Sayali Kulkarni

Others

3.3  

Sayali Kulkarni

Others

सोसेल तेवढाच सोशल मीडिया

सोसेल तेवढाच सोशल मीडिया

4 mins
238


"आई... अगं आई...मला कुशीत घे ना....काय तो मोबाईल पाहात बसली आहेस.. किती वेळ झाला.. खूप झोप आलीय गं...ठेव ना तो मोबाईल.. "रात्रीचे बारा वाजले होते... लहानग्या सोनुला झोप अगदी अनावर झाली होती... पण ती डोळे ताणून ताणून आपल्या आईच्या कुशीत शिरण्याची वाट पहात होती... "अगं सोनु, थांब जरा पाच मिनिट.. एवढा सेल्फी टाकते फेसबुकवर आणि एक छान पोस्ट आहे ती वाचते आणि मग घेते हं तुला कुशीत.."सोनूची आई सोनूकडे कटाक्ष टाकत म्हणाली आणि परत फोनमध्ये रममाण झाली...अशीच पंधरा वीस मिनिटे गेली...अखेरीस त्या माऊलीने फोन बाजूला ठेवला आणि ते लेकरू आपल्या आईच्या कुशीत शांत झोपी गेले.... सोशल मिडीयाच्या व्यसनाचे नात्यांवर होणारे दुष्परिणाम दर्शवणारा हा एक बोलका प्रसंग...!!असे थोड्याफार फरकाने घडणारे एक ना अनेक प्रसंग तुम्ही सर्वांनीच अनुभवले असतील.... अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, शेंबड्या पोरापासून ते मोठ्या आॅफिसर पर्यंत जो तो सोशल मीडियावर चोवीस तास हजर आहे पण घरातील आपल्या माणसांशी संवाद साधायला मात्र कुणालाही वेळ नाही ही आत्ताच्या काळातील एक मोठी व्यथा आहे...जो तो आभासी जगाशी पूरेपूर संवाद साधत असतो पण घरातल्या लोकांच्या मनात डोकवायला, त्यांच्याबरोबर मनमुराद गप्पा मारायला, पोट दुखेपर्यंत हसायला मात्र कुणालाच वेळ नसतो..


सोशल मीडिया मुळे सगळे जग जवळ आले आहे पण रोजची घरातील माणसे एकमेकांपासून मनाने दूर गेली आहेत असे म्हणणे गैर होणार नाही....जर घरातल्याच लोकांना एकमेकांसाठी वेळ नसेल तर बाहेरच्यांकडून काय अपेक्षा करणार???सोशल मीडिया माणसांना जोडते, जगातील अगदी कोणाशीही एका मिनिटात आपण संवाद साधू शकतो असे आपण म्हणतो आणि हे खरे देखील आहे...पण 'फेसबुक वर शंभर मित्र आणि गावात विचारत नाही कुणी कुत्रं' अशी गत असेल तर त्याचा काय फायदा?? पूवीच्या काळात लोक एकमेकांच्या घरी जात असत, एकमेकांची सुखदुःखे वाटून घेत असत... गावात एखाद्या घरात काही अडचण आली तरी सारा गाव त्यांच्यामागे ठामपणे उभा राहात असे...ही अशी परिस्थिती आत्ता आपल्याला दिसते का???प्रत्येक घरटी किमान एक ते कमाल चार फोन आणि प्रत्येक फोनवर सोशल मीडिया एवढी साधने असूनही जर एखाद्या घरावर संकट आल्यावर आसपासच्या लोकांना त्याची माहिती देखील नसेल तर सोशल मीडिया, फोन या साधनांचा उपयोग तो काय??खरा दोष कोणाचा सोशल मिडियाचा की आपला हे जाणण्याची आणि समस्येवर समाधान शोधण्याची खरे तर आत्ता गरज आहे...यामध्ये संपूर्ण दोष सोशल मीडियाचा आहे का तर नक्कीच नाही..दोष आहे तो त्याचा अयोग्य आणि अतिरिक्त वापर करणाऱ्या आपल्या सर्वांचा...सोशल मीडियाचा योग्य आणि आवश्यक तेवढा वापर केल्यास ते एक वरदानच आहे असे मी म्हणेन...फक्त सुवर्णमध्य साधणारी सीमारेषा ओळखता आली म्हणजे झाले..!!.


माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या जशा प्राथमिक गरजा आहेत तशीच माणसाची अजूनही एक गरज असते ती म्हणजे भावनिक गरज आणि ही गरज पूर्ण करतो तो असतो आपला माणूस...डोळे भरून आल्यावर पुसण्यासाठी, वाट चुकल्यावर रस्ता दाखवण्यासाठी, खचून गेल्यावर सावरण्यासाठी, जिवाभावाची माणसेच लागतात ...आणि अशी माणसे सहजासहजी फक्त सोशल मीडियाचा वापर करून मिळत नाहीत तर ती जोडावी आणि जपावी पण लागतात आणि त्यासाठी गरज असते ती संवादाची, एकमेकांची दखल घेण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची...आता एक सोपे उदाहरण सांगते...वाढदिवस असला की व्हाट्सऍप व फेसबुक वर शुभेच्छांचा नुसता पाऊस पडतो... पण खरं सांगा या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजून गेल्याचे समाधान मिळते का??वाढदिवसादिवशी अनपेक्षितपणे आलेला आपल्या एखाद्या खास मैत्रीणीचा फोन किंवा मित्राने घरी आवर्जून येऊन दिलेली भेट ही जास्त सुखावून जाते...पूवीर्ची लोकं सोशल मीडियाने जरी जोडलेली नसली तरी ती मनाने जोडलेली होती..म्हणून तेव्हा कोणत्याही प्रसंगात कधीही एकटे वाटत नसे आणि त्याचबरोबर नैराश्य, अस्वस्थता या समस्या देखील भेडसावत नसत...


सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या व्यसनामुळे जसा नाते संबंधांवर परिणाम होतो तसाच आरोग्यावरही होतो...आपला अमुक एक मित्र फाॅरेनला जाऊन आला, आपल्या तमुक मित्राने कार घेतली, आपण टाकलेल्या पोस्टला लाईक्स किंवा कमेंट्स नाही मिळाले म्हणून उदास होणारे हजारो जण आपल्याला दिसतात... हेच नैराश्य प्रमाणाबाहेर वाढले की असे लोक डिप्रेशनची शिकार होतात...सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे किंवा फेक माहितीच्या झालेल्या चोरी, फसवणूक, बलात्कार या सारख्या गुन्ह्यांमध्येही आजकाल लक्षणीय वाढ झालेली आपल्याला दिसून येते... म्हणून कोणत्याही माहिती वर विश्वास ठेवण्याआधी किंवा ती पुढे पाठवण्याआधी तिची विश्वासार्हता तपासून पाहायला हवी आणि आपली कोणतीही खाजगी माहिती सांगताना खबरदारी घ्यायला हवी...तर हे झाले सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापराने झालेले दुष्परिणाम... 

पण ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपण जीवन फुलवू देखील शकतो...आमच्या शेजारच्या आजोबांनी फेसबुकचा वापर करून आपल्या जुन्या शाळेतल्या मित्रांशी संवाद साधला आणि आता ते महिन्यातून एकदा एकत्र भेटतात, रमतात आणि एकमेकांचा आधार ही बनतात.. आपला छोटा मोठा व्यवसाय असेल तर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली उत्पादने पोचवू शकतो...गृहिणी यु ट्युब चॅनेलच्या मार्फत घरबसल्या आपली पाककला सादर करून कुटुंबाला हातभार लावू शकतात.. नाच, वादन, गायन अशा कोणत्याही कलेचा खजिना आपल्या समोर खुला होतो आणि तो ही केवळ काही क्लिकवर, घरबसल्या आणि मोफत...यू ट्यूब चॅनेल वर पाककृती बघून हॉटेलसारखे रूचकर जेवण आपण आपल्या माणसांना खाऊ घालू शकतो... आत्ता सध्या कोरोना महामारी च्या काळात तर सोशल मीडिया हा मोठा आधार झाला आहे गूगल मीट, झूम अशा सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून शाळा, काॅलेज आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देत आहेत आहेत आणि व्हिडिओ काॅल, काॅन्फरन्स काॅल हा अंतराने व परिस्थितीने दूर असलेल्या लोकांना संवाद साधण्यासाठी, आॅनलाईन पद्धतीने एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी दुवाही झालेला आहे...शेवटी एवढेच म्हणेन सोशल मीडिया हे एकविसाव्या शतकातील शाप नाही तर वरदानच आहे पण फक्त एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे त्याचा योग्य आणि आवश्यक तेवढाच वापर...!!!


Rate this content
Log in