घर
घर
वर्षभरात असती तीन ऋतू
पावसाळा हिवाळा उन्हाळा
पण घराच्या प्रेमाला मात्र
असे एकच ऋतु जिव्हाळा
घर म्हटले की जिव्हाळा आलाच ,आणि हो ! का नसणार ? मनाला शांती, तनाला विसावा , सर्व ऋतुतून निवारा देणारे.. शांती स्थान असते... ते घर. म्हणूनच, तर बाहेरून आलो की,
" चला आलो बाबा एकदाचे घरी असे निश्वासाचे." उद्गार निघतात ते काय उगीचच.
घर , लहान असो वा मोठे ते महत्त्वाचे नसते. घरात मिळणारे सुख ,आनंद आपलेपणा हा महत्त्वाचा असतो. कारण त्या घराला गृहीणी घरपण देण्याचे काम करत असते. त्या मिळणा-या घरपणाने -आपलेपणाने प्रत्येक व्यक्ती ला घराची ओढ असते. थकून आलेल्या पतीला दारात वाट पहाणारी बायको दिसली की तन- मन सुखावते. कारण आत्मियता मिळते.
हे सारे घराला ... घरपणा बरोबर देण्यात येणा-या संस्कारात येते. मुले शाळेतून येऊन पाटी पुस्तक ठेवून अंगणात खेळतांना पाहून , कामावरुन आलेल्या आईबाबांचे मन सुखावते . कारण आजी आजोबा वडील धारी मंडळी यांचे संस्कार मनास आनंद देतात. आणि हे सारे या चार भिंती व वरचे छत यात घडतात म्हणून त्याचे *घर* बनते.
घर स्वच्छ ठेवणे तर महत्त्वाचे आहेच . कारण जेथे स्वच्छता तेथे लक्ष्मीचा वास असतो. अस्वच्छता म्हणजे आळस.... आळस असता मग कसा घडणार विकास ..आणि विकास नाही प्रगती नाही ... तर लक्ष्मी नाही हे ओघाने आलेच.
तर ,अशा रीतीने घर या शब्दा बरोबर सारे संलग्न असते. घरात सर्व सुख सोयी प्रत्येकाला उपलब्ध असतात असे नव्हे . घरात रहाणारी व्यक्ती असलेल्या सुख सोयी व असलेल्या कमतरतेशी तडजोड करीत आनंद मिळवित रहाणे ही घराची शिकवण असते. वेळेनुसार मग सुखसोयी करुन घेता येतात. त्याच बरोबर येणारे सणवार , उत्सव साजरे होतात. पाहुण्यांची ये- जा चालते. घरात नेहमी गप्पांच्या मैफिली रंगतात. हास्याची कारंजी उडतात. आणि मग म्हटले जाते. वा काय हसते घर आहे. आता हे घर कुठले हसणार ?
.तर घरातील व्यक्तींचे स्वभाव ..विचारांचे देवाण घेवाण.. हे सारे घरास जीवंतपणा देण्यात अपसुकच काम करत असतात. व त्यामुळे घरातील वातावरण सदैव प्रसन्न रहाते.
आणि , त्या साठी घरापुढे बाग बगीचा पुष्करणी हे असले पाहिजेच असे नाही. ते सारे शोभनीय आहे. मंद प्रकाशात तेवणारी देव घरातील समई घराचे पावित्र्य दाखवून जाते. प्रकाशमय करते. आणि असे घर मंदीर वाटू लागते. म्हणून
प्रत्येकाला त्या घराशी जिव्हाळ्याचे नाते जुळते जिव्हाळा वाढतो.