संवाद
संवाद
सकाळी सात वाजेची वेळ थंडगार हवा अंगावर घेत मी गॅलरीत उभी होते. हा रोजचाच नियम. दहा मिनिट सारं काही विसरून दिसणारं निसर्गचित्र पाहात उभी होते. सारं काही स्तब्ध, शांत, प्रसन्न वातावरण. आंब्याच्या झाडावर पडलेली कोवळी किरणं आणि त्याने चमकणाऱ्या त्या बाळ कैऱ्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. मनात म्हटलं बरं झालं लाॅकडाऊन आहे नाही तर रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी दगड मारून पाडल्या असत्या, आता निदान त्या सुखरूप आहेत झाडावर.
खरंच किती त्रास देतो ना निसर्गातल्या प्रत्येक घटकाला आपण. फिरायला जातो नी दुसऱ्या दिवसाच्या पूजेसाठी न उमलेल्या कळ्या तोडून आणतो. सकाळची शांतता वाहनांचे आवाज, प्रत्येकाला पोहोचायची घाई असते आणि कर्कश आवाज करत जाणारी वाहने, शाळेत जाणारी मुलं, रोजची वर्दळ आणि धावपळीचा विचार करत असताना मला किलबिल एेकू आली. आंब्याच्या झाडावर चिमणी आणि कावळा यांच्यात संवाद होत होता.
चिमणी म्हणाली कावळ्याला, अरे बाबा इकडचं तिकडचं काही खात जाऊ नको. कोणाच्या खिडकीत वाळवणात तोंड घालू नको. तुला आहे नॉनव्हेज ख
ायची सवय जाशील हॉटेलात वगैरे नाही तर नसता डोक्याला ताप.
या वर कावळा विचारतो, का गं चिमणे असं काय बोलतेस?
चिमणी म्हणाली, ती बघ माणसं कशी घरात बसलीत, काय तो कोरोना नावाचा रोग आलाय ना. माणसांना दुसरा पर्यायच नाही रे बिच्चारे...
खरं आहे तुझं चिऊ... माणसांनी आपली घरटी असलेली झाडं तोडलीत, आपली छोटी छोटी पिल्लं गेलीत, न उबवलेली अंडी फुटलीत, नुसती हावरट जात माणसांची. तरीच
म्हटले एवढा सन्नाटा कसा? नी रस्त्यावरही काळी तोंडं बांधून फिरणारी जमात कोणती?
हो रे कावळ्या तुझं म्हणणं पटतंय रे मला... पण माणसांची मुलं बाहेर खेळताना दिसत नाहीत, दंगा नाही गर्दी नाही... सगळं कसं सुतक लागल्यासारखं, स्तब्ध मला नाही आवडत रे... आपल्याला त्यांची सवय झाली आहे.
चिमणीच्या नाराजीचा सूर एेकून कावळा म्हणाला, अगं माणसाला देवाने बुद्धी दिली आहे तो शोधून काढेल कोरोनावर उपाय. पण उपाय मिळेपर्यंत रहायला हवं शहाण्यासारखं घरात. त्यांचा संवाद कानात साठवून मीही सुन्न झाले होते.