गोष्ट कावळा चिमणीची पण नव्या नात्याची
गोष्ट कावळा चिमणीची पण नव्या नात्याची
फार पूर्वी ऐकलेली कावळा चिमणीची गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे. आपल्या लहानपणापासून आपण ऐकत आलो, त्यामध्ये कावळ्याचं घर शेणाचं,तर चिमणीचं घर मेणाचं.
एकदा काय झालं, मोठा पाऊस आला .कावळ्याचं घर वाहून गेलं, म्हणून तो चिमणीला आश्रय मागायला आला.
परंतु चिमणी आपल्या संसाराचा एवढी दंग होती की त्यामुळे तिने काही कावळ्या साठी दार उघडले नाही.
त्यानंतर काही वर्षे उलटून गेली आणि एकदा कडक उन्हाळा पडला. यावेळी मात्र उलट झालं कावळ्याचं शेणाचं घर थंडगार राहिलं आणि चिमणीचं मेणाचं घर मात्र वितळून वाहू लागलं. त्या घरात इतक गरम होऊ लागलं की उन्हाने तडफडून चिमणीचा प्राण गेला असता. त्यामुळे नाइलाजाने ती कावळेदादा च्या घरट्यात आश्रय मागायला गेली.
कावळेदादा! कावळेदादा! दार उघड ,उन्हामुळे माझं मेणाचं घरटे वितळू लागलं.
मला त्या घरात आता राहणे शक्य नाही, मी उन्हाने तडफडून मरेन. माझ्यासाठी दार उघड.
चिमणीला असं वाटलं होतं कावळेदादा तिच्यासाठी मुळीच दरवाजा उघडणार नाही. कारण तिने पूर्वी त्याच्यासाठी स्वतःच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता.
पावसाळ्यात त्याला आश्रय दिला नव्हता. बिचारा कावळा पावसात भिजत -भिजत त्याने चार महिने कसेतरी काढले. त्याचा अपमान केला परंतु कावळ्याने तो राग मनात ठेवला नाही.
चिमणी ताईच्या एका हाके बरोबर कावळेदादा तिच्या मदतीला धावून गेला. कावळेदादा! कावळेदादा! तुझे घर किती थंडगार आहे अगदी येथील एसी लावल्यासारखे वाटते. चिमणा ताई !तू माणसांच्या वळचणीला राहून -राहून खूप माणसाळली आहेस. तुला टीव्ही, फ्रिज, एसी सारकाही माहिती आहे.
पण कावळे दादा मागच्या वेळी मी तुझ्यासाठी दरवाजा उघडला नसताना, तू मात्र माझ्या पहिल्या हाकेला धावून आलास.
तुझे खूप उपकार झाले रे बाबा!
चिमणा ताई खरं सांगू? माणसांच्या संगतीला राहून तू माणसांसारखी वागू लागलीस. वेळेला कुणाच्या मदतीला जायचंच नाही. फक्त लांबून लांबून फोन वरतीच सारं काही गोड बोलायचं .
वाढदिवसाला मोठे मोठे केक ,फुलं मोबाईल वरून पाठवायचे. प्रत्यक्षात मात्र एक फोन देखील करायचा नाही .पण माझं तसं नाही मी आहे निसर्ग पक्षी म्हणाल तर माणसांच्या सानिध्यात ला म्हणाल तर जंगलातला.
अगं वेळे काळेला आपणच एकमेकाला मदत केली पाहिजे .यालाच तर म्हणतात "माणुसकी"
नाही नाही "पक्षीकी" म्हणतात
आयुष्यभर कोणी कोणाचे अपमान केले .कोण? कोणाशी ?वाईट वागले हे जर मनात धरून ठेवले तर माणसात आणि आपल्यात काय फरक ?
कुठेतरी ,कोणीतरी, मनातली तेढ विसरायला हवी. त्याची उकल करायला हवी..कोणी तरी माघार घ्यायलाच हवी.
आज मी तुला आश्रय दिला आता कधी माझ्यावर वेळ आली तर तू नक्की मला आश्रय देशील अशी मला खात्री आहे.
चल! झाले गेले विसरून जा. आमच्या कावळेणीने गरमागरम मऊ गुरगुट्या भात केलाआहे, तो खाऊन घे आणि तुला हवे तेवढे दिवस खुशाल माझ्याकडे राहा.
किंवा आपण असं करू या उन्हाळ्यामध्ये तू हक्काने माझ्या घरी राहायला यायचं आणि पावसाळ्यामध्ये मी हक्काने तुझ्या घरी राहिला यायचं म्हणजे आपल्या दोघांची पण सोय होईल आहे की नाही मज्जा! त्याबरोबर कावळ्याची छोटी छोटी पिल्ले आपले पंख हलवून हलवून हसू लागली .चिमणीचे आणि तिच्या पिल्लाचे स्वागत करू लागली. आणि चिमणाबाई चार दिवस माहेरपणाला आल्यासारखी हक्काने कावळेदादा च्या घरात राहू लागली.
गोष्टीचे तात्पर्य
कोणाशी आयुष्यभराचा रुसवा-फुगवा करायचा नाही, वेळेला एकमेकांना मदत करायची.