भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी
भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी
ब्रिटीशांच्या जोखडापासून भारत स्वतंत्र झाला ते साल होतं 1947. आणि तो दिवस होता 15 ऑगस्ट..
15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री पासून भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवलं.
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य बालगंगाधर टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक थोर क्रांतिकारक आणि समाजसुधारकांची क्रांती या स्वातंत्र्यासाठी मोलाची ठरली.
आज स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करताना स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थानं आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचाही सारासार विचार करणं गरजेचं ठरतं.
तब्बल दहा, वीस नव्हे तर 74 वर्षांचा काळ उलटून गेला तरी आजही आपल्या देशात अनेक वाड्या-वस्त्यांवर अंधारल्या जीवनात प्रकाश देणारी ही वीज पोहोचलेली नाही. आजही अनेक कुटुंब अश्मयुगीन आयुष्य जगत आहेत.
अहो वीजच नाही तर शिक्षण कुठून येणार ? अनेक बालकांना शिक्षण म्हणजे काय असतं.. याची पुसटशी कल्पनाही नसावी...
याला म्हणायचं स्वातंत्र्य..? की...
आधुनिक तंत्रज्ञान विकसित करत भारतीय मानवाने चंद्रावर पाऊल टाकणं....
तिथल्या दगड गोट्यांची पाहणी करणं...
पृथ्वीतलावर होणाऱ्या वातावरणीय बदलांची अचूक माहिती देणं...
नवनवीन संशोधन विकसित करून औद्योगिक क्रांती घडवणं...
याला म्हणायचं स्वातंत्र्य...?
सुख-दुःखाच्या अनेक प्रसंगानी भारावलेल्या या स्वातंत्र्यात...
दहशतवाद, खुन, दरोडे, अत्याचार, भ्रष्टाचार आणि महागाईने ग्रासलेल्या या समाजविघातक कृत्यांनी आपलीच मान शरमेने खाली जाते.. आणि आपसूकच ओठी शब्द येतात..
ए मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भरलो पानी ...!
जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी...!
आर्थिक महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या या भारतात दारिद्र्य रेषेखालील जनता आजही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित आहे.
आपल्या तिरंग्यातील तीन रंगात शांतता, सामर्थ्य आणि सुबत्ता यांची प्रतीके आहेत. भगवा सामर्थ्याच... पांढरा शांततेच... आणि हिरवा सुबतत्तेचं...
आज हाच तिरंगा अभिमानाने फडकविताना मनात एकच प्रश्न उभा राहतो..
खरंच भारतात शांती आहे.. महासत्ता बनण्याचे सामर्थ्य आहे.. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या कृषीप्रधान भारतात सुबत्ता आहे...
आज स्वातंत्र्य दिन नागरिकांसाठी बँक हॉलिडे झाला... या दिवशी ड्रायडे असूनही पर्यटनस्थळी मद्यपींना आवर घालण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करावी लागते..
कदाचित आपल्या भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी धूमधडाक्यात साजरी करण्याचं फर्मानही काढल जाईल...
तेव्हा मात्र हे चित्र पालटेलं अशी आशा व्यक्त करूया..
या देशातील प्रत्येक योजना आणि सुख-सुविधा दुर्गमातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवर पोहोचून दुर्गमतेचा हा कलंक जेंव्हा पुसला जाईल तेंव्हा खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणता येईल.
जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया..
करती है बसेरा वो भारत देश है मेरा.. !!
या ओळी प्रत्यक्षात साकारण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रभक्तीच्या क्रांतीची मशाल पेटणं गरजेच आहे...
अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानातून रक्तरंजित झालेली ही भारतभूमी सुजलाम, सुफलाम मलयजशीतलाम, शस्य श्यामलाम बनविण्यासाठी भारत मातेच्या सुपुत्रांनो चला कटिबद्ध होऊ या... या विकसनशील भारताचा भाग बनूया...
वंदे मातरम.... !