अनामिक भीती - भाग १
अनामिक भीती - भाग १
प्रत्येक व्यक्तीच्या मनात नेहमीच एक अनामिक भीती असते मग् ती कोणत्याही वेळी वाटते... काल, आज, उद्या कधीच ही भीती मनातून जात नाही हे मात्र खरे, चांगली वेळ असली तरी भीती वाटते अन् वाईट वेळ असली तरी भीती ही वाटतेच... कसली भीती काय तें काही सांगता येत नाही, पण कसली तरी अनामिक भीती असतेच.. या कथेतल्या आपल्या नायिकेला अशीच अनामिक भीती वाट्ते...
सुरभी आज शांत बसून तिच्या आयुष्याचा विचार करत होती तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या डोळ्यासमोरून जात होते.. कालची ती कशी होती? अन् आज ती कुठे येऊन पोहचली... खरच वेळ किती बदलून जाते नाही...
तिचे लहानपण एका छोट्या गावात गेले.. रंगाने जरा सावळी.. त्यामुळे कायम कमी लेखली गेली होती.. त्यात वडील कडक.. कायम तिच्या मनावर त्यांचे दडपण असायचे, त्यामुळे कधीच मोकळेपणाने वागलीच नाही ती... तिची आवड, तिचे छंद यांवर कायम मुरड घालत गेली... वडील सतत तिला अभ्यास करायला लावत, सतत बंधनात ठेवी त्यामुळे ती कायम शांत असे, तिच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता, तिला सतत कसली तरी अनामिक भीती वाटायची...
जरा काही झाले तरी तिला रडायला येई... सगळे तिला हसायचे, कमी लेखायचे.. दिसायला काळी- सावळी त्यामुळे ती बाजूनी गेली की ए काले$$$, "हम काले है तो क्या हुआ..!!" असे गाणे बोलले जायचे.. बिचारी चेहरा टाकायची...
तिच्या काकूसोबत एकदा ती बाहेर गेली होती तेव्हा तर बाळाला सांभाळायला ही मुलगी ठेवली आहे का असे म्हणत काकूंच्या मैत्रीणींनी तिची खिल्ली उडवली... खूप खचून गेली ती.. सतत ती स्वतःला कमी लेखू लागली.. तिचा आत्मविश्वास कमी झाला.. तिचे कशात लक्ष लागायचं नाही.. अभ्यास केला नाही की बाबा ओरडत असत.. खायला कार भुईला भार.. असे काहीस चिडून बोलले की ती अजून खचून जायची.. तिचे आयुष्य नीरस झाले होते.. तिच्या वयाच्या मुलींपुढे ती पोक्त वाटायची.. कारण एकच होते सतत डोक्यात कसले ना कसले विचार.. अन् मनावर असलेल्या दडपणामुळे वाटणारी अनामिक भीती...
घरात तिने काही केले तरी कौतुक कधी व्हायचं नाही... पैसा टाकला की झाले असेच वडिलांना वाटत असे.. घरातील कॊणी किंमत देत नाही म्हटल्यावर नातेवाईक पण नाव ठेवायचे.. तिने कितीही चांगले वागले तरी तिच्या हातून झालेल्या चुका आधी बघितल्या जायच्या.. सर्वांच्या अशा वागण्यामुळे ती कोणाचे काही ऐकेनासी झाली.. स्वतःच्या विश्वात असायची.. त्यावरून पण बोलणे.. पण आता ती अशा वयाच्या टप्प्यावर होती की तिला त्याचा काही फरकच पडत नव्हता..
दहावी झाली, कॉलेजला गेल्यावर जरा मोकळीक मिळेल म्हणून ती खुश होती.. मार्क छान मिळाले होते.. पण तरीही तिला नाव ठेवण्याचा चान्स कॊणी सोडला नाही...
कॉलेजला ऍडमिशन झाली पहिला दिवस कॉलेजचा पण तिच्या मनात असलेला न्युनगंड अन् तिच अनामिक भीती...
(क्रमश:)