vishwanath shirdhonkar

Others

4  

vishwanath shirdhonkar

Others

मराठी कथा - रंगातले रंग !!--

मराठी कथा - रंगातले रंग !!--

12 mins
15.9K


व्यासपीठावरून वक्ता बोलत होते . अचानक ते बोलता बोलता थांबले . सगळ्यात मागच्या रांगेवर त्यांनी कटाक्षाने बघितले . एक क्षण बोलणे थांबविले . विषय बदलत ते म्हणाले , " मला असं वाटतं शेवटच्या रांगेत बसलेल्या चौघांनी माझं बोलणं शांतपणे ऐकल तर बरं होईल . इतरांनाही त्रास होणार नाही . शेवटी आपण सेवानिवृत्तीनंतर येणाऱ्या समस्यांवर चर्चा करीत आहोत . आणि ते सर्वांच्याच कल्याणासाठी आहे . " 

-ते चौघे चपापले . नंतर हसले व मान हलवून शांत बसण्याची खात्री दिली . वक्ता पुन्हा विषयावर बोलू लागले . पण त्या चौघांचे चाळे मात्र सुरूच होते . ही उनाड म्हाताऱ्यांची चौकडी बऱ्याच वर्षांनंतर एकत्र सोबत आली होती . जिवलग मित्रांची ही उनाड चौकडी वेगवेगळ्या शहरातून , आपापल्या सेवानिवृत्तीनंतर फक्त एक दुसऱ्याच्या भेटीसाठीच या संमेलनात आलेली होती . 

-" मी म्हणत नव्हतो गप्प बैस . " त्यातला चिंटू म्हणाला . चिंटू म्हणजे गणेश शंकर अय्यर मद्रासी . 

-" मी नाही . हा वाहियात अली हसला जोराने ." रामू म्हणाला. रामू म्हणजे रमाशंकर

अवस्थी . 

- " पुन्हा वाहियात अली ? " वाहिद अलीने रामूच्या पाठीवर हलकासा एक धपाटा दिला , " माझं नाव वाहिद अली आहे . सर्वांसमोर वाहियात अली म्हणायचे नाही . " वाहिद अली रागाने म्हणाला .

-" म्हणजे एकट्यात म्हणायचं ? " रामू हसत म्हणाला . 

-" लाज नाही वाटत वाहियात अली म्हणायला ? " वाहिद अली आता चिडला , " आपण सगळे आता म्हातारे झालो आहोत . " 

-" सगळे नाही . तुम्ही तिघं . मी अजून ही सरदार आहे . सरदार अमरीकसिंह . सरदार कधीच म्हातारा होत नसतो . समजलं . "  सरदार अमरीकसिंह म्हणाला .  

-" होय . तेव्हाच पन्नाशीनंतर मुल झालं ."चिंटू म्हणाला . पुन्हा सर्व हसले .      

-व्यासपीठावरून वक्त्याने एकदा पुन्हा या चौघांकडे रागाने बघितले . वाहिद अलीने चिंटूच्या मांडीवर चापटी मारली , " गप्प बैस . तो आपल्याकडेच बघत आहे . काय बोलायचं आहे , नक्की तेच विसरेल तो . गप्प बैस ! " 

-तेव्हढ्यात हॉंलमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला . हे पाहून अमरीकसिंह देखील टाळ्या वाजवू लागला . बाकी तिघं समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते . अमरीकसिंहला टाळ्या वाजविताना बघून चिंटू म्हणाल , " आता पुरे कर . सगळे थांबले टाळ्या वाजविण्याचे . हीच .... हीच सवय अजून तुझी गेलेली नाही . "

-" कोणती ? " अमरीकसिंह ने विचारले . 

-" जेव्हा तुला कधी काही समजत नाही तेव्हा तू टाळ्या वाजवितो . " 

-अमरीकसिंह ओशाळला . 

-" आता मी सांगितल्या शिवाय टाळ्या वाजवयाच्या नाही . " चिंटूने जणू ताकीदच केली . परत एकदा सर्व हसले . 

-" चहा घ्यायचा का ? याचं भाषण फार कंटाळवाणं होत चाललंय . " अमरीकसिंह म्हणाला . 

-" ओ . के . " चिंटू म्हणाला , " नाही तरी तुला याचं भाषण समजणारच नाही , मग चहाच घेतलेला बरा . " 

-एक एक करत सर्व म्हातारे उठले व जवळच असलेल्या एका रेस्टारेंटमध्ये येऊन बसले . 

-" काय रामू , कशी काय प्रकृती आहे तुझी आता ? " वाहिद अलीने विचारले .

-सर्व मित्र गंभीर झाले . रमाशंकर अवस्थीची बायको केंसरने त्याच्या लग्नाच्या दहा वर्षांनतरच वारली होती . एक मुलगी होती . मुलीसाठी रमाशंकर अवस्थीने दुसरं लग्न केलं नाही . पण आता मुलीचे लग्न झाले व ती अमेरिकेतच स्थायी झाली . आता या ६५ वर्षाच्या वयात इथं हा एकटाच आहे . त्यात मधुमेह व ब्लडप्रेशरने पछाडलेला . एकदा बायपास ऑपरेशन झालेलं . अशक्तपणामुळे कंटाळलेला . स्वत:च्या प्रकृतीकडे बघता रमाशंकर अवस्थीनेच सर्व मित्रांना एकदा भेटून घ्या , म्हणून फोन करून आग्रहाने या संमेलनात बोलावून घेतले होते . म्हणूच चाळीस वर्षांपेक्षाही जास्त मैत्री बाळगलेले चौघे या संमेलनात एकत्र झाले होते . वाहिद अलीने परत एकदा विचारले , " अरे बाबा , कशी प्रकृती आहे तुझी ? बरी आहे ना ? औषधपाणी नियमाने घेतोस ना ? " 

- " कशी असणार बाबा ? " रामूने उलट वाहिद अलीलाच प्रश्न केला , " एकट्याचा संसार . मुलगी सारखी अमेरिकेला बोलावतेय . पण त्या परक्या देशात आपलं कोणी ओळखीचंच नसणार . मग काय करणार तिथं ? अरे , आपण भले , आपला देश भला . मेल्यावर इथं तुम्हा मित्रांचा खांदा तरी मिळेल , तिथं मिळणार आहे का ? " 

-" होय . " चिंटू म्हणाला , " इंटरनेटने पाठवू . काळजी करू नको . " परत चौघं जोराने हसले . 

-" आता तू इथून परत बँगलोरला जायचं नाही , आणि तिथं एकटं राहण्याची देखील गरज नाही . माझ्यासोबत चल , तिथं माझ्या घरी राहा , " चिंटू म्हणाला . 

-" काय करेल रे हा तुझ्याकडे एकटा येऊन . नुसता कबाब मे हड्डी .तुमचा दोघांचा राजाराणीचा संसार . या म्हाताऱ्याला दत्तक घेणार आहात का ? " अमरीकसिंह म्हणाला . पुन्हा सर्व जोराने हसले .  

-गणेश शंकर अय्यर हसता हसता थांबला . त्याचा चेहरा आता गंभीर झाला होता . तो म्हणाला , " माझं जाऊ दे रे , पण बायको फार आटापिटा करते . मुल नाही म्हणून तिची मन:स्थिती फार खराब झालेली आहे . या वयात तिला सांभाळता सांभाळता मला स्वतःलाच फार अस्वस्थता वाटते . सर्व कसं सांभाळावं काही कळत नाही . आता या वयात बायकोच्या हट्टापायी किंवा तिच्या समजुतीखातीर म्हणा , मुलही दत्तक घेता येत नाही . आता मुल दत्तक घेण्यासाठी फार उशीर झालेला आहे . आमचं ही आता कितीस असं आयुष्य उरलं आहे ? मग त्या मुलाचं काय होणार ? काय करू काहीच समजत नाही . घर आहे , पैसा आहे , पण काय करणार पैश्याचं ? सगळ व्यर्थ ." चिंटूचे डोळे पाणावले . 

-" ए चिंटू ... मला .. क्षमा कर ... " अमरीकसिंह म्हणाला , " मला असं म्हणायचं नव्हत . तुला दु:खवायचं नव्हत रे . " सरदार अमरीकसिंह ही आता गंभीर झाला . सारखा दाढीवरून हात फिरवीत होता . काय बोलावं , हे कोणालाही काही कळत नव्हतं . रामूचं एकट्याच दु:ख होतं आता चिंटूच्या निपुत्रिक असण्याची वेदना सर्व मित्रांना जाणवत होती . थोड्यावेळ वातावरण असेच गंभीर होते .मग चिंटूच अचानक बोलला , " आश्चर्य आहे .... फारच आश्चर्य . "

-सर्वांनी एका स्वरात विचारले , " काय ... ? "

-"आपला अमरीकसिंह देखील गंभीरतेने विचार करू शकतो . " एकदा परत हे सर्व उनाड म्हातारे जोराने हसले . सरदार अमरीकसिंहचे दाढीवर हात फिरवणे केव्हाच थांबले होते . 

- " नाही पण खरंच तू आता एकटा राहू नको . " चिंटू म्हणाला , " तुला आठवतंय का नोकरी मिळाल्यावर आपण दोघांनी भाड्याने एकत्र एकच खोली घेतली होती . दोघे मिळून स्वयंपाक करायचे . खूप सिनेमे पाहायचे . खूप धमाल करायचे . किती चांगले दिवस होते ते . "

- रामू त्या जुन्या आठवणीत रमला , " होय . किती बेफ्रिकी होती . तुला आठवतंय माझं ते आजारपण . " 

-" आठवतंय न . " चिंटू म्हणाला , " तू तापाने फणफणत होता . सारखं ' आई आई ' म्हणून बरळत होता .चार दिवस रजा घेऊन मीचतर तुझं सगळं केलं होतं , आणि तू होता की घरचे घाबरतील आणि नोकरी सोडायला लावतील  म्हणून घरी कळवायला मला सारखा नाही म्हणत होता . शेवटी चार दिवसांनी मीच तुला तुझ्या घरी नेऊन सोडलं होतं . काळजी करू नको . आताही करेन रे मी तुझं . माझी बायको देखील तशी प्रेमळच आहे , सांभाळेल आम्हा दोघा म्हाताऱ्या मुलांना . "

- "दोघांनाच कशाला ? तिघांना . " वाहिद अली मधेच बोलला , " अरे , मी पण एकटाच आहे ना ? मग मी पण येतो ? " 

- " ए वाहियात अली , तू कशाला हवा मधे ? " सरदार अमरीकसिंह ने विचारले . 

-" पुन्हा वाहियात अली ? " वाहिद अली रागाने म्हणाला , " माझं नाव वाहिद अली आहे . अरे गेल्या चाळीस वर्षांपासून बोंबलतोय की माझं नाव वाहिद अली आहे . तूचं माझं नाव सर्वांमध्ये बिघडवून ठेवलं आहे . सोडणार नाही तुला . "

- " आता या वयात काय करणार ? फार तर तूही माझं नाव बिघडवून टाक . यापेक्षा  माझं बारसंच करून टाक  एकदा . "  सरदार अमरीकसिंह म्हणाला . सर्व जोराने हसले . 

-" असू दे रे .... रागवू नको . " सरदार अमरीकसिंह हसत म्हणाला , " पण मला सांग तू या चिंटूकडे जाऊन काय करणार ? तुझी मुलगी आहे ना तुझ्यासोबत ? मग ? " 

- वाहिद अलीचा विषय निघताच सर्व गंभीर झाले . वाहिद अलीचा चेहरा उदास झाला . 

- " अल्लाने नशिबात काय लिहून ठेवले आहे काय ठाऊक ? " वाहिद अली म्हणाला .                      - " का... रे.. काय झालं ? " रामूने विचारले . 

- " तुम्हा सर्वांना माहीतच आहे की माझ्या बायकोने म्हणजे वहिदाने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती . आमच्या दोघांमध्ये सतत वादाचे कारण म्हणजे माझं माझ्या भावाबहिणीवर जास्त प्रेम असणं , आणि प्रत्येक बाबतीत अम्मी व अब्बूनां महत्व देणे तिला आवडत नव्हते .  अब्बूची एक छोटीशी सायकल दुरुस्तीची दुकान होती . म्हणून अब्बू फार हलाखीत जगत  होते  . अम्मी सतत आजारी असायची . आम्हा सर्वाना वाढविण्यात , आणि अम्मीच्या आजारपणात अब्बू कर्जबाजारी झाले होते . मला नोकरी मिळाल्यावर माझ्याकडून त्यांना अपेक्षा असणे स्वाभाविक होते . पण वहिदाला अब्बूना मी पैश्यांची मदद करणे मुळीच आवडत नव्हते . शिवाय धाकट्या भावांचे व बहिणींचे शिक्षण नीट व्हावे ही माझी इच्छा होती . बहिणीचा निकाह देखील व्हायचा होता . म्हणून वाद खूप व्हायचे . 

-असाच एकदा वाद वाढला , आणि मी नसताना संतापाच्या भरात वहिदाने स्टोव्हने स्वतःला पेटवून घेतले . सर्व नातेवाईकांनी आम्हालाच दोषी ठरविले . हुंड्यासाठी बायकोचा बळी घेतला , हे लांच्छन सुद्धा मला सहन करावे लागले . त्या दिवसांमध्ये आम्हां सर्वांचं जगणं कठीण झालेलं होतं .  या गोष्टीला आता तीस वर्षं झाली .अब्बूनी माझ्या दुसऱ्या निकाहासाठी फार आग्रह केला . बरीच स्थळं देखील आली . अब्बू सारखे म्हणायचे , ' आपल्या धर्मात चार निकाह होऊ शकतात . तुझा तर अजून एकच निकाह झाला आहे . '  पण दर वेळेस मीच नकार दिला  . वहिदावर माझं खूप प्रेम होतं . आज इतक्या वर्षांनंतरसुद्धा तिचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नाही . " वाहिद अली सांगत होता आणि मित्रांच्या काळजावर वेदनांचे ठोके पडत होते . 

-" जाऊ दे रे ... " रामू म्हणाला , " नशिबात जे भोग असतात ते भोग भोगावेच लागतात . पण आता त्याचं काय ? तुझी मुलगी आहे ना , तिच्याकडे बघ . नव्या हुरूपाने जगण्याचे सगळेच मार्ग सापडतील . काळजी करू नको . "

- " आता तेच तर दु:ख आहे . " वाहिद अली म्हणाला , " वहिदाच्या आत्महत्येनंतर शहरात व समाजात आम्हाला तोंड दाखवायला जागा नव्हती .वहिदा गेली तेव्हा झीनत चार वर्षांची होती . वहिदाचीच नव्हे तर झीनत ही घरात सर्वांचीच लाडकी होती .वहिदा नेहमी म्हणायची की तिची इच्छा झीनतला खूप शिकविण्याची आहे . खूप शिकली झीनत . आता चौतीस वर्षाची आहे . पण झीनतचा अद्याप निकाह झालेला नाही . " 

- " पण का ? " रामूने विचारले .

- " तशी शिक्षणात खूप हुशारच होती झीनत . " वाहिद अली सांगू लागला , " मदरस्यात शिकताना सर्व विषयात वर्गात नेहमीच ती पुढे असायची . मी तर झीनतला अम्मी-अब्बूजवळ सोडून नोकरीमुळे सतत फिरतीवरच असायचा . अम्मी-अब्बू देखील तिची खूप काळजी घेत असे .पुढे सहावीत तिची शाळा बदलली आणि तिनं ऐच्छिक म्हणून संस्कृत हा विषय घेतला आणि तिला संस्कृत या विषयाची गोडी लागली . सुरवातीला आम्ही बालहट्ट म्हणून मान्य केला . अब्बू देखील तिचं खूप कौतुक करायचे . अम्मी मात्र तिला संस्कृत शिकण्यासाठी रागे भरायची . पण अम्मीला ती पाक कुराणच्या आयतं वाचून दाखवायची आणि अम्मीचे मन जिंकायची .पुढे हळूहळू आमच्या धर्माच्या लोकांनी झीनतच्या संस्कृत शिकण्याचा विरोध करणं सुरु केला . पण यामुळे तिची संस्कृत भाषा शिकण्याची जिद्द आणखीन वाढत गेली . पुढे तिनं संस्कृत भाषेत एम . ए. आणि नंतर पी . एच . डी .ची उपाधी देखील मिळविली . "

-" पण यात वाईट काय ? हे तर फार उत्तमच आहे ." चिंटू म्हणाला .

-" वाईट काहीच नाही . पण आमच्या समाजात संस्कृत शिकणे आणि शिकविणे हे पचण्यासारखे तर नाहीच पण याचा फार तीव्र विरोध देखील होतो . आणि माझ्या बायकोच्या आत्महत्येचे कारण सांगून या गोष्टीचा वचपा  आमचे सर्व नातेवाईक आम्हाला सतत टोमणे मारून घेत होते . सतत होणाऱ्या या अपमानाकडे दुर्लक्ष करत , फार कठोर परिश्रमाने आणि तिच्या जिद्दीने झीनतने  एका कॉलेजात संस्कृत शिकविण्याची नोकरी मिळविली आणि फार लवकरच प्रोफेसरही झाली . संस्कृतमधून उर्दू भाषेत तिचे अनेक अनुवाद देखील प्रसिद्ध झाले . दोनदा जर्मनीला संस्कृत भाषेच्या संमेलनात देखील होऊन आलेली आहे ."

-" हे तर सर्व चांगलंच आहे . "

-" हो पण आमच्या समाजाने अजून झीनतचा विरोध करणे सोडलं नाही . आम्हाला एक प्रकारे वाळीतच टाकलेले आहे . आणि म्हणून याच संस्कृत भाषेमुळे माझ्या झीनतचा अद्याप निकाह झालेला नाही . " वाहिद अली सांगत होता . 

-" काय ? " सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला . 

- " सुरवातीला म्हणे माझ्या बायकोने आत्महत्या केली म्हणून अशा घरात संबंध करायचे नाही म्हणून झीनतसाठी स्थळ आले नाही . नंतर तिच्या संस्कृत भाषेचा नाद जगजाहीर झाल्यामुळे तिला चांगले स्थळच येणे बंद झाले . आमच्या समाजात शिक्षण कमी आणि शिकलेली मुलं देखील कमी . अशा परिस्थितीत माझ्या उच्च शिक्षित मुलीला कोणाच्याही गळ्यात मी कसा काय बंधू शकणार होतो ? " वाहिद अली सांगत होता आणि सर्व मित्र उत्सुकतेने ऐकत होते . 

- " कॉलेजमध्ये शिकत असताना तिच्याच वर्गातल्या संस्कृत शिकणाऱ्या एका सनातनी कर्मकांडी हिंदू ब्राह्मण मुलाच्या प्रेमात ती पडली . त्याही मुलाचे हिच्यावर जिवापाड प्रेम होते . दोघेही एक दुसऱ्याच्या सोबत जगण्या-मरण्याच्या शपथा घेऊन बसले . जे आमचे संबंधी वहिदाच्या आत्महत्या केल्याने आम्हाला समाजातून उपेक्षित करून चुकले होते , तेच परत येऊन आम्हाला धमक्या देऊ लागले . झीनतचा निकाह हिंदू मुलाशी होऊ देणार नाही असं उघड उघड आव्हान देऊ लागले . 

-झीनतचे आणि आमच्या सर्वांचे जगणे कठीण झाले .अब्बू-अम्मीला सर्व सोसावे लागत होते. अब्बूनी झीनतला समजाविले , ' आपल्या धर्मात हिंदू मुलीशी लग्न करता येते . पण मुस्लिम मुलींना हिंदू मुलांशी लग्न करता येत नाही . आपण साधी माणसं . समाजबाहेर नाही जाता येत .' पण झीनत अडून बसली . शेवटी अब्बूनी एक कठोर निर्णय घेतला व झीनतला सांगितले , " निकाह करायचा तर आपल्याच धर्मात . " यात वयात आलेली ती पोर जिद्दी होती . तिनं देखील अब्बूनां स्पष्ट सांगितलं , " माझ्यासारखा पदवीधर संस्कृत भाषेचा विद्वान मिळाला तरच मी आपल्या धर्मात निकाह करेन . " 

- अब्बूनी लहानपणापासून झीनतला सांभाळले होते . मी तर नोकरीपायी सतत बाहेरच असायचा . अब्बू-अम्मीचा फार जीव होता झीनतवर . झीनतला देखील माझ्यापेक्षा त्यांचाच जास्त आधार व लळा होता . आता अम्मी नाही , अब्बू पण नाही . दुर्दैव म्हणजे झीनतही मला , तिच्या आईच्या आत्महत्येचे कारण मानते . मी सतत बाहेर असल्याने आमच्यात तो ओढा आणि आपुलकी निर्मित होऊ शकली नव्हती . आता तर ती माझ्याशी घृणा देखील करू लागली आहे . आम्ही बरोबर राहतो पण आमच्यात संवाद फार कमीच होतो . झीनतची वाट बघून  पुढे त्या मुलानेही लग्न करून घेतले . झीनत एकटी पडली व खचली . तिनं स्वतःला संस्कृत भाषेच्या शोध कार्यात वाहून घेतले . झीनतला कोण समजवणार ? सर्व कसं विस्कळीत होऊन बसलं आहे . शेवटी झीनतने आणि मी कुणासाठी जगावं ? " वाहिद अलीच्या डोळ्यातून फक्त दोनच थेंब गळून गालावर आले .

-रामूने वाहिद अलीच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर दिला , " जाऊ दे..रे . आता या वयात रडायचं नाही . आणि दुसऱ्यांनाही रडू द्यायचं नाही . होईल सगळं व्यवस्थित . उशिरा का होईना , झीनतला बापाच्या प्रेमाची प्रचिती एक दिवस नक्की होईल . त्या क्षणाची वाट पाहण्या खेरीज आपल्या हातात काहीच नाही . " स्वतःच्या मुलीच्या आठवणीने रामूचेही डोळे पाणावले . 

- थोड्यावेळ निस्तब्ध शांतता होती .  काय बोलावे हे कुणालाही सुचत नव्हते . मग चिंटूचं उठून उभा राहिला , " ए ... चला ... बराच वेळ झाला आहे . तिथं सर्व जेवण संपायचं . "

-सर्व उठून हळूहळू बाहेर आले . 

-संमेलनात , भोजनानंतरच्या सभेत हे चौघे उनाड म्हातारे परत शेवटच्या रांगेत बसलेले थट्टा मस्करी करत होते . चिंटू , सरदार अमरीकसिंहला जणू धमकावतच होता , " मी सांगितल्या शिवाय टाळ्या वाजवायच्या नाही .


Rate this content
Log in