घुंगरू - भाग 8
घुंगरू - भाग 8
रत्नमाला..... बापू , माई आणि मालतीच्या काळजाचा तुकडा..... मालतीला आईपण मिळालं होतं, बापुना बाप होण्याचं भाग्य आणि माई तर नातीच्या स्वप्नात गुंग असायच्या.......दिवसा मागून दिवस जात होते, रत्ना रांगु लागली, माईंनी तिच्यासाठी साठवणीतल्या पैशातून पैंजण आणले, नातीच कोड कौतुक करण्यात माई रमून जात,... रत्ना लुटू लुटू चालू लागली, गोर गोमट बाळ गुटगुटीत अगदी वाडा फिरवून माईना दमवून टाकायच...... बापू तर काय रत्ना म्हणजे जीव च होता त्यांचा, हळू हळू रत्ना मोठी झाली बोबडे बोल सोडून चांगलं बोलू लागली, बापुना रत्नाचा नाव गावातल्या शाळेत घातलं, रत्ना घरच्यांची लाडकी तशीच गावातल्या सगळ्यांची लाडकी होती....... बापू गावच जमीनदार म्हंटल्यावर त्यांची पोर गावाची लाडकी असणारच.....
मालतीच पहिल्यासारखा सगळं चालू होतं, नोकर मानस ,शेत गडी बाया आणि शेतातली देखरेख,...... पण माळावर जायचं विसरत नव्हती, पहिल्यासारखा रोज नाही पण आठवड्यातून एकदा तरी जायचीच....... माईंनी विषय सोडून दिला होता, रत्नाच्या वेळेस किन्नरानी केलेली मदत माई कधीच विसरत नव्हत्या...... रत्ना जसजशी मोठी होऊ लागली तस तिची आवड,छंद दिसू लागले, तिच्या आवडी निवडी जपण्यात बापू कुठं कुठं कमी पडू देत नव्हते.....रत्ना जस जशी मोठी होत होती तिच्यात एक छंद वाढत चालला होता, तिला नृत्याची खूप आवड होती, लहान आहे म्हणून सगळ्यांनाच कौतुक वाटे, पण मालतीला हे कुठतरी खटकत होत..... ती नेहमी म्हणायची, रत्ना... आग अस नाच गाण घरंदाज घराण्याला नाय सोबत, तुझ्या बा ला सारा गाव मानतू, लोकांना बोलायला जागा नग दिऊ, उद्या मोठी झाली आन असच करत रायलीस तर सारी लोक म्हणत्याल बापू सगळ्या गावाचा कारभार करणारा आन लेक नाचून नाव घालवतीय...... पण रत्ना काही ऐकत नसे. बापू म्हणायचे ,असूंदे ग मालू लाडाची हाय माझी पोर, तिला तिच्या मनासारख करू देत जा बर....... मालती यावर निशब्द व्हायची,पण.... पण..मनातून खचलेली असे...
शेतावर जाताना कधीमधी वस्तीवर चक्कर असायची, तिकडं जाऊन आल्यावर अस्वस्थ असायची...... रत्ना आता मोठी झाली , ती वयान मोठी झाली पण लाडात वाढल्यामुळ ती मोठी झाली अस समजून घेत नसे... हट्टी स्वभाव होता रत्नाचा, बापू तर जीव ओवाळून टाकत लेकीवरून....रत्ना वयात येत होती ,, एकदिवस बापूंकडे तीन हट्ट धरला.... मला बी बाजाराला यायचंय म्हणून,,, लेकीला ऊन लागल म्हणून बापूंनी बैल गाडीला छत बांधून घेतली,मालती आन माई नग म्हणत असताना बापुनी रत्नाला बाजाराला घेऊन जायचं ठरवलं... बाप लेक बाजाराला गेली,, सगळ नटायच साहित्य गोळा करत होती रत्ना सगळ्या बाजारात, लेकीच्या माग बापू पिशवी घेऊन हिंडत होते....... एक जाग्यावर रत्नाला घुंगराचे चाळ दिसले, धावत त्या दुकानाजवळ आली.... आधीच नाचण्याचा छंद त्या मुळे मनाला आवर घालणं तिला जमल नाही, बापू मला घुंगर घ्यायची हायत....... बापू म्हणाले.. आग रत्ना असलं आपल्यात नायत घालीत ,,, चल तुला सोनाराच्या हीत पायजे तसलं चांदीच पैंजण घेऊन देतो....... पण ऐकेल ती रत्ना काय,,, ती म्हणाली,,,, बापू मला हेच घ्यायच हाय..... तुमि नाय घेतलं तर म्या घरला येणार नाय...... बापू समजावत होते.....पण ती रडवेल तोंड करून हट्ट धरून बसली होती,
लेकीच्या हट्टापुढ बापूचा नाईलाज झाला......... पैसे ठरवून रत्नान चाळ घेतल,,, बाजारातच पायात बांधून बघू लागली, तस बापू म्हणाले,
रत्नमाला आग बाई अस घेतलेल्या वस्तू बाहेर बघू नये घरी गेल्यावर घालकी........कसबस समजावून बापुनी तिला गाडीत बसवली, रत्ना सार घेतलस नव्ह? काय राह्यल नाय न? नायतर घरी गेल्यावर मनायची माझ आमक राह्यल मनुन....... त्यावर रत्ना म्हणाली... नाय बापू म्या सार घेतलय, आन म्या आज लय खूश हाय ,कारण मला घुंगर बी मिळाली, मला लय आवडत्यात पर आल्याकड नायती न.......... आग पर रत्ना घरी तुझी आय आन आजी काय मणत्याल ठाव हाय का? त्यांला नाय जमायचं हे ,मंग काय करशीला?... ते बघिल म्या आयला काय सांगायच ती पर बापू आजीला तुमि सांगा, मला लई बोलल, म्या तुमचंच नाव सांगणार हाय ............. अश्या गप्पांच्यामध्ये गाडी वाड्यासमोर येऊन थांबते.....
(क्रमशः)
