Sanjay Ronghe

Others

3.0  

Sanjay Ronghe

Others

कशाला होते ही रात्र

कशाला होते ही रात्र

2 mins
126


मिनीचा एक भाबडा प्रश्न मला वारंवार विचार करायला भाग पाडत होता. तिचा प्रश्न तर एकदम साधा आणि सरळ होता आणि उत्तरही त्याचे साधे सरळच होते. प्रश्न होता, कशाला होते ही रात्र? आणि प्रश्नाचे उत्तर होते पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते, पृथ्वीचा जो भाग सूर्याकडे येतो तिथे दिवस आणि पृथ्वीचा मागचा भाग जो सूर्याच्या विरुद्ध दिशेला असतो तिथे रात्र असते, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याने आणि तिच्या स्वतःभोवती फिरायला जवळपास 24 तास लागत असल्याने पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते. हे कारण खरे असले तरीही मला मात्र तिचा तो प्रश्न स्वस्थ बसूच देत नव्हता. कशाला होते ही रात्र?


पृथ्वीवर सजीवांची वस्ती आहे. दिवसा सारी सजीव प्रजाती आपले पोट भरण करण्यासाठी धडपड करते. त्यासाठी त्यांची भटकंती चालते. दिवसभराच्या त्या कष्टाने शरीर थकून जाते. त्यानंतर हवी शांत सहज झोप आणि ती झोप मिळावी म्हणूनच असेल कदाचित निरव शांत प्रिय रात्र त्यासाठी येत असावी. रात्री सगळेच कसे शांत असते. सूर्याची ऊर्जाही रात्री लोप पावते. टिकून असतो फक्त चंद्र आणि ताऱ्यांचा शीतल मंद प्रकाश, हळुवार वाहणारा शांत वारा आणि सगळीकडे असणारी सामसूम आणि अशा या शांत झोपेत सुखद स्वप्ने मनाला सुखावून जातात.


मात्र कधी कधी ही शांत असणारी रात्रही आपल्या हृदयाचे ठोके वाढवून जाते. शांत हवेत होणारी झाडांच्या पानांची सळसळही मनाचा वेध घेऊन जाते. रात्रीत चमचम करणारे काजवेही डोक्यात चमक देऊन जातात. रातकिड्यांचे किर किर होणारे आवाज भीती वाढवून जातात. अंधार पुढे काय आहे हे दिसत नसतानाही वेगवेगळे आभास थरकाप देऊन जातात. शांत शीतल वाराही घामाच्या धारांमध्ये माणसाला ओला चिंब भिजवून जातो. आणि मग माणूस भीतीने थरथरायला लागतो. त्याला त्याचा एकटेपणा जाणवायला लागतो. आणि मग त्यांच्यापुढे असंख्य विविध आकाराची विविध प्रकारांची भुतं विक्षिप्तपणे नाचायला लागतात. शांत वाटणारी रात्र मग तुम्हास अशांत करून जाते.


Rate this content
Log in