बीती हुई बतीयां
बीती हुई बतीयां
बीती हुई बतियाँ कोई दोहराये,
भूले हुए नामों से कोई तो बुलाये
या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले.
खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले.
लहानपणचं घर तिथलं अंगण, अंगणातलं कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले.
त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.
माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमच, तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, व्हाॅट्सअपवर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या, लिंबाच्या, आंब्याच्या कडू-गोड आठवणी आठवणीच होऊन राहातील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला. जुनी खेळातली नावं, लुटुपुटूची भांडणं, रुसवे, फुगवे, भातुकली सगळं कसं आत्ता घडत असल्यासारखं नजरेसमोर नाचलं.
हातातली कामं आवरत तिने आज जुने अल्बम काढले. प्रत्येक फोटो एक नवीन आठवण आणि खूप दिवस टिकेल, पुरेल असं समाधानाचं हसू देऊन गेला तिला. खूप काही आहे आपल्याजवळ पण आपण उगाचच नवीन काहीतरी शोधत फिरतो असा विचार मनात येताच ती स्वतःशीच हसली.
संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि मुलंही तिचं हे रूप पाहून खुश झाली. तितक्यात तिच्या जुन्या घराजवळचे कुणीतरी काका-काकू भेटले आणि काय काय मस्त आठवणी सांगत होते असं नवरा म्हणू लागला. चला, मनातली तगमग योग्य मनापर्यंत पोहोचली या विचाराने तिला अजूनच छान वाटलं. पुन्हा एकदा ती गुणगुणू लागली...
बीती हुई बतियाँ कोई दोहराये,
भूले हुए नामों से कोई तो बुलाये...