विश्वास
विश्वास
खरंतर आज सगळं जग चाललंय ते विश्वास नावाच्या शिदोरीवर. जी शिदोरी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जन्म ते मृत्यू या प्रवासात अगदी सावली सारखी बरोबर असते. जीवनातील वीरान वाळवंटात जेंव्हा माणूस येणाऱ्या व आलेल्या संकटाना न घाबरता,आपले ध्येय गाठण्यासाठी, त्याच वाटेवर मार्गक्रमण करत स्वतःचा आत्मविश्वास ढळू न देता यशाकडे वाटचाल करत असतो तोच माणूस आपल्या विश्वासाच्या जोरावर दैदिप्यमान यश मिळवितो याची अनेक उदाहरणे आपण पहात आहे. मन आणि विचारांचा योग्य समन्वय साधून आलेल्या परिस्थितीत आपल्या मनाला जो निर्णय योग्य वाटेल तोच खरा तुमचा विश्वास आणि हाच आत्मसन्मान तुम्हांला तुमचं समाजातील खर अस्तित्व दाखवून देते.खरंतर विश्वास आज कोणी कोणावर ठेवायचा,कसा ठेवायचा आणि का ठेवायचा हे त्याचं वैयक्तिक मत आहे. आजकाल तर नात्यामध्ये विश्वास नावाची गोष्टच दिसत नाही. जिथेतिथे फक्त दिसतो तो स्वार्थीपणा. स्वतःच्या स्वार्थासाठी ही नाती कोणत्याही थरावर जाऊ शकतात. स्त्री-पुरुष नात्या शिवाय काहींना दुसरे नाते दिसत नाही. पशु पक्षांपेक्षाही आज माणुसकी खालच्या पातळीवर नेऊन ठेवली आहे. खरंतर जिथं विश्वास आहे ते एकमेव ठिकाण म्हणजे आईच पवित्र प्रेम.जिच्या विश्वासावर राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांकडून स्वराज्य स्थापन केले आणि त्याच जोरावर,रयतेच्या विश्वासावर ते स्वराज्याचे छत्रपती झाले. तो खरा विश्वास ज्यात कोठेही स्वार्थीपणा नव्हता की कोणाची जबरदस्ती नव्हती.
एखाद्यात विश्वास निर्माण करण्यासाठी त्यात आपलेपणाची जाणीव महत्वाची आहे, काळजातून आर्तपणे साद घालत प्रेमाची, आपुलकीची भावना निर्माण होणे महत्वाचे आहे आणि हीच भावना म्हणजे तुमच्यातील खरा विश्वास..!जो शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर असेल.म्हणूनच हाच विश्वास आज आपणा सर्वांना पुन्हा एकदा मिळविण्याचा प्रयत्न करायचा आहे. कितीतरी क्रांतिकारक, समाजसेवक, देशभक्त, समाजसुधारक, अशी अनेक पुण्यवंत लोक या भारतात जन्माला आली व एका ध्येयाने वेडी होऊन अनेकांना प्रेरित केले व समाजामध्ये असा विश्वास निर्माण करुन ठेवला आहे की आजही त्याचे नाव घेतले कि त्यांच्या कर्तृत्वावरुन त्यांनी दाखविलेला विश्वास हिच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
आज जगाच्या या गर्दीत दर्दी लोकांची कमतरता दिसून येते. निष्ठावंत, प्रामाणिक, विश्वासू लोकांना दुनियेच्या बाजारी केराची टोपली दाखवली जाते.यापेक्षा दुर्दैवी शोकांतिका ती कोणती.विश्वास हा जगाच्या बाजारात किंवा इतर ऑनलाईन प्रकियेत खरेदी करता येत नाही तर तो तुमच्या कर्तृत्वावरून,चांगुलपणातुन,तुमच्या इच्छाशक्ती वरून,व प्रामुख्याने वेळेत घेतलेला निर्णय हिच तर विश्वास नावाची खरी रूपे आहेत.तो असाच,निरंतर,निरामय,व मंगलमय व चिरतरुण तुम्हां आम्हां सर्वांना मध्ये चिरायू राहो हिच मंगलमय सदिच्छा.....!