Akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

Akshata alias shubhada Tirodkar

Others

आपुलकी

आपुलकी

3 mins
573


जोशी काकीचं घर आज बंद होतं. काकी कुठे तरी बाहेर गेली होती, काकाही दिसत नव्हते म्हणजे ते पण कुठे तरी गेले असतील. इन मिन दोन माणसं घरात राहत होती. त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. वर्षातून आठ दिवस आपल्या कुटुंबासह राहायला यायचा पण जोशी काका काकूंचा स्वभाव एवढा चांगला होता की त्यांचे शेजारी त्यांना कधीच एकटे पडू देत नव्हते. काका-काकूंनी त्यांच्या मुलाला म्हणजे सौरभला भारतात परतण्याचे नेहमी सांगत पण तो काही मनावर घेत नसे. आपण तुमच्याबरोबर नाही पण आपलं लक्ष तुमच्यावर असेल ना म्हणून त्याने पूर्ण घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते.


शेजारचे देवधर विचारात पडले नेहमी सांगून जाणारे आज कुठे बरं गेले असतील. सकाळपासून दाराला कुलूप दुपार होत आली तरी कुलूप... फोन फक्त जोशी काकू वापरत त्यांचा नंबरपण स्वीच ऑफ येत होता. संध्याकाळपर्यंत परततील म्हणून ते निघून गेले. रात्रीचे आठ वाजले. देवधरांनी पहिले तर दाराला कुलूप... आता मात्र त्यांना वेगळी शंका भासू लागली.


त्यांनी इतरांना सांगितले, ते सगळे काळजी करू लागले कारण त्या दोघांनी लळा तसा सर्वांना लावलेला.

भावे म्हणाले, "नातेवाईकाकडे गेले असतील राहायला"

तेवढ्यात देशपांडे बाई म्हणाल्या, "नाही नाही ते कधीच त्यांच्या नातेवाईकांकडे राहायला गेले नाही एवढ्या वर्षात आता जाणे अशक्य आणि तसा काही प्लॅन असता तर जोशी काकूंनी आम्हाला सांगितलं असतं असं गुपचुप त्या गेल्या नसत्या." आता सगळ्यांच्या डोक्यावर चिंता दिसू लागली.

आपटे काका म्हणाले, "सौरभला फोन लावा. त्याला माहित असेल."

त्यांनी सौरभला फोन लावला पण तोही लागला नाही.


रात्रीचे दहा वाजले कोणीच जेवले नव्हते. सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता गेले तरी कुठे ????

सगळेचजण जोशींच्या घराच्या पायरीवर बसून होते. त्यांनी सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला होता आज बारा वाजेपर्यंत वाट पाहायची नाहीतर सरळ पोलीस स्टेशनमध्ये जायचं.


तेवढ्यात रिक्षाचा आवाज आला आणि रिक्षा येऊन थांबली. आतून जोशी काका-काकू उतरले. त्यांना पाहून सगळ्यांचा जीव शांत झाला. सगळे जण रिक्षाजवळ गेले. काकांनी ड्रायव्हरला पैसे दिले, रिक्षा गेली आता सगळ्यांनी प्रश्नाचा भडीमार सुरु केला.

त्यांची ती काळजी पाहून जोशी काकू म्हणाल्या, "अरे हो तुम्ही सगळेच इथे काय करता जेवलात तरी की नाही."

देवधर म्हणाले, "काय काकी कुठे गेलेलात तुमचे घर कधी बंद नसतं आणि जाताना तुम्ही सांगून जाता ना... मग रात्र होत आली... फोन बंद... तुमचा पत्ता नाही, जीव कासावीस होणार ना..."


काकीचे डोळे भरून आले, "नाते फक्त ओळखीचे आहे आपले पण तुम्ही सर्वजण केवढा जीव लावता आम्हाला भूक तहान विसरून वाट पाहात बसलात काही नाही रे आज आमच्या नातवाचा वाढदिवस तो काही जवळ नाही त्याचे लाड करायला आणि त्याला काही गिफ्ट घेतलं तर तो येणार वर्षानी आणि ते त्याला थोडंच आवडतं मग या वेळी मी आणि काकांनी ठरवलं आपण वाढदिवस अनाथाश्रमात साजरा करायचा. आम्हाला कोणी असूनही बरोबर नाहीत पण ज्यांना कोणी नाहीत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं असं वाटलं संपूर्ण दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवला होता. म्हणून तर आम्ही लवकर निघालो आणि उत्साहाच्या भरात कोणाला सांगायचं विसरून गेलो. संपूर्ण दिवस जगलो आणि आता घरी परतलो तसंही घरी आमचं आहे कोण... सौरभने बसवून घेतलेले कॅमेरे फक्त आमच्यावर लक्ष ठेवतात. माफ करा आमच्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास झाला."


सगळेचजण एकदम म्हणाले... माफी कसली मागता काकी, तुम्ही दोघेजण आमची माणसं आहात आणि आपल्यासाठी कोणी करत नाही का...

देशपांडे काकू म्हणाल्या, डोळे पुसा ते आणि चला जेवून घ्या आणि सगळे जोशी काकूंच्या घरातच पंगतीत बसले. काकांनी घर भरलेले पाहून हळूच डोळ्यातल्या आसवांना आपल्या रुमालाने लपवले...


Rate this content
Log in