कर्ण व्यथा !
कर्ण व्यथा !


कर्णाने आपले धनुष्य उचलले, पण मन मात्र अजून खिन्नच होते, अस्थिर होते. खांदे वाकलेले, डोळे खालावलेले अशा गलितगात्र अवस्थेतील कर्ण शिबिरात परतत होता. दोन प्रहर विचार करून पण मनाला बिलकुल शांतता नव्हती, स्वतःवरील राग आणि अविश्वास यापुढे तो हतबल झाला होता. मन पुन्हा पुन्हा भूत काळामध्ये उतरत होते.. स्वतःवरील या अ व्यवस्थेला तो स्वतःच कारणीभूत होता. अर्जुना पेक्षा मीच श्रेष्ठ धनुर्धर आहे हे सिद्ध करण्याच्या नादात त्याच्या जीवनामध्ये काळोख पसरला होता. पांडवांच्या द्वेषाने त्याच्या हातून अगणित प्रमोद घडले होते. पांचालीच्या वस्त्रहरणला तोच कारणीभूत होता. दुर्योधनाचे मित्रप्रेम साबित करण्यासाठी तो नैतिकतेच्या कितीतरी पातळी खाली पोचला होता, सुरू असलेल्या कुरुक्षेत्रावरील युद्धाला तो आणि तोच कारणीभूत होता. आजचा कर्णआणि चंपारण्य यामधील कर्ण यात खूपच फरक होता. चंपारण नगरीच्या नुसत्या आठवणीने त्याचा जीव गलबला. तो निष्पाप कर्ण त्याला आत्ता कुठेच सापडला नाही. समोर दिसणाऱ्या मृत्यूच्या सावलीने तो घाबरला होता. जो यज्ञकुंड त्याने पेटवला होता त्यातच त्याची आहुती जाणार होती. क्षणभर त्याला वाटले कि पळत जावे आणि दुर्योधनाला सांगून हे युद्ध थांबवावे. पण दुर्योधन आपले ऐकेल? त्याने का ऐकावे. त्याला युद्धासाठी प्रवृत्त करणारे आपणच होतो ना, स्वतःच्या मरणाची इतकी भीती असावी, आज पर्यंत आपण आपल्या प्रत्येक कृतीचे समर्थन करत होतो मग आज या मनाची अवस्था अशी का? प्रश्न अनेक होते पण उत्तर मिळत नव्हती. सूर्य किरणे कधी वक्र नसतात, असे सांगत आपण कितीतरी लोकांना क्लेश पोहोचवले होते आपल्या बोलण्याने कित्येक लोक दुःखी झाले होते. पण आपण आजपर्यंत कशाचीच पर्वा केली नाही दुर्योधना वरील निष्ठा अबाधित राहावी म्हणूनआपल्या हातून अनेक प्रमाद घडले होते, आज याची जाणीव अधिक प्रकर्षाने होत होती. आपला मृत्यु हा अर्जुनाच्या हातून होऊ नये म्हणून त्याचे मन आकांत करत होते. पण मृत्यू हा कोणाला चुकला नाही आणि चुकणार ही नव्हता. येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस त्याच्याकडे नव्हते, सूर्यपुत्र वरील या अवस्थेला मानवी अहंकार कारणीभूत होता..आपल्या पापाचे घडे फुटणार हे नक्की होते. जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर या नावाने आपली ख्याती व्हावी ही इच्छा, इच्छाच राहणार होती. सर्वश्रेष्ठ दानवीर काळापुढे याचक म्हणून उभा होता. सूर्यप्रकाशाचा अस्त होऊन गडदअंधाराची सावली सर्वत्र पसरत होती