किमान एक फुल तरी
किमान एक फुल तरी
किमान एक फुल तरी...
राहू द्यावे झाडावर....
नेहमी...
अगदीच भुंडे-बोडके करू
नये झाडांना...कधीच...
एका अंकुरल्या कळीपासून....
फुलाचा...
पूर्णत्वाला जाईपर्यंतचा....
तो परिपक्वतेचा प्रवास म्हणजे....
एका निष्पाप, कोमल, अबोल
जीवाची जडणघडण
निसर्गाने मूकपणे निर्माण केलेली सर्वोत्कृष्ट निर्मिती....
आपल्या आंतरिक सुगंधाची जाण...
स्वतः फुलांना यायच्या आधीच....
साऱ्या आसमंताने भरून घेतलेला असतो.....
त्यांचा स्वर्गीय सुगंध रोमरोमांत....
अन् मग ......आपले स्वार्थी हात... शिवशिवतात...
हे अलौकिक वैभव एकट्यानेच ओरबाडण्यासाठी....
पानं-फुलं, मुळे, खोड....
हे कुटुंबच असतं जणू झाडाचं.... आणि फुलं म्हणजे तर झाडाची गोजिरवाणी लेकरंच....
अशी सगळी लेकरं दूर निघून गेली तर....
एकटं, एकाकी पडेल ते झाड बिचारे....
मला तर अशी फुलझाडे....
हिरव्या सवाष्णीला....
अकाली वैधव्य आल्यासारखी वाटतात...
भुंड्या कपाळासारखी वाटते..
त्यांची एक न् एक फांदी मला....
......आणि..... मग
आतील सुगंधी द्रव्य संपलेल्या..
शोभिवंत..... रिकाम्या परफ्युमच्या बाटलीसारखे.... निरुपयोगी....
असं कुठे लिहिलंय का हो?
की...
त्या झाडावरील उमललेलं प्रत्येक फुल....
कुणा सौंदर्यवतीच्या डोक्यात...
किंवा देवाच्या पायांवर ......
निर्जीव थडग्यावरच वाहिले जावे....
राहू दे की..... एखाद्या फुलाला झाडावरच....
जरी तिथेच सुकले ते....तरी....
त्याचं अस्तित्व मागे उरणार....
ते एक फुल म्हणूनच ना !!
सायंकाळच्या.... मावळतीकडे कललेल्या......
अस्ताला जाणार्या सूर्यासोबतच...
कोमेजताना....समाधान असेल त्याच्या सुकणाऱ्या पाकळ्यांवर...
किमान.......
त्याला...त्याच्या मर्जीप्रमाणे.... आणि तेही....
फक्त स्वत:साठीच......
जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले...