पसारा
पसारा
मी कामानिमित्य बाहेर गेले होते. बाहेरून आले.घरात पाऊल टाकले पहावे तर घर म्हणजे इतस्थतः पसरलेले.ज्याला जी गोष्ट वाटली ती घेऊन पुन्हा जागी न ठेवता तिथेच टाकलेली पहावे तिथे पसरलेला पसारा. वाटले पुन्हा घराबाहेरच जावे. घरात जाऊच नये .म्हणजे दृष्टी आड सृष्टी. तो पसरलेला पसारा पहाण नको आsssणि तो पसारा पण आवरणे नको .
पण छे! बाहेर तरी किती वेळ रहाणार? एक तास ,...दोन तास.. .मग तरी घरी येऊन पसारा पहाणे व आवरणे आलेच ना? आणि आपल्या शिवाय कोण आवरणार ? म्हणतात ना , मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजेच मरण आलेच म्हणजे आलेच ना ओघाने
मलाच आवरणे . मग काय मी त्रासिक मुद्रेने मुलांना हांका मारीत आत आले .
"अरे मुलांनो, अरे काय रे हे ! रोजच पसारा किती करता . तुम्ही केलेला तुमचा रोजचा पसारा आवरा. मी अजिबात आवरणार नाही. हे काय रोजचेच ...त्यावेळी माझी आजी मात्र हंसत हंसत गाणे गुणगुणत होती. आणि मला मात्र तिच्या गाण्याचा त्रास वाटत होता. आधीच त्या केलेल्या सा-यांचा मला त्रास होतोय, डोके फिरतंय कोठून आवरू हे पण सुचत नाही आहे ...आ sssणि, ही मात्र मजेत गुणगुणत आहे
"अरे हा खेळ दुनियेचा
पसारा मांडिला सारा
माझी तोंडाने बडबड चालूच होती ." कुठल्या ही खोलीत जावे जिकडे तिकडे पसरलेले .रोजचे रोज किती ही आवरा तरी तेच पसरून ठेवलेले .पसारा आवरणे काही संपत नाही .मुलांच्या खोलीत जावे व पहावे तर त्यांनी त्यांच्या खोलीत पुस्तके , कपडे , खेळणी जे हवे ते घेऊन बाकी इकडे तिकडे पसरून ठेवलेले असते. काम झाले तर ते उचलून योग्य जागी ठेवतील तर ..पण छे ! त्यांचा हा पसारा आवरून हॉल मध्ये यावे तर, सकाळचे पेपर वाचून झाल्यावर वर्तमान पत्राचे पानन पान वेगळे करून वाचल्याने तेथे वर्तमान पेपरचा पसारा. सकाळी चहा नास्त्याच्या डायनिंग टेबलावर कपबशा, नास्त्याच्या डिशेस, त्याच बरोबर इतर वस्तूंचा पसारा असतो".
तेव्हा थोडक्यात काय सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत पसारा करणे आणि पसारा आवरणे चालूच असते. आणि हे रोजचे जीवन जो पर्यंत आहे तो पर्यंत पसारा आवरणे हे असेच चालणारच .एवढेच नव्हे तर जन्मापासून मरणापर्यंत पसारा करणे , तो वाढविणे आवरणे हे पण चालूच रहाणार. तर ह्या माझ्याच विचारांनी मला आजी गुणगुणत असलेल्या गाण्याचा खरा अर्थ कळला .
ती जे गाणे गुणगुणत होती ते गाणेच मला सांगू लागले, की खरा पसारा तर ह्या विश्वकर्माने करून ठेवला आहे. एवढ्या मोठ्या या दुनियेची, जगाची निर्मिती केली आहे. व त्याच्या पसा-या समोर आपला पसारा काहीच नाही. त्याने काय? काय? पसारा करून ठेवला आहे ,याची त्याला पण भ्रांत नसेल. हे जग व जगाचे रहाटगाडगे, रोजचे नियमित दिनचक्र चालविणे, रोजचे नवनवीन सृष्टीत बदल घडविणे, जुन्याचा नाश करणे, काही ठिकाणी झीज करणे तर काही ठिकाणी वृद्धी करणे हे सारे त्या विश्वकर्माचे चालूच असते. त्याचा पसारा व त्याच्या पसा-याचा व्याप फार मोठा आहे. मनुष्य जन्माला येतो तेव्हा का ssही न घेता येतो पण देवाने मानवास मेंदू बहाल केल्याने हळूहळू तो जसा मोठा होतो तसा त्याच्या बुद्धीचा विकास होतो, त्यामुळे सुरवातीस आई, वडील, बहिण, भाऊ या जवळीक नातेवाईकांच्या पसा-यात गुरफटतो .पुढे त्याचा कौटुंबिक गोतावळ्याचा पसारा वाढतो.पुढे वस्तूंचा भौतिक गोष्टींचा पसारा तो वाढवित जातो .प्रथम एक घर, एखादी गाडी करता करता जमीन, घरे ,गाडया या भौतिकसुखात अडकून सुखसोयींचा पसारा वाढवितो .मग ह्या पसा-यातून बाहेर निघणे , तो पसारा आवरणे दिवसेन् दिवस कठीण जाते . त्याचा पसारा तो वाढतच जातो.
त्या विश्वकर्माच्या पसा-यात पण त्या विश्वकर्माने केवढी जीव सृष्टी तयार करून पसारा मांडीला आहे. जल, चर .स्थळ सृष्टीचा समावेश आहे.आणि ही सर्व सृष्टी एकमेकास पूरक आधारित आहेत .त्याने केलेल्या ह्या पसा-या शिवाय एकमेकांचे जीवन शक्य नाही. या सर्व सृष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत. त्याचा हा निसर्गसृष्टीचा पसारा सर्वाना आनंददायी असतो. आपण मानवाने स्वत:केलेला पसारा आवरणे थोडे फार तरी शक्य आहे .भौतिक सुखाच्या पसा-यातून मन तृप्त करणे ,मन भरून घेणे , व त्यातून बाहेर निघणे हे थोडे फार काळाच्या योगाने ..वाढत्या वयाने जमते वा जमू शकते . जसं खूप उपभोगल्यावर मन तृप्त होवू शकते . जसे उतार वयात ओठी शब्द येतात वा येऊ शकतात की भौतिक सुख खूप उपभोगले. अशा रीतीने मानवाला पण त्याने भौतिक पसारा जो मांडीला आहे त्यातून मन काढणे अथवा तो पसारा आवरणे करु शकतो. पण मानसिक पसा-याचे काय ? ते फार कठीण आहे . माझे सखे सोयरे सोबती, माझा गोतावळा ह्या सर्व पसारा-यातून मन काढणे कठीण आहे . तो पसारा आवरण्यासाठी अध्यात्माचीच जोड लागते ,गरज भासते . संताना महापुरुषांनाच जमते. बाकी सर्व सामान्यास त्या मानसिक पसा-याचा मन:स्ताप होतो .
तर विचार करता वाटले. की खरेच, पसारा जीवनाचा मुख्य घटक आहे. एखाद दिवस घर फारच नीटनेटके आवरले असेल व स्वच्छ घरात आपण एकट्याच असलो तरी घर अंगावर येते ना ? खायला उठते. .कारण घरात माणसे, पसारा, आणि त्या पाठोपाठ घराला येणारा जो जिवंतपणा ...हा तर आपल्याला हवा हवासा असतो. ह्या विचाराने मी सर्व घर नीट केले व आजीचे गाणे मीच गुणगुणू लागले .