बळीराजा
बळीराजा
आभाळाकडे पाहून
त्याची तहान-भूक भागते ,
अंतरातील आर्तता ही
त्याच्या डोळ्यांमध्ये जागते......
म्हणूनच
अंबर जणू पिता त्याचा
माती आहे माय ,
जन्मोजन्मीचं नातं जुळलंय
त्यास कुणाचं भय......
निसर्गाशी एकरूप होऊन
मातीत हा राबतो,
कष्टाने, स्वबळावर
रात्रंदिवस जागतो......
दोष कसा द्यावा निसर्गास
माणूसच स्वार्थी बनला,
कष्ट करूनही कधी हा निसर्गच
शेतकऱ्याचा काळ ठरला......
अवकाळी पाऊस,
कधी गारपीटांचा मारा
कष्टकऱ्यांच्या वाटेलाच का
हा नशिबाचा खेळ सारा......
तरीही तो लढत राहतो
झुंज देतो निसर्गाशी,
शेतात पिकवितो माणिक-मोती
स्वतः राहून उपाशी......
प्रत्येक क्षणी आशावादी राहून
पित्याचे आभार मानतो,
ओंजळीतल्या दाण्याचं मोल
फक्त तोच एक जाणतो......
सळसळणाऱ्या पिकातून
डोलतो हा शेतकरी,
घामाच्या धारांतून
बोलतो हा कष्टकरी......
असा हा बळीराजा
मिळवी कष्टाची भाकरी
हतांवरच्या रेषांपेक्षा
शोधी कष्टाची शिदोरी......
असा हा असामी
कष्टकरी बळीराजा
निसर्गाच्या प्रकोपाने
का भोगावी त्याने सजा ?
म्हणूनच......
"झाडे लावा,झाडे जगवा "
करते मी आवाहन
मग शेतकऱ्यांच्या कष्टाने होईल
ही माती ही पावन !