वाटले की आज आपला शेवटचा दिवस, मी मनातल्या मनात आईला हाका मारत होतो, एवढ्यात बाजूच्या डब्यांमधून दोन पोलिस ऑफिसर आमच्या डब्यात आले, आमच्याकडे बघून हसले आणी म्हणाले," डोन्ट वरी." तोपर्यंत आमचा जीव काही थाऱ्यावर नव्हता."
निर्मला, अनुराधा, आणि अण्णा तिघांच्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या. गहिवरले ल्या स्वरात अण्णा म्हणाले," राघव तुझ्या आईला तुझी हाक ऐकू येत होत् होती बरं, हो! या दोघी जणी रात्रभर म्हणूनच जाग्या होत्या, घराच्या भवताली देखील जाऊन आल्या. तू काळजी घे, आधी बँकेमध्ये अकाउंट उघड आणि सगळे पैसे तिथे ठेव, पैशाची अजिबात काळजी करू नकोस, लागली तर कळव, एकटा आहेस असं वाटू देऊ नकोस, तू तिथे एकटा आहेस आणि इथे आम्ही."
त्याच आठवड्यामध्ये राघवने आपल्या मित्रांसोबत भाड्याचे घर घेतले, आणि अनुराधाने पहिल्यांदा जाऊन आई अण्णा यांचे पासपोर्ट काढले. अमेरिकेच्या टुरिस्ट व्हिसासाठी प्रार्थना पत्र पण दिले. घरी आल्यावर ती आई आणि अण्णांना म्हणाली," तुम्हाला दोघांनाही कधीही जरी राघवला बघायचे भेटायचे असेल ना तर खुशाल तिकीट काढून तुम्ही जाऊ शकता." आईने अनुराधाला जवळ घेतले, अण्णा ने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.