कना..
कना..
दिवे लागणीची वेळ झाली, अजून कसे आले नाहीत. एवढा वेळ लागतो का परत घरी पोहचायला? तरी मी शिला ला सांगितले होते की ह्यांना लवकर पाठव म्हणून. थांबा हा.. तिला फोन लावते विचारते बाबा तिथून निघाले का ? सुलोचनाबाई (कना) एकट्याच पुटपुटत होत्या. फोन ठेवल्यानंतर कळते की जनार्दन रावांना तिथून निघून बराच वेळ झाला आहे. मग कुठे राहिले ? अशा सगळ्या वातावरणात सुलोचनाबाई घाबरल्या. त्यांच्या मनाची हुरहूर काही कमी होईना.
आज त्यांच्या लग्नाचा बावन्नावा वाढदिवस होता. कामाच्या गडबडीत हे त्यांच्या लक्षात नव्हते. परंतु दुसऱ्या बाजूला जनार्दन रावांनी आज त्यांना सरप्राइज द्यायचे ठरवले होते. म्हणून ते सकाळीच शिलाकडे (मुलगी) जाऊन येतो. असे म्हणून ते घराबाहेर पडले. लेकिकडे पोहोचल्यावर त्यांनी शिलाला याची कल्पना दिली. नातवंडाबरोबर खेळत, गप्पा गोष्टी करत त्यांना संध्याकाळ झाली. खरंतर मुद्दामहून ते लेकिकडून उशिरा घरी यायला निघाले होते.
इकडे सुलोचना बाईंचा जीव काही लागेना.सतत ची लागलेली हुरहूर, बेचैन करणारे नको नको ते विचार.. हे करावं.. की ते करावं.. अशी झालेली मनाची अवस्था. काय झालं असेल? ह्यांच्या सोबत काही विपरीत तर घडलं नाही ना ? नाही.. नाही.. मी आपला काही तरीच विचार करते.. भीतीने त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता. आपण अजून काही वेळ वाट पाहावी असा विचार करून त्या वाटेकडे नजर लावून बसल्या...
जनार्दन गावातच दिलेल्या बहिणीचा लहान दीर. एकदम काबाड कष्ट करणारा, मेहनती मुलगा. तेवढाच मनाने स्वच्छ देखील होता. बहिणीच्या लग्नात मी त्याला पाहिले. अगदी पाहताच क्षणी मनात भरावा अशी त्याची शरीराची ठेवणं. भरगच्च छाती, निळसर पाणीदार डोळे,त्याचा तो रेखीव चेहरा, सावळा रंग सगळाच मनाला मोहून टाकणारं होत. पुढे सोयरिक जुळल्या कारणाने आमचं भेटणं सुरू झालं. एका टप्प्यावर येऊन वडिलांच्या समतीने आम्ही लग्न केले. आतापर्यंत आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. दोघांनी एकमेकांचा हात पकडून, त्या चढ उतारावर घट्ट पाय रोवून ते पार केले. तेव्हा पासून आज तागायात अशी वेळ माझ्यावर कधीच आली नाही..सुलोचना बाई स्वतःशीच बोलत होत्या.बालपणीच्या आठवणीत रमल्या होत्या. आज खूप दिवसांनी त्यांना उजाळा देत होत्या. ५२ वर्षांच्या यशस्वी प्रवासात नवऱ्याप्रती असलेल्या विश्वासात, प्रेमात किंचित देखील फरक जाणवत नव्हता.
एवढ्यात स्वारी आली. हातात काही समान घेऊन जनार्दन राव घरी पोहोचले. त्यांनी आवाज दिला. काय गं कना.. अशी का बसलीस..( सुलोचना बाईना ते प्रेमाने कना असे संबोधतात.) त्यांना पाहताच क्षणी सुलोचना बाईंचा जीव भांड्यात पडला. मनाला लागलेली हुर हूर विसावली. शांत झाली. चेहऱ्यावर आनंद पसरण्यास सुरुवात झाली. जनार्दन रावांना घरात घेऊन पाणी प्यायला दिले. आणि आपल्या कामाला लागल्या.
त्या आत गेल्या हे पाहून जनार्दन रावांनी थोड्या वेळाने सोबत घेऊन आलेला केक समोर ठेवला. सुलोचना बाईना बोलावले आणि म्हणाले, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. " कसं वाटलं माझं सरप्राइज.." "काय हो असा कोणी सरप्राइज देत का ? तुम्हाला माहित आहे का इकडे माझी काय अवस्था झाली होती. तुम्हाला काय कळणार म्हणा..." सुलोचना बाई उत्तरल्या. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या क्षणी त्यांच्या एकुलत्या एका मुलाने त्यांच्यासोबत असायला हवे होते. परंतु परदेशात आपला संसार थाटून तो आता आई वडिलांना विसरला होता. पूर्वी दरवर्षी गावी यायचा. पण आता तेही येणं बंद झालं होतं.
अशा परिस्थितीत आज हे दोघेचं फक्त एकमेकांना आधार होते. काही दुखलं खुपल सांगायला, जवळच म्हणायला त्याची मानलेली मुलगी शिला एकटीच होती. लहानपणी जे प्रेम दोघांनी एकमेकांवर केलं तेच प्रेम आज दोघांच्याही डोळ्यात दिसत होतं. डोळ्यात पाणी आणीत होत. त्यात जनार्दन राव अशा लहानलहान गोष्टीतून कनाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या दुःखी मनावर उबदार फुंकर घालून त्याचा दाह कमी करण्याचा प्रयत्न करत होते. त्या देखील आज ५२ वर्ष पतिव्रता धर्माचे उत्तमरीत्या पालन करीत होत्या. इथपर्यंतचा प्रवास करीत असताना जनार्दन रावांची "कना" कधी त्याच्या आयुष्याचा कणखर "कणा" बनली हे त्यांनादेखील कळलं नाही..