माझे वडिलांचे माझ्या आयुष्यातील स्थान
माझे वडिलांचे माझ्या आयुष्यातील स्थान
ज्या नात्याविषयी बोलताना, लिहताना..मनातील भावनांचं काहूर काही शांत होईना..बोलायचे म्हंटले तर शब्द फुटेना..लिहायचं म्हंटले तर शब्द आठवेना..नाही नाही म्हणता म्हणताबाप लेकीचे हे गोड नाते मांडताना..वाट मोकळी झाली माझ्या भावनांना... वडिलांचे महत्त्व समजायला आपल्याला खूप कालावधी लागतो.... अस्तित्व असे चंदनासारखे स्वतः झिजून कुटुंबाचेजीवन सुवासिक करणारे ....
माझ्या आयुष्यात आईचा खूप मोलाचा वाटा आहे परंतु पप्पा आहेत म्हणून मी आहे...मी कधी पप्पांविषयी प्रेम कृतज्ञता व्यक्त केली नाही पण आज तो दिवस ज्या दिवशी मला व्यक्त व्हावेसे वाटले... मुलगी म्हणून कधी भेदभाव केला असं मला वाटलचं नाही, माझ्या सर्व आवड,छंद,शिक्षण त्यांनी योग्य रीतीने पूर्ण केले. आजपर्यंत ते कधी माझ्यावर चिडल्याचे मला आठवत देखील नाही.याऊलट, मी कधी चिडले तर म्हणतात कसे?माई, डोक्यावर बर्फ अन् जिभेवर साखर.
सत्कर्म केल्याचं समाधान त्यांच्याकडे नक्कीच आहे, स्वच्छ पाण्यासारखे निर्मळ आणि नितळ मन तर आजपर्यंत मी बघितलं नाही, नेहमीच दुसऱ्याचे हित करणे, कधीही कोणाचे मन चुकूनही न दुखवणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू, पडद्या मागचा कलाकार म्हणजे माझे वडील...आम्ही दोघी बहिणी नाशिकला शिकायला गेलो तेव्हा अनेक लोकांनी टीका केल्या परंतु मला अभिमान वाटतो की माझ्या पप्पांनी टीकाकरांकडे लक्ष न देता आम्हाला उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत बनवले.
आज त्यांच्या डोळ्यात आमच्या यशाची चमक मला दिसते, आमच्या विषयीचा अभिमान, आनंद, समाधान दिसते यासारखं दुसरे सुख नाही.
आपल्या मुलीला सुखी पाहण्यासाठी,दुसऱ्याच आयुष्य उजळवून टाकण्यासाठी स्वतःच्या काळजाच्या तुकड्याचं कन्यादान करतो हीच वडिलांची महती!
तुम्ही म्हणतातचं मला , माई आपले कर्म चांगले असले की सर्व चांगलच होते....याच तुमच्या चांगल्या कर्मांमुळे आज मी या जगात आहे....आपण सर्व सोबत आहोत....असेच नेहमी राहुयात....
सोबतीने, एकजुटीने सदासर्वदा राहू
आले जरी कितीही संकटे विजयीच होऊ