Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

प्रारब्ध

प्रारब्ध

7 mins
329


दुपारची वेळ होती, मीच रेखाटलेलं एक सुंदर चित्र मी रंगविण्यात व्यस्त होतो. इतक्यात तेव्हा दहा वर्षांची असणारी ती माझ्याकडे धावत आली आणि एका फाडलेल्या चित्राचे काही तुकडे मला दाखवत तिने मला प्रश्न केला ‘हे चित्र तू काढलं होतंस का? मी पूर्ण आत्मविश्वासाने नाही ! असं खोटंच उत्तर दिलं. तेव्हा मी तिच्याशी पहिलं आणि शेवटच खोटं बोलंलो. पण तरीही मी खोटं बोलतोय हे तिच्या लक्षात आलं असावं. पण तिने तसं मला दिसू दिलं नाही. तिने त्या तुकडयांचं नंतर काय केलं देवास ठावूक ! मी ही विचारणा केली नाही कारण त्यामुळे तिचा माझ्यावरचा संशय अधिक बळकट झाला असता. मी काढलेल्या चित्राच्या काही तुकडयांवरून ते चित्र मी काढलेलं असावं हे ओळखण्याइतक तिचं माझ्या चित्रांवर प्रेम होतं की खरं कारण आणखी काही होतं? ते मला आज ही कळलेलं नाही. मी ते चित्र उत्सुकतेतून काढलं होतं आणि उत्सुकतेतून रंगविलेलं होतं. रंगवून झाल्यावर ते चित्र मी कोणालाच दाखवू शकत नव्हतो कारण ते चित्र एका पोशाख परिधान न केलेल्या स्त्रीचं होतं म्हणूनच मी ते फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकलेलं होतं. त्यावेळी आमच्या चाळीतील सारा कचरा एका मोकळ्या जागेत जमा व्हायचा आणि तेव्हा खेळण्यासाठी लागणारे साहित्य आंम्ही त्या कचऱ्यातूनच जमा करून आणायचो. ती ही त्या कचऱ्यात खेळण्यासाठी लागणार्‍या रिकाम्या काड्यापेट्या जमा करायला गेली होती. तिथेच तिला माझ्या चित्रांचे तुकडे सापडले होते. त्यातील काही तुकडे तिने जोडून पाहिले होते. त्यानंतर चित्रकलेत तसे प्रयोग करून पाहण्याची हिंमत माझ्याच्याने कधीच झाली नाही.


त्यानंतर काही वर्षांनी आमच्या चाळीतील सार्वजनिक शौचालयात काही चित्रकारांचा नव्याने जन्म झाला होता. पण ते माझ्या तोडीचे चित्रकार नव्हते. त्यांनी तेथे दाखविलेली कला अत्यंत तुच्छ दर्जाची होती. तिने त्याबद्दलही मला प्रश्न केला. ती चित्रे तू तर काढली नाहीस ना? तेव्हा मात्र माझी सटकली होती आणि तेव्हा ते चित्र मीच काढलेलं होतं हयाची तिला खात्री होती हे ही माझ्या लक्षात आलं. शौचालयात काढलेल्या चित्रांबद्दल तिने फक्त ऐकले होते प्रत्यक्ष ती चित्रे पाहिलेली नव्हती, नाहीतर ती मी काढलेली नाहीत हे तिच्या सहज लक्षात आले असते कारण तिला माझ्या चित्रकलेचा दर्जा माहित होता. तेव्हा मात्र ती चित्रे मी काढलेली नाहीत हे मी खरंच बोललो. पण त्यावरही तिचा विश्वास बसला होता की नाही देव जाणे कारण तिच्या दृष्टीने तेव्हा मी एकटाच महान चित्रकार होतो. असो ! शौचालयात जन्माला आलेल्या या चित्रकारांची मला आजही कीव येते कारण हे महान चित्रकार कधीच जगासमोर येत नाहीत. हे चित्रकार साधारणतः पंधरा ते वीस या वयोगटातील असावेत असा माझा अंदाज आहे. शौचालय हे आपल्या चित्रकलेचं प्रदर्शन मांडण्याचे ठिकाण मानणारे हे चित्रकार आज इतक्या वर्षानंतरही अगदी सध्याच्या संगणकाच्या युगातही जन्माला यायचे थांबलेले नाहीत याचं मला व्यक्तीशः खूपच आश्चर्य वाटतं आणि हसूही येतं.


मागील कित्येक वर्षात माझी चित्रकलेसोबतच मैत्री तुटली. मला बऱ्याचदा वाटत राहतं आपण स्वतःसाठी थोडा निवांत वेळ काढावा आणि एखादं छानसं चित्र काढावं ते मस्तपैकी रंगवून फ्रेम करून आपल्या घराच्या भिंतीवर लावावं पण्! हिंमतच होत नाही कदाचित माझ्या चित्रांचं कौतुक करणारी ती आता माझ्याजवळ नाही म्ह्णून असेल. ती भौतिक जगातील भौतिक रंगात रंगण्यात गुंग झाली आणि मी भौतिक जगात अस्तित्वातच नसणाऱ्या गोष्टींच्या शोधात आजही एकटाच भटकतोय वेड्यासारखा. तेव्हा वयाच्या दहाव्या वर्षी ती जितकी निरागस, निर्मळ होती तितक्या आजच्या मुली नाहीत हे मी खात्रीने सांगू शकतो आणि तेव्हा मी जितका भोळा होतो तितका भोळा आज असणं हे मूर्खपणाचं लक्षण मानलं जातं. माझं तिच्यावर प्रेम होतं असं साऱ्या जगाला वाटत होतं. मला तसं कधीच वाटलं नाही असं तिलाच वाटत राहिलं. तिनं तिला हवं असणारं प्रेम दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते तिनं मिळवलंही. त्यानंतर नाईलाजाने मी तिला माझ्या आयुष्यातून वजा केले.


त्यानंतर माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्यातील वेगवेगळ्या रंगासारख्या अनेक तरूणी एकापाठोपाठ एक आल्या. त्यांनी काही काळ माझ्या आयुष्यात आपला रंग भरला आणि जशा अचानक आल्या तशा माझ्या आयुष्यातून अचानक निघूनही गेल्या. त्यानंतर आकाशात अधूनमधून दिसणाऱ्या इंद्रधनुष्यासारख्या त्या मला दिसत राहिल्या. पण आज त्यांना पाहून माझं मन क्षणभरही विचलित होत नाही कारण आता माझं हृद्य पाषाणाचं झालंय. आज मी कोणाच्या प्रेमात पडू शकतो अथवा पडलेलो असेन हे मी स्वतःच्या तोंडाने सांगूनही ते ऐकणाऱ्याचा त्यावर विश्वास बसत नाही. प्रत्येकाला तो मी विनोद करतोय असंच वाटत राहतं. माझ्या आयुष्यात अनेक तरूणी आल्या आणि गेल्या. जाताना जाणाऱ्या प्रत्येकीने मला काही शाप तर दिला नाही ना? असा भितीदायक प्रश्न मला आजही सतावतो कारण आजही मला त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयीचं प्रेम स्पष्ट दिसतं. म्हणूनचं मला मी कोणाचा तरी अपराधी असल्याचा भास सतत होत राहतो. कोणा एका स्त्रीचा होऊन राहणं हा नुसता विचारही मला अस्वस्थ करतो. आजही माझ्या आयुष्यातून माझ्या मूर्खपणामुळे निघून गेलेल्या त्यांची, त्यांच्या सौंदर्याची, त्यांच्यातील गुणांची, त्यांच्या चालण्या-बोलण्याची नुसती आठवण जरी आली तरी आता आपल्या सभोवताली त्या तोडीची कोणीच शिल्लक नाही याची मला खात्री वाटते. जी व्यक्ती माझ्या प्रेमात पडते ती व्यक्ती माझ्या प्रेमातून कधीच बाहेर येत नाही. पण मी मात्र कोणाच्याही प्रेमात पडून राहात नाही. माझा हा चंचल स्वभावच कारणीभूत असावा माझं प्रेम अयशस्वी होण्याला. मला माझं प्रेम कोणावरही लादायचं नव्हतं. आपलं प्रेम कोणाला ओझं वाटावं हे मला तेव्हाही मान्य नव्हतं आणि आजही मान्य नाही.


मी आणि माझ्या मित्रांनी त्या लहान वयातही पोरींना पटविण्यासाठी जे जे उद्योग केले ते नुसते आठवले तरी स्वतःवरच हसू येतं. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा आमच्या चाळीत नळ नव्हते. पाणी घरापासून पाच-दहा मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या विहिरीवरून आणावे लागत असे त्याही पन्नास पायऱ्या चढून. तेव्हा कोणतीही मुलगी कोठेच सापडली नाही तर विहिरीवर नक्की सापडायची गप्पा मारायला. फक्त एखाद्या मुलीला पाहण्यासाठी आम्ही कधीकधी घरातील पाण्याने भरलेले हंडे जबरदस्ती रिकामे करून कारण नसतानाही विहिरीवर पाणी भरायला जायचो. विहिरीवर गेल्यावर तिला हंडा भरून देणं, हंडा उचलून तिच्या डोक्यावर ठेवणं, तिच्या सोबत चालणं, तिच्या हातातील कळशी स्वतःकडे घेऊन काही काळ तिचं ओझं कमी केल्यावर तिच फक्त गोड हसणंही आम्हाला तेव्हा स्वर्गीय आनंद देऊन जायचं. मुला-मुलींना एकत्र गप्पा मारताना, हसता-खिदळताना पाहून त्यांच्यावर संशय घेण्याची पद्धत तेव्हा आमच्या चाळीत नव्हती. त्याचा नंतर काहींनी गैरफायदा घेतला ही गोष्ट निराळी.


प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची सारी गुपिते ठावूक असणारी एक ना एक व्यक्ती असतेच पण आमच्या चाळीत एक व्यक्ती अशी होती जिला आमच्या सर्वांची गुपिते माहित होती. त्या व्यक्तीकडे सारेच मोकळे व्हायचे पण मी मात्र कधीच मोकळा झालो नाही. त्यामुळे माझी काही गुपिते ही गपितंच राहणार होती. मला स्त्रियांचे सौंदर्य आकर्षित करतं पण तिला आपलंसं करायला माझं मन तयार नसतं. मला नेहमी वाटत राहतं तिचं आपल्यासोबतचं वागणं स्वैर असावं. तिला जगाची अजिबात फिकर नसावी. अशी एक तरूणी माझ्या आयुष्यात आलीही होती पण तेव्हा माझ्या नशिबाने मला दुसऱ्यांदा दगा दिला होता. माझं तिच्यावरील प्रेम मी व्यक्त करण्यापूर्वीच तिचं लग्न झालं होतं. आजही तिचा हात हातात घेऊन तिच्या दणकट हातावर काढलेली मेहंदी मला आजही आठवते. त्यानंतर मी कोणाच्याही हातावर मेहंदी काढली नाही. ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली होती तेव्हा गरूडाचे जीवन जगत होती. पण जेव्हा ती पुन्हा भेटली तेव्हा पिंजऱ्यातील चिमणी झाली होती. तिची ती अवस्था पाहून मला सुरूवातीला दुःख झालं. नंतर मी स्वतःला समजावलं हेच तिचं प्रारब्ध असावं.


माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावर एक वेगळी स्त्री माझ्या आयुष्यात आली होती आणि गेली होती. त्या माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग होत्या, आहेत आणि भविष्यातही राहतील. त्यांना वजा केल्यावर माझ्या आयुष्याबद्दल कोणाला काही सांगण्यासारखं शिल्लकच राहत नाही. आजही त्या मला भेटतात, माझ्याशी बोलतात पण त्यांच्या डोळ्यात मला नेहमी माझ्यासाठी एक प्रश्न दिसतो तो प्रश्न हा असतो की मला माझ्या आयुष्यात नेमकी कशी स्त्री हवी होती? मला आजही कोणा एकीची आठवण कधीच येत नाही एकामागून एकीची आठवण येत राहते. मी स्वतःलाच समजावत बसतो. त्यापैकी एकीला जरी माझी जोडीदार केली असती तर कदाचित बाकीच्यांवर तो अन्याय झाला असता. त्या आपल्या जोडीदारांसोबत स्थिर झाल्या आहेत याचं मला वाईट वाटत नाही उलट आनंदच होतो कारण त्यांच्या शरीरावर मी कधीच प्रेम केलं नव्हतं आणि हे त्यांनाही चांगलंच माहित होतं.


माणसाच्या आयुष्यात असंख्य व्यक्ती येतात आणि जातात पण त्यातील काहीच व्यक्ती त्यांची छाप आपल्या जीवनावर सोडून जातात. मी ही त्यांच्या जीवनावर माझी छाप सोडली होती. मला वाटतं नियतीनेच माझ्या आयुष्यात अनेक स्त्रिया धाडल्या आणि काही काळानंतर माघारी बोलावून घेतल्या. त्यांचं माझ्या आयुष्यात येणं आणि अचानक निघून जाणं हे सहज घडलेलं नसावं. फारच अकल्पित परिस्थितीत त्या माझ्या आयुष्यातून वजा झालेल्या होत्या. सारंच सोपं असतानाही अवघड झालं होतं. सारंच हातातून वाळू निसटून जावी तसं निसटून गेलं होतं. जगातील कोणतीच गोष्ट मिळविणे मला अशक्य नाही असा माज मिरविणारा मी बऱ्याचदा हतबल ठरलो होतो. त्यानंतर मला खात्रीच पटली मी एक यंत्रमानव आहे आणि माझा रिमोट आणखी कोणाच्यातरी हातात आहे. माझ्या आयुष्यातून काही पैशाअभावी गेल्या पण काही पैशामुळेही गेल्या तेव्हा मात्र माझी खात्री पटली त्या माझ्या आयुष्यातून दूर जाण्यासाठीच आल्या होत्या. माझ्याकडे असं काहीतरी आहे ज्यामुळे लोक माझ्याकडे आकर्षित होतात, माझ्या अधीन होतात, माझ्या आज्ञेत राहतात. माझ्या आयुष्यातील सर्व घटनांची गोळाबेरीज करून सारासार अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आले की माझा रिमोट ज्यांच्या हातात आहे त्यांची इच्छाच नाही की मी भौतिक जगाच्या प्रेमात पडावं. म्हणूनच कदाचित माझ्या जन्मदात्यांनाही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणं शक्य होत नसावं.


मला प्रत्यक्षात न पाहिलेल्या लोकांच्या मनात माझी फार विचित्र प्रतिमा तयार झालेली असते पण त्याच व्यक्ती मला प्रत्यक्ष भेटल्यावर माझे भक्त होतात. त्यामुळेच मी शक्यतो लोकांना भेटणं टाळत असतो. बऱ्याच लोकांना विनाकारण वाटत राहतं की मी स्त्रियांचा तिरस्कार करतो पण हे वास्तव नाही मीच स्त्रियांचा खरा मित्र आहे कारण मी त्यांच्या बाजूचा फक्त त्यांच्याच बाजूने विचार करतो. माझ्या आयुष्यात आलेल्या जवळजवळ सर्वच स्त्रियांच्या आयुष्यात फार अनपेक्षित घटना घडलेल्या होत्या. मी त्या घटनांचा साक्षीदार होतो त्यामुळे त्या घटना मला फार काही शिकवून गेल्या. स्त्रियांच्या आयुष्याकडे एक पुरूष म्ह्णून न पाहता तटस्थपणे पाहण्याची शिकवण त्यांच्यामुळेच मला मिळाली. त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या तडजोडी मला कधीच पटल्या नव्ह्त्या आणि पटणारही नाहीत. माझ्या मागे माझ्यावर टीका करणारे बरेच आहेत पण माझ्या डोळ्यात पाहून बोलण्याची हिंमत फक्त एकीतच होती. पण तिलाही परिस्थितीसमोर हार मानताना पाहिलं आणि मग माझी खात्री पटली या भौतिक जगाच्या पलीकडेही एक अकल्पित जग आहे. माझा जन्म कदाचित त्या अकल्पित जगाचा शोध घेण्यासाठीच झाला असावा अथवा त्या अकल्पित जगाच्या शोधात वेड्यासारखं जीवन जगत राहणं हेच माझं प्रारब्ध असावं.


Rate this content
Log in