STORYMIRROR

Anuja Dhariya-Sheth

Others

3  

Anuja Dhariya-Sheth

Others

मनाचा आघात... एक वादळ

मनाचा आघात... एक वादळ

4 mins
334

अतुल- अर्चना एक सुखी जोडी.. सावी म्हणजे त्यांच्या संसारावरचे फ़ुल.. अगदी मस्त कुटुंब होते, दरवर्षी अतुल वाढदिवस आला की गाडी घेऊन एका गावी जायचा... अर्चना पण सोबत जायची.. त्याच्या भावना तिला कळत होत्या, पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं, कारण काळापुढे कोणाचं काही चालत नाही.. प्रत्येकाच्या आयुष्यात असे वादळ येतच असते, त्यातून मार्ग काढून माणूस पुढे जातो पण काही आठवणी अशाच असतात की त्या मिटवून टाकावे असे कोणाला वाटत नाही.. जन्माची, रक्ताची नाती अशी कधी मिटत नाहीत...


अतुलचेही असेच होते, वादळ आले त्याचे अख्खं आयुष्य उद्ध्‍वस्‍त करून गेले, पण अर्चनाने त्याची साथ सोडली नाही, त्याने त्याला त्या धक्क्यातून बाहेर काढले, त्याच्या मनाची जखम पण भरत होती हळू हळू.. पण हा एक दिवस तो खूप हळवा व्हायचा... अर्चनाने कधीच त्याला या दिवशी डिस्टर्ब केले नाही...


पण यावेळेस सावी काही ऐकायला तयार नव्हती, का जातो बाबा त्या गावात, तू जातेस पण नुसती गाडीत बसतेस आई, या वर्षी आपण मस्त बाहेर जाऊया ना.. माझे सारे फ्रेंड्स तर मस्त आऊटींग करतात आणि आपण का इथेच जायचं? अर्चनाने तिला चांगलेच सुनावले, गप्प बस हं.. सावी तुझे तोंड भारीच चालते हल्ली.. वेळ आली की सगळे समजेल.. आता गप्प बसं बघू..

अतुल म्हणाला, असू दे गं ओरडू नको तिला, सावी बेटा आपण पण जाऊ आज बाहेर मी ऐकेल तुझे पण फ़क्त एक तास तरी मला जाऊन येऊ दे, मग संध्याकाळी आपण जाऊ ओके.


अर्चना म्हणते, अतुल मी तुला एकटे सोडणार नाही.. मी तुझ्या सोबत येते. आई-बाबा आहेत सावीसोबत...

बाबा या वेळेस मलाही यायचंय तुमच्यासोबत, पण नुसते गाडीत बसणार नाही मी... आज तुमच्या सोबत येणार आहे... तुम्ही मला काहीच का सांगत नाही? ... सावी....

गाडीतून निघाले २ तास लागले गाव यायला.. सावलीत गाडी लावली आणि काहीही न बोलता दरवर्षीप्रमाणे अतुल गाडीतून उतरला आणि त्या सामसूम रस्त्याच्या दिशेने चालत गेला.


त्याच्या पाठोपाठ त्या मायलेकी पण गेल्या... थोडे चालत गेला, एका जागी तो थांबला, जोरात रडू लागला...


अन् सावीला म्हणाला, आज तुला सगळे सांगतो बाळा... इथे माझे गाव होते, गावाला सोय नाही म्हणून मी शिक्षणासाठी बाहेर होतो... इथे माझे आई-बाबा छोटी बहिण सविता सगळे होते. माझे शिक्षण पूर्ण झाले, नोकरी लागली तिकडेच.. तुझ्या आईसोबत माझे लग्न जमले.. आता आपण राहतो ते घर मी बांधायला सुरुवात केली होती.. गावात जास्त सोय नाही त्यामुळे आमच्या लग्नानंतर सर्वांनी या घरात राहायचं ठरवलं..


पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते... ११ वर्षांपूर्वीची ती काळरात्र... अजूनही आठवते मला... जास्तीचा पाऊस झाला.. गावात पाणी आले, थोड्याच वेळात लाइट नाही, सर्व संपर्क तुटला.. मी तिकडे असलो तरी माझे सर्व लक्ष इकडे होते बाळा... खूप छोटे गाव होते हे.. त्यामुळे जास्त सोयी नसल्या तरी छान वाटायचं इथे... सुट्टी काढून मी दर महिन्याला यायचो.. पण पाऊस असल्यामुळे नानांनी म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं मला घाईने येऊ नको, रस्त्यात अडकून पडण्यापेक्षा आहेस तिथेच राहा...


पण या वर्षी या निसर्गाने अगदीच रौद्र रूप धरले, पाणी वाढतच होते, पाऊस-वारा खूपच झाला आणि जे व्हायला नको तेच झाले, एक डोंगर कोसळला, अख्खे गाव त्यात गाडले गेले, काही लोकं पुरात वाहून गेले, दोन-तीन दिवस कोणाशीच काही कॉन्टॅक्ट नाही.. आपल्या इकडे पण अतीवॄष्टीमुळे लाइट नव्हते, वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता... लाईट आल्यावर टीव्हीवर बातम्यांमध्ये ऐकले आणि तशीच धाव घेतली, पण खूप उशीर झाला होता त्या पुरासोबत माझे आई, बाबा, बहीण, आमचे घर सर्व काही नामशेष झाले...


मी पूर्ण खचून गेलो, तुझ्या आईने मला सावरले, आयुष्यात परत उभे केले, माझ्या प्रत्येक अडचणीत मला मदत केली, ६ महिन्यात आम्ही साधेपणाने लग्न केले बाळा... माझे कशात लक्ष नव्हते पण तिने नोकरी करत मला सांभाळले, एक वर्ष गेले, हळूहळू मी सावरलो परत काम करायला लागलो.. संसारात रमून गेलो... पण माझा वाढदिवस आला की मी परत जुन्या आठवणींमध्ये जातो.. नाना-आई, सावी... म्हणजेच माझी बहीण सविता हो तिला मी सावीच बोलायचो.. खूप तयारी करायचे माझ्या वाढदिवसाची...

आई किती प्रकार करायची माझ्यासाठी, गरजूंना जेवण द्यायची, सावी एक झाड लावायची, अन् म्हणायची अरे दादा मी सासरी गेले की हे झाड तुला माझी आठवण करून देईल बघ... आणि नाना मला गरज आहे अशा वस्तू द्यायचे... म्हणायचे शहरात राहतोस तू, तुला तिथे लागतील अशा वस्तू द्यायलाच हव्या... खूप छान वाटायचं.. आज ना उद्यां वहिनी येईल तिच्यासाठी सर्व फुलांची झाडे आपल्या अंगणात लावणार मी, असे सावी म्हणायची...

लग्न ठरलं तेव्हा किती खुश होती, अर्चना म्हणाली.. वहिनी, वहिनी करायची... माझी ओळख फ़क्त २ महिन्याचीच होती गं.. पण तुझ्या बाबांमुळे असे वाटते खूप जुनी ओळख आहे... आणि म्हणूनच तुझे नाव आम्ही सावी ठेवले...


सावी सर्व ऐकत होती... अर्चनाचे आई-बाबा जवळच असल्यामुळे तिला आजी-आजोबा यांची कमी जाणवली नाही कधीच... आणि सर्वच गेल्यामुळे या आजी-आजोबा किंवा सावीचे फोटोसुद्धा तिने कधी बघितले नव्हते...


सारं काही गेले बघ बाळा.. तेव्हा काही मोबाइल नव्हते गं.. त्यामुळे फोटोसुद्धा नाही माझ्याकडे.. आता राहिलाय तो फक्त हा वाहून गेलेला रस्ता....त्यात मी शोधतो त्या फक्त त्यांच्या आठवणींच्या खुणा..... म्हणून माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी इथे येतो... या मातीमध्ये अजूनही त्यांच्या प्रेमाचा वास आहे... जो मला जगायची नवीन उमेद देतो..आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा..!!!


अतुलने डोळे पुसले आणि म्हणाला, चला.. आता सावीला प्रॉमिस केल्याप्रमाणे बाहेर जाऊया..

सावीने अतुलला मिठी मारली आणि खूप रडली, सॉरी बाबा.. मी उगाच हट्ट केला माझे फ्रेंड्सचे बघून.. आज त्याची ९ वर्षांची सावी त्याला खूप मोठी वाटली...


ती म्हणाली आपण इथे येत जाऊ अधून-मधून.. मला आवडेल तुमच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकायला...

अतुल म्हणाला चालेल, पण आज सर्व ठरल्याप्रमाणे करायचे... आणि आज नाही दरवर्षी तू म्हणशील तसाच वाढदिवस करायचा माझा...

चालेल बाबा, मग आपण पण झाड लावू आपल्या घराच्या बाजूला आणि इथे आजूबाजूला जे गरीब लोकं राहतात त्यांना गरजू वस्तू देऊ... पण याच गावात येऊन द्यायचं हा...!!!


दोघं बाप-लेक भरभरून बोलत होते आणि अर्चना त्यांच्याकडे एकटक बघत होती... आज अतुल इतक्या वर्षांनी तिला पहिल्यासारखा वाटला... एका वादळाने केलेला आघात सहन करून उभा राहिला असला तरी मनाचा आघात आज खऱ्या अर्थाने दूर झाला होता...


Rate this content
Log in