Amit Jahagirdar

Others

4  

Amit Jahagirdar

Others

(जन्मभराच्या) ओळखीचे काका

(जन्मभराच्या) ओळखीचे काका

4 mins
16.1K


अकोला ते सांगली हा तब्बल २१-२२ तासांचा कंटाळवाणा प्रवास. मी वालचंद मध्ये admission घेतली तेव्हा मला वाटले नाही कि हा प्रवास इतका मोठा असेन आणि मी जवळच्या लोकांपासून इतका दूर जाईन. अमरावतीमध्ये होतो तेव्हा फक्त आई बाबांपासून दूर होतो पण घर सुटलं नव्हत. अमरावतीला काका-आत्या-मामा होते त्यामुळे मला घरीच राहायला मिळाले पण सांगली म्हणजे वेगळा प्रकार होता. दूर दूर पर्यंन्त कोणी ओळखीचं नव्हत. अकोल्यात सांगली बँक शिवाय मी सांगलीचा reference कधी ऐकला नव्हता.असो.

अश्या अनोळखी ठिकाणी आमचा प्रवास चालू झाला. आमचा म्हणजे माझ्यासोबत सौरभ होता. विदर्भाने दिलेला पहिला मित्र सांगलीच्या पुढल्या प्रवासाला. महाराष्ट्र express नावाच्या तद्दन slow गाडीने आम्ही हा प्रवास चालू केला. दिवस गणपतीचे होते. घरचे गौरी गणपती आटोपून आम्ही निघायची तयारी केली. सांगली कसे असेल आणि तिथे आपला निभाव लागेल का असे बरेच प्रश्न मनात होते. अकोल्याहून गाडी पुढे निघाली तश्या आमच्या गप्पा चालू झाल्यात. सोबत एक वयस्कर जोडप होत. काका ५५-५६ चे असतील आणि काकू ५० च्या जवळपास. त्यांनी आमची जुजबी चौकशी केली आणि स्वतःची माहिती पण दिली. काका नागपूरचे आणि हल्ली मुक्काम सातारा. एका सरकारी कंपनी मध्ये नोकरी. नवीन गाव बघण्याची हौस या वयात पण टिकून असल्यामुळे काकांनी सातार्याला मुक्काम आनंदात हलवला असे कळले.

आई बाबांनी दिलेल्या अनेक सूचनांपैकी एक सूचना हि पण होती कि अनोळखी लोकांशी जास्त ओळख वाढवू नका. जग वाईट असतं अस नाही पण लोकांचा स्वभाव ओळखायला लागणारा वेळ आम्हाला मिळाला नव्हता आणि असा प्रसंग आमच्या वर लवकरच आला होता. पण काका आणि काकुंशी बोलतांना थोडं मोकळ वाटत होत. रात्री जेवतांना सोबत घेतलेल्या जिन्नसांची देवाण घेवाण झाली. तेव्हा अस काही करतांना संशय घेण्याची प्रथा पण नव्हती आणि गरज पण नव्हती. नागपूरहून सकाळी १० वाजताच्या सुमारास निघाल्यामुळे काका-काकूंनी फारच मोजके पदार्थ सोबत घेतले होते. आमच्याकडे असलेल्या पुरणाच्या पोळ्यांवर आम्ही यथेच्छ ताव मारला. विदर्भातील लोकांसाठी पुरणाची पोळी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. (पूण्यात कुठल्याही पोळीमधून डाळीच गोड पीठ पडायला लागल की त्याला पुरणाची पोळी म्हणतात.)

दुसऱ्या दिवशी आम्ही "पोस्टल् " addressची देवाणघेवाण केली. तेव्हा आपुलकिचे चार शब्द कागदावर स्वार होऊन यायचे आणि त्यांची उजळणी पण करता यायची.

प्रवास संपले आणि आम्ही नव्या प्रवाहात मिसळून गेलो. काकांच्या नावाने आणि पत्त्याने diary मधला एक कागद भरला. असे किती पत्ते आणि नाव फक्त डायरीच्या एका पानासाठी आपल्या कडे येतात आणि त्यातले किती मनाचा थांग शोधून तिथे मुक्काम करतात ?? मी डायरी मधली हि नोंद विसरून गेलो होतो.

साधारण ५-६ आठवड्यांनी एक पत्र आले सौरभच्या नावाने. ते काकांचे होते. त्यांनी साताऱ्याला यायचे आग्रहाचे आमंत्रण दिले होते . सोबत साताऱ्याचा फोन नंबर पण दिला होता. मी त्यांच्या पत्राचे उत्तर पत्रानेच दिले. मग हा "सिलसिला" असाच चालू राहिला. सौरभने काकांनी दिलेलं आमंत्रण seriously घेवून एक दिवस सातारला जाण्याचा बेत आखला. सकाळी जावून संध्याकाळी येण्याच्या तयारीने गेलेला हा पाठ्या दोन दिवस राहून आला. आल्यावर त्याच्या तोंडी काका आणि काकूंचा विषय बरेच दिवस चालला आणि थोडा मंदावला कि एक पत्र हमखास यायचं. मध्यंतरी काका आणि काकू दोघेही सांगलीला कामानिम्मित्य येवून गेलेत. काकूंनी घरून खूप सारे पदार्थ करून आणले. घरापासून दूर राहत असल्यामुळे आम्हाला आग्रहाच निमंत्रण देण्याची वेगळी गरज पडली नाही. नंतर मी देखील एकदा त्यांच्या कडे राहून आलो. घरापासून इतकं दूर असूनही एक घरच मिळाल होत.

अकोल्यापासून इतक्या दूर राहत असल्यामुळे सगळ्याच गोष्टी घरच्यांसोबत चर्चिल्या जायच्या नाहीत. STD फोनचे दर आणि दूरुन लावून दिली जाणारी घरघर, दोन्ही परवडायचे नाही. मग काही नाजूक विषय काकांसोबत सविस्तर बोलल्या जायचे. आपल्याकडूनच उत्तर काढून घेण्याची कला काकांजवळ असल्यामुळे सापडलेला उपाय सहज आणि सोप्पा वाटायचा. आमच्या असल्या गप्पा तासन् तास चालायच्या. त्या ओढीने जमेल तेव्हा सातारला जाण्याचा प्लान व्हायचा.

माझ्या लग्नात काकांना बोलावण्यासाठी मी फोन केला तेव्हा काका बोलले कि आम्ही जगन्नाथ पुरी च्या यात्रेला जाणार आहोत. माझे लग्न १८ नोव्हेंबर ला आणि काका २० तारखेला परत येणार होते. मी काकांना जास्त आग्रह केला नाही शेवटी त्यांना सगळ्या group ला सोडून येण जमल नसत. पण काही नाती असली बंधन पाळत नाहीत, बंध मजबूत असले कि !! त्यांचा सगळा बेत बदलून काका आणि काकू आमच्या लग्नाला आले होते. कोण कुठे भेटलो भेटी वाढल्या आणि दोन्ही बाजूंनी टिकवल्या गेलेत.

माझ्या वाढदिवसाला काकांचा फोन हमखास येतो. अगदी कुठेही असले तरी !! नाहीतर मला चुकल्या सारखे वाटते. आणि मी नागपूरला आलो कि त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही.

नातं मग एका भेटीतल असो किंवा बऱ्याच भेटीतून वृद्धिंगत झालेल ! वरचेवर भेटून ते टिकवावं लागत. touch मध्ये असण हे एका mouse च्या click मध्ये नाही होत ना.

त्यासाठी सगळे sense कार्यरत झालेत पाहिजे. नात्यांना गंध असतो, स्वर असतो, स्पर्शाची भाषा असते !!! जपायला सगळे लागतात आणि तुटायला एक सुद्धा कारण होऊ शकतो.

निर्लेप आणि नि:स्वार्थ नात बनायला कठीण पण टिकवायला सोप्प !!! काकांनी तो विश्वास दिला सगळ्या आयुष्यभरासाठी !!! Thanks लोटे काका आणि काकू !!!!


Rate this content
Log in