कवी उदंड पण काव्यात्मक दर्जाचे

कवी उदंड पण काव्यात्मक दर्जाचे

2 mins
315


आज जागतिक कविता दिन. कवी दिनाच्या माझ्या सर्व साहित्यिक सहकार्यांना हार्दिक शुभेच्छा! आजकाल हे दिन का साजरे करतात हे मला समजत नाही. एक दिवस हे दिन साजरे करून त्यातून काय साध्य होते कोणास ठाऊक? तरीपण आपण या दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देत असतो. आज काय तर जागतिक कविता दिन. आजकाल कवींचे हे पीक उदंड आहे. त्याची व्याप्ती देखील मोठी आहे. जीवनात त्याची गरज देखील आहे. काव्य आपल्या मनाला निरपेक्ष आनंद देते. माणूस दुःखात असला व एखादी छानशी कविता त्याने ऐकली तर तो क्षणभर का होईना आपले दुःख विसरून जातो.

काव्यात फार मोठी ताकद आहे. त्यातील एकेक शब्द मानसिकता बदलण्याची ताकद निर्माण करतात. जीवनात एक प्रकारचा जल्लोष निर्माण करतात. "एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्रणाने, दीर्घ तिच्या किंकाळीने, भेदुनि टाकीन सारी गगने" बघा ना काय ताकद असते काव्यात व त्यातील एकेक शब्दात. "भातुलकीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहानी" यातून केलेले वर्णन काळजास भिडल्याशिवाय रहात नाही. "गरिबोकी सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे वो दसलाख देगा" यातून व्यक्त केलेली दातृत्वाची भावना अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. पूर्वीच्या कवितेत एक दमदारपणा होता. कविसंमेलनात रंगत येत असे. काव्यातून सर्व भाव व्यक्त झालेले पहावयास मिळत होते. यमक, अलंकार याचा समर्पक वापर असल्याने काव्यात एक प्रकारचा गोडवा होता, लय, माधुर्य होते. कवी मोजकेच होते पण काव्यरचना व्यापक होती.

आज पावलागणिक कवी भेटतात. त्यात नवकवी किंवा आधुनिक कवींचा भरणा अधिक. काहीजण त्याला अपवाद आहेत. मात्र बहुतांश कविता गध्यात्मक असून त्याला कविता का म्हणतात हेच समजत नाही. त्यात फारसा गोडवा मधुरता दिसून येत नाही. एका कवी संमेलनात कवितेचे विषय अधिकतर प्रेम, गरिबी, व्यथा, दुःख, दैन्य असेच असतात. स्वतःचा गवगवा त्यात अधिक असतो. स्वतःला ही मंडळी वेगळी समजतात. कवितेचा विषय काय असावा याला देखील तारतम्य असावे असे मला वाटते. एखाद्या युवतीवर काही नराधमानी बलात्कार करून तिला मारून टाकले या घटनेचे कवितेत वर्णन कशासाठी?त्या कुटुंबातील लोकाना आपण किती यातना देतो याचा कधी विचार करतो का? अपघाताचे वर्णन, खून, बलात्कार आशा विषया पेक्षा अन्य विषय काव्याचे असावेत.

Poetry is spontinuous overflow of powerful mind अशी कवितेची व्याख्या आहे. आजच्या कवितेत spontinuous overflow आणि powerful mind दिसते का? नसेल तर त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने जागतिक कविता दिन साजरा केला जाईल. सर्वसामान्य माणूस साहित्याकडे वाचनाकडे का वळतो? त्याला जीवनातील दुःख विसरायचे असते म्हणून. त्याच्यापुढे तुम्ही विनोदी, दुःख विसरायला लावणारे साहित्य ठेवले पाहिजे. मी थोडे स्पष्ट लिहतोय पूर्वी साहित्य संमेलनाला कवी संमेलनाला जेवढा प्रतिसाद मिळत होता तेवढा आज मिळत नाही. सकाळ सत्रात कवी संमेलन असेल तर संयोजक , कविता वाचणारे व काव्यात रस असणारे मोजकेच उपस्थित असतात. दुपारच्या मुख्य सत्रात मात्र उभे राहायला जागा मिळत नाही. हे चित्र पालटले पाहिजे.


Rate this content
Log in