Pranjali Kalbende

Others

1  

Pranjali Kalbende

Others

संस्कारातुन राष्ट्रसाकार

संस्कारातुन राष्ट्रसाकार

2 mins
492


जागतिक पातळीवर जेव्हा भारतीय व्यक्तीची तुलना होते तेव्हा मग आपल्यात काय काय कमतरता आहे, याचा पाढा मनात चालू होतो. जागतिक स्तरावर होणाऱ्या खेळाच्या स्पर्धा म्हणा किंवा इतर सौंदर्य स्पर्धा किंवा व्यावसायिक स्पर्धा म्हणा... निकालाच्या घटकेला जेव्हा निराशा होते तेव्हा फक्त या ना त्या कारणाने बोटे मोडत बसतो परंतु, प्रत्येक भारतीयाने हा विचार करायला हवा की, एखाद्या मोठ्या स्थानावर आरुढ होण्यासाठी काही दिवसाची किंवा काही महिन्याची तयारी असून चालत नाही तर जागतिक पातळीवर उच्च स्थान प्राप्त करण्यासाठी आपल्या संस्काराची मुळंच मजबूत असायला हवी.


वास्तविक पाहता भारत देश हा विविध कलागुणांचा, वैविध्यपूर्ण गोष्टींचा वारसा लाभलेला देश आहे. इथे थोर देशभक्त, शुरवीर योद्धे, राजे महाराजे, संत-महात्मे होऊन गेले. या सर्वांच्या चरित्रातून आजच्या पिढीला अतिशय उपयुक्त मार्गदर्शक संदेश मिळू शकतात. तसेच न्याय, बंधुता, एकात्मता... अशा सद्गुणांना जोपासणाऱ्या संविधाच्या अधिपत्याखाली वावरणारा आपला समृद्ध भारत देश आहे.


भारतातल्या युवकाला बहुगुणी बनविण्यासाठी संविधान अप्रत्यक्षरीत्या सतत प्रयत्नशील आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे भारत देश हा जागतिक पातळीवर यशस्वी झेंडा फडकवणारा देश असायलाच हवा. असे असूनसुद्धा बरेचदा भारताला अपयशाला सामोरे जावे लागते. यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केल्यास असे आढळते की, आपल्यापुढे चमचमीत पंचपक्वानांनी सजलेलं ताट ठेवलेलं आहे. परंतु, आपल्या मूर्खपणामुळे आपल्याला त्यातील खाता येत नाही आहे.


अजूनही भारतातल्या बरेचशा भागात अतिशय अमानवी जुन्या रुढींना संस्काराच्या नावाखाली लपविले जात आहे.


लहाणपणापासूनच सकस आहार खाण्याची सवय, स्वावलंबी वृत्ती, सदाचाराचे आचरण, नितिमत्तेची वागणूक, इतरांचा आदर... इत्यादी गोष्टींना प्राधान्य देत प्रत्येकाची जीवनशैली असायला हवी. अशाप्रकारे जीवनयापन करणाऱ्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. अशा व्यक्तीमत्व विकासाने परीपूर्ण देशाला सारे विश्व मानाने मुजरा करेल.


परंतु, संविधानाने जरी स्त्री-पुरुष समानतेला मान्यता दिली असली तरी बऱ्याच प्रमाणात समाजात समानतेने वागणूक देण्यात आम्ही कमी पडत आहोत, या सर्व कारणांमुळे संस्काराची या मातीत भक्कम मूळे असूनसुद्धा संस्काराचा अभाव जाणवत आहे. या संस्काराच्या अभावामुळेच भारताला राष्ट्र म्हणून जागतिक पातळीवर मिरवण्याची संधी मिळत नाही.


लोकशाहीची ताकद असणारा आपला देश एक बलशाली राष्ट्र बनू शकतो फक्त गरज आहे आपल्याला अंतर्बाह्य संस्कारीत होण्याची. आधुनिक विचारसरणीला आत्मसात करून आपल्या संत-महात्म्यांच्या उपदेशांना गाठीला घेत वाटचाल करण्याची.


चला तर मग, आज सामुदायिकरित्या एक संकल्प करूया...


संस्काराने मढलेली हिरे, रत्ने या भारतात घडवूया आणि ओघाओघानेच एक सशक्त, यशस्वी भारतीय राष्ट्र म्हणून जगात मानांकन पटकावूया.


Rate this content
Log in