कवी कसा असावा, कसा नसावा!!
कवी कसा असावा, कसा नसावा!!
नुसती यमके जुळवून
कवी होता येत नसतं रे बाबा,
अभंग लिहीणारे पैशाला पासरी
एखादाच असतो तुकोबा!
आपल्या शब्द जुळवणीचा
एवढा ताठा बरा नव्हं,
व्हायचंच असेल कवी तर
संवेदनांचं काळीज हवं!
वाढवायचाच असेल शब्दांचा पैस
तर वाचाव्या हजारो ओळी,
शंभर त्यातल्या पचवाव्या
मगच रचावी एखादी चारोळी!
पुरस्काराच्या चार तबकड्यांनी
कवित्वावर उठत नसते मोहर,
संवेदना, लय व शब्दकळा
यांनीच येतो कवितेला बहर!
प्रतिभेच्या नावाने बोंब
शब्दांचा मांडतो बाजार,
नको रे देवा नको मजला
असल्या बनावट कवींचा शेजार!
ज्याने अहंकार निपटला
त्यालाच होता येईल कवी,
कवितेच्या आगीशी खेळायचं
तर नम्रतेची शीतलता हवी!!