माझे बालपण
माझे बालपण
बालपणीचा...काळ सुखाचा .....अगदी लहानपणापासून मला नाच गाण्याची भारी हौस होती. बालकमंदिरापासून मी..मुंबई ची बाहुली बाई गोड गोड बोलते...या बालगीतावर केलेले अभिनय गीत मला अजूनही आठवते. शाळेत होणाऱ्या दरवर्षीच्या स्नेहसंमेलनात मी आवर्जून डान्स करायचे, शेतकरी नृत्य, कोळीनृत्य, आदिवसी नृत्य, कथ्थक नृत्य,,जोडीनृत्य...एक ना अनेक नृत्य सादर करून बक्षीस सुद्धा पटकाविली. जसजसे मोठी होत गेले, तसतसा माझा नृत्याविष्कार आता नाट्य कलेत परावर्तित झाला, आता मी अविष्कार बालनाट्य मंच, नागपूर आयोजित बालनाट्यामधून धनवटे रंग मंदिर ला प्रायोगिक नाटकांमधून बालभूमिका वठवू लागले, माझा पहिलाच नाट्य प्रयोग..निष्पाप..धनवटे रंगमंदिरमधे खूप यशस्वी झाला,
त्यानंतर माखनचोर नंदकिशोर..या नाटकाची प्रॅक्टिस सुरू झाली, या दरम्यान माझे अभ्यासाकडे थोडे दुर्लक्ष होऊ लागले. तिमाहीत मिळालेल्या गुणपत्रिकेतील मार्कांची घसरण पाहून खूप वाईट वाटले, बाबांनी पण नाटकात भाग घेण्यास मनाई केली. पण मी खूप मनवले बाबांना, आणि अभ्यास व्यवस्थित करण्याचे वचन देऊन पुनश्च प्रॅक्टिस सूरू झाली. अखेर प्रयोगाचा दिवस आला. पण मला शाळेतून सुट्टी मिळेना, मग काय माझे सगळे स्वप्न साकार होणार की नाही, आणि माझ्याच वर्गातील मैत्रिणींनी मला सुट्टी मिळविण्यात मदत केली, माझे पोट दुखत असल्या चे खोटे नाटक यशस्वी झाले. आणि मला शाळेतून सुटी मंजूर करण्यात आली, मैत्रिणींनींमुळे माझे प्रयोगाला जाणे शक्य झाले. आणि काय आश्चर्य..दुसर्याच दिवशी त्या नाटकाची बातमी..लोकमत वर प्रकाशित करण्यात आली, पण मला सर्वासमोर शाळेत गौरविण्यात आले. आणि बालपणीची आठवण कायम स्मरणात राहिली
