जीवघेणा अभ्यास...
जीवघेणा अभ्यास...
रात्रीचे बारा वाजले तरी भावनाला झोपच येईना..सारखा तिच्या मनात तोच विचार घुसमटत होता... खरचं जिवापेक्षा अभ्यास महत्त्वाचा आहे का????...हो की नाही या द्विधा मनःस्थितीत ती होती....तिने स्वतःला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला पण तो अनुत्तरित राहिला...आणि सकाळपासून जे जे घडले ते परत तिच्या नजरेसमोरून गेले.....
दुपारची वेळ होती...ती तिच्या तिसरीत असणाऱ्या मुलाला अभ्यासासाठी म्हणत होती... "अरे आकाश ....ठेव तो मोबाईल...जेवून घे...तुझ्या हातात मोबाईल असला की तुला जेवणाची पण शुद्ध नसते...जेवून घे आधी"..
"थांब गं आई पाच मिनिट"...
"अरे पाच मिनिट म्हणता म्हणता अर्धा तास झालाय"...
"अगं आई भूक लागली की जेवण करेल ना"...
"बरं मग अभ्यासाला बस"...
"नको गं आई...आताच ऑनलाईन क्लास झाला ३ तास..परत होमवर्क पण करायचे आहे...थोड खेळलो की जेवतो..मग होमवर्क करतो"...
"नाही नाही अजिबात नाही...दे तो फोन इकडे"
आकाश फोन सोफ्यावर फेकून देतो..आणि रागारागाने बेडरूममध्ये जातो..
भावनालाही खूप राग येतो...ती बेडरुममधे जाते...
"आकाश तू खूप लहान आहेस....अभ्यास खूप महत्वाचा असतो.. तुला ते आता नाही कळणार.. मोठा झाला की कळेल"....
"मी मोठाच आहे आता...तू जा...तुझं काम कर"
हे एकून भावनाला खूप राग येतो...ती त्याच्यावर हात उगारते...ती त्याला मारणार तोच तो तिला म्हणतो...."फक्त मारून काही उपयोग होत नाही...त्यापेक्षा माझा जीव घे...नाही तर मी माझा जीव घेतो...म्हणजे तुलाही रोज रोज मला अभ्यास कर... अभ्यास कर... म्हणावं लागणार नाही...आणि माझी पण सुटका होईल...सारखं सारखं अभ्यास...अभ्यास... दुसरं काहीच नाही.. कंटाळा आलाय आता मला ..या सर्वांचा"...
नकळत तिचा हात खाली येतो..ती क्षणभर विचार करते...आणि त्याचा हात धरून किचनमध्ये नेते..."बरं नको करू अभ्यास जेवून तर घे"...
"नाही गं मला खरच भुक नाही"....
"बर एक सांग आई...मी हा जर चाकू माझ्या पोटात खुपसला तर मी मरेल का गं??"....
भावना आधी घाबरते...पण मग तिने हसत म्हटले..."अरे वेड्या तू मरणार नाहीस...पण तुला खूप त्रास होईल.. रक्त येईल..डॉक्टर कडे न्यावे लागेल.... इंजेक्शन...गोळ्या औषध....घ्यावे लागतील"...
"बरं मग घरावरून उडी मारली तर"...तिने तेव्हाही हसत उत्तर दिले..."आपली बिल्डिंग एवढी मोठी नाही...तू उडी घेतली तर फक्त हातपाय मोडेन बस ..त्रास होईल तुला खूप...बेडवर राहावं लागेल बरेच दिवस"...
भावनाचा एकच उद्देश होता की..भीती दाखवली तर तो आत्महत्येचा विचार त्याच्या डोक्यातून निघून जाईल...
"आई अगं...मरण पण कठीणच आहे की... आणि जगणं पण"...
"जगणं नाही रे कठीण..तू सगळ्या गोष्टी आनंदाने कर...मग बघ तुला किती हायस वाटेल सगळं आयुष्य...आणि काही गोष्टी नाही आवडत आपल्याला पण कुठेतरी गरज असते त्याची... म्हणून तरी कराव्या...कारण वेळ कुणासाठी थांबत नाही....पुढे जाऊन अस नको वाटायला की...आपण तेव्हा केले असते तर बरे झाले असते"...
आकाश जेऊन बाहेर खेळायला जातो,..
भावनाच्या डोक्यातून हा विचार जातच नाही की...आकाश एवढा लहान आहे..याला हे मरायचं सुचलं कुठून???...
संध्याकाळ होते..आणि टिव्हीवर बातम्या लागतात...त्यातही हाच विषय...नवी मुंबई इथे एका १५ वर्षाच्या मुलीने...आई अभ्यासाचा तगादा लावते.... म्हणून तिचा गळा बेल्टने दाबून हत्या केली...
तर दुसऱ्या बातमीत..नाशिक येथे एका तीन वर्षाच्या मुलगा अभ्यास करत नाही म्हणून आईनेच पोटच्या मुलाची हत्या केली...आणि मग स्वतः आत्महत्या केली....
हे बघून भावनाच्या पायाखालची जमीन सरकते...आणि म्हणून तिला रात्रभर झोपच येत नाही...
खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना.. अभ्यास हा जिवापेक्षा महत्वाचा आहे का???आईवडिलांनी मुलांना अभ्यास करा हे म्हणणं चुकीचं आहे का???अभ्यास न केल्यामुळे हत्या करणं हे कितपत योग्य आहे ??? सारखा अभ्यासाचा तगादा लावते म्हणून खून करणं बरोबर आहे का?? मुलं लहान असतात त्यांना नाही कळत म्हणून पालकांना अभ्यासाचे त्यांना सांगावे लागते..पण जर मुलं टोकाची भूमिका घेत असतील तर त्यांना पालकांनी काय करावे??