Vasudev Patil

Others

3  

Vasudev Patil

Others

घावटी

घावटी

9 mins
592


आभाळ दोन दिवसांपासून नुसतं घुरमट धरून बसलं होतं. सारी थरवाडी रित्या ढगात बुडाली होती. झाडाची पत्तीही हालत नव्हती. ऐन हिवाळ्यात अंगास घामोटा जाणवत होता. नलू मॅडमनं चेहऱ्यावर पाण्याचा सपका मारत आरशात पाहिलं. पण तिला रयाच वाटत नव्हती. दोन दिवसापासून सदा सर आलेच नव्हते. एवीतेवी हल्ली ते केव्हा येतील नी केव्हा जातील याचं टाईम टेबलच नव्हतं. नलूला आपण या माणसाची जीव तोडून वाट का पाहतो हेच कळत नव्हतं. आजही ती सकाळपासून चहावरच होती. स्वयंपाक करूनही दुरडीत पोळ्या तशाच होत्या. फक्त बाल्याला जेवू घालत ती सदा सर जेवले नसतील तर मग आपण कसं जेवायचं या विचारानं तशीच झोपली. बाल्याला सरांना शोधून आणावयास पिटाळलं होतंच.

 

बाल्यानं साऱ्या थरवाडीचे पाडे, अड्डे, नदी, नाले व कपारी धुंडाळल्या. एकेक भट्टी झामलत तो बेडवाई पाड्यात सरकला. थरवाडीपासुन डोंगर चढत-उतरत नदीतून चार पाच मैल चालत गेल्यावर हा पाडा लागे. नदीच्या पाण्यातून चालतांना दगडगोटे, खेकडे सांभाळत खोलगट भागातून चालतांना बाल्याला भिती वाटू लागली. शिवाय सर जर तिथं ही नसतील तर एकटं परतावं लागेल अंधारातून. म्हणून त्यानं पाच वाजायच्या आत धावतपळत बेडवाई पाडा गाठला. पाड्यात जिकडे तिकडे दारूच दारुचा महापूर. तो एकेक भट्टी झोपडी झामलू लागला. 'आया','आया' करत हातवारे करत भेटेल त्याला विचारू लागला. बऱ्याच लोकांना तो मुका आहे व काय विचारतोय हे माहित असल्यानं बोट दाखवत पुढे पाठवू लागले. तसा त्याला सर येथेच आहेत यानं धीर येऊ लागला. दोन डोंगराच्या बेच्यात नदी जेथून उगम पावत होती त्या दाट झाडीत सिंगा सरदाराची भट्टी चालायची. तो तेथून सिमेपार मध्यप्रदेशात दारू पुरवायचा. त्याच्या नादाला पोलीस ही लागायचे नाही. दरारा व दहशतीनं या ठिकाणी कुणीच पाय ठेवायचा नाही. पण सदा सरांना व बाल्याला याची भिती नव्हती. सदा सरांना थरवाडी, बेडवाई व सिंगा सरदारा ही देव मानायचे. पण हा त्यांचा देव एक वर्षापासून पुरा दारूत वाहत होता. बाल्या पोहोचला तेव्हा आंब्याच्या दाट राईत सदा सर उताणे पडले होते. कपडे माती चिखलानं माखलेले. तोंडावर माशा भणभणत होत्या. दाढीच्या वाढलेल्या खुटात चिलटे भुणभुणत होते. आधीच आभाळानं घुरमट घातलेलं,त्यात पहाडात लवकर अंधार पडतो. म्हणुन लवकर परतण्या साठी बाल्या तडफड करत होता. "आया, आया!"करत त्यांना उठवत होता. पण सदा सर टसमस होत नव्हते. बाल्याची घायकुत पाहून सिंगा सरदारानं बादलीभर पाणी सदा सरांच्या अंगावर ओतलं. सदा सर डोळे चोळत पाणी हातानं निथरवत उठले. "आया, आया" करणाऱ्या बाल्याला पाहताच "अरे!बाल्या तू!"

तसं बाल्या हात धरत सरांना उठवू लागला.

"बाल्या झोपू दे रे!त्या थरवाडीत परतून काय करू!ती थरवाडी मला गिळायला उठते रे",सदा सर हात सोडवत त्याला झिडकारू लागले.

"मालक, तुम्ही इथं राहणार पण ते पोरगं एकटं कसं परतणार? अंधार पडतोय लवकर निघा"सिंगा सरदारा विनवणी करत बोलला.

सदा सर बाल्याला घेत झोकांड्या देत परतू लागले. तो पावेतो अंधारानं हातपाय पसरले होते. रस्त्यात चालणाऱ्या भट्टीवरनं सदा सरांनी सोबत बाटली घेतली. नदीतल्या पाण्यात चिबूक डिबूक आवाज करत दोघे थरवाडीकडं परतू लागले. झाडीतून किर्रर्रssss. . आवाज येत होता. चालतांना सदा सर बाटलीतून घोट घोट उतरली तशी रिचवतच होते. आता आभाळातला घामोट्यात उतार होत थंडी वाढत होती. थरवाडी जवळ यायला त्यांना रात्रीचे आठ वाजले. पाड्या पाड्यात उंच सखल भागात लाईट टिमटिमायला लागले होते. थरवाडी येताच सदा सरांनी बाल्याला "मी आलो तू चल पुढे"सांगत बळजबरीनं काढलं.  त्यांनी पुन्हा सरीच्या गुत्त्याची वाट वाकडी केली. आता त्यांचे पाय एकमेकात अडकत होते. सरळ रस्ता ओलांडून ते काॅलेजकडनं पुढे सरकणार तोच घुर्र्रर्रर्र . . आवाज व तीव्र प्रकाश शलाका त्यांच्या अंगावर आली. व कचकचाकच ब्रेक दाबत गाडी थांबली. सदा सरांचे हात गाडीच्या बोनटवरच टेकले गेले. "सांभाळ रे बाबा! आधीच मेलेल्या माणसाला मारून तुला काय मिळणार?"

सदा सर बोलत अडखळत सरकणार तोच धुंदीतही

विक्रांत कदम व सली गाडीत बसलेली त्यांना ओझरती दिसली. सदा सराच्या डोळ्यातली धुंदी क्षणात डोक्यात सरकत नस तडकू लागली.

"सले कसं असतं तुला माहितीय का? साधी लोकं कोऱ्या पाठीवर रेघोट्या मारल्या की स्वत:ला तुर्ररम खान समजतात. पण आमच्या सारखे बिलंदरच खरे सिकंदर असतात.  कारण आम्ही कोऱ्या पाटीवर रेघोट्या मारण्यासोबतच इतरांच्या पाट्या पुसुन टाकुन त्यावरही नवीन रेघोट्या मारतो. नी तसल्या पाट्या पुसतांना जी धूळ उडते ना ती हाता अंगावर उडाली की वेगळीच मजा येते. भले सामान्य बुद्धीचे लोक त्यास बदनामी म्हणत असतील. पण आम्हाला त्यात वेगळीच धुंदी,नशा येते. आमच्या बापानंही अशीच पाटी पुसली व आम्ही पण तशीच."

सरीता मिश्कील हसली.

"विक्रांत मुकाट्यानं चल आता!याची तर पाटीच फुटलीय!"


गाडी निघून गेली पण सदा सरांनी भिरकावलेल्या दगडांनी खांब्यावरचा लाईट व आजुबाजूच्या झोपडीवरचे कौलं फुटू लागले. त्यांनी सरीच्या गुत्त्यावर बाटल्यावर बाटल्या रिचवल्या. रात्री अकराच्या सुमारास सदा सर खोलीवर परतले. अडखळत जिना चढतांना पडले. त्या आवाजानं वाट पाहत असलेली नलू मॅडम उठली. दरवाजा उघडत ती जिन्याकडं धावली. पायरीत तोंडावर पडलेल्या सदा सराला उठवत एक हात खांद्यावर घेत आधार देत त्यांना त्याच्या खोलीत आणलं. खोली उघडून लाईट लावत पलंगावर टाकत ती अंगातले माती, चिखलानं भरलेले कपडे काढणार तोच तिच्या अंगावर भितीचा काटा उभा राहिला. या अवस्थेत कुणी पाहिलं तर? या विचारानं ती क्षणभर मागं सरकली.

"नलू मॅडम!साले लोक आमच्या पाट्या पुसतात हो!माझी तर माझी पण आमच्या खानदानाच्याही? हूं! ती तर माझ्या आईनंच स्वत:हुन पुसायला दिली!"

सदा सर रागानं बेभान होत रडायला लागले. मागं सरकून भिंतीला उभी असलेली नलू यानं बावरली.

"नले लोकांनी काय म्हणायला व तुझी इज्जत जायला तुझ्याजवळ ती होतीच केव्हा?तुच कमावली ती स्वत:च्या सच्छील वागणुकीनं. नी दिना गुरुजीच्या संस्कारानं!मग का उगाच भिते लोकांना? शिवाय तुझ्या मनात समर्पण आहे, पाप नाही" असा मनात विचार करत ती पुढे सरकली. सदा सराच्या अंगातला सदरा तिनं बाहेर काढला. तोंडाच्या दारुचा उग्र दर्प येत असुनही हात पाय तोंड धुतले. सदा सराचा तोल जात नलूच्या अंगावर ते ढासळत होते. सदा सरांचा राग निवळत त्याची जागा आता गहिवर घेत होता. नलूला पुरुषी अंगाचा मर्दानी गंध प्रथमच जाणवत होता. पण त्यावर सेवाभावानं क्षणात मात केली. सदा सरांना पलंगावर बसवत नलूनं खोलीतून जेवणाचं ताट करून आणलं व ती घास भरवू लागली. पण नशेत धुंद सदा सर जेवतच नव्हते . नलूही सकाळपासून चहावरच होती. कोणती अनामिक ओढ,कोणतं हे नातं असावं? की आपण इतकं गुरफटावं. सलिता मॅडमनं सदा सरांना दिलेल्या धोख्यामुळं सहानुभूती की सदा सरांची ओढ? नलूनं जबरीनं खाऊ घालत पाणी पाजत ताट उचललं. खोलीत येऊन दोन चार घास ढकलले.

आता सदा सर झोपेच्या अधीन होत होते पण बरळणं सुरुच होतं. नलूनं पुन्हा खोलीत परतत लाईट घालवत चादर अंगावर टाकू लागली. तोच तिचा हात पकडत "सले!का गं अशी दूर चाललीस!"सदा सर झोपेतच . . .

नलू मॅडमाच्या सर्वांगावर शिरशिरी दाटली. सदा सर हात ओढतच होते.

नलूनं शांतपणे हात सोडवत चादर टाकत बाहेर पडत खोलीचं दार लोटलं. खोलीत येताच नलू मॅडम शाबूत इभ्रतीनं रात्रभर तळमळत राहिल्या.

   

सकाळी उठल्यावर उतरताच सदा सरांनी अंघोळ उरकवत कपडे चढवत बाहेर पडण्याची तयारी चालवली. तोच नलू मॅडमांना चाहूल लागली. त्यांनी उठत तोंडावर पाणी फिरवलं. कारण आता जर सदा सर निघून गेले तर पुन्हा एक दोन दिवस भेट होणार नाही. म्हणून त्यांनी गडबडीतच बाहेर येत खोलीतच सदा सरांना गाठलं. दारात नलू मॅडमांना पाहताच खाली मान घालत सदा सर कोपऱ्यातच थांबले.

"नलू मॅडम रात्री माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा. शुद्धीत नसल्यानं…"

"एरवी ही आपण कुठं शुद्धीत असता हल्ली सर! नी चूक घडली तरी या नलूला त्याचं काहीच सोयरसुतक वाटणार नाही. "

"……",

सदा सरांची मान आणखीनं खाली झुकली.

"दत्ता सावंत सरांचा परवापासून तीन- चार वेळा फोन येऊन गेलाय. आजीची तब्येत सिरीअस आहे. तुम्हास ताबडतोब बोलवलंय निसरणीला. आजीनं तुमचा घोस लावलाय. जीव अडकलाय तुमच्यात !"

आजीच्या तब्येतीपेक्षा ही दत्ता सावंताचं नाव ऐकताच सदा सरांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

"मग सर निघताहेत ना आज निसरणीला?"

"निसरणीला!"जोरात उसासा टाकत सदा सरांनी तोंड कडवट गेलंय.

"आजी आहे तुमची!तुमच्या शिवाय त्या जिवाचं कोण आहे या जगात?जो जीव आमच्या सारख्या परक्याला क्षणात आपलं करतो,तुमची तर बातच न्यारी. निदान अशा जिवास मरतांना तरी शांती मिळावी. म्हणून तुम्ही आज जाणार अशी आशा धरते अन्यथा उद्या मीच निघते"म्हणत नलूचं ह्रदय दाटून आलं.

"तसं नाही पण मधा व माधवी आहे ना! शिवाय आजोबा ही!मग आणखी मी जाऊन काय करणार?"

"मरणाऱ्या माणसासाठी भेटणारा माणूस काहीच करत नाही सर. पण. . . . ,"

नलच्यानं पुढे बोलणंच होईना.

"मॅडम कळतं हो मला. पण ज्यांना ज्यांना मी जीव तोडून जीव लावला अशी माणसंच जिवावर उठली व निघून गेली. आजीच अशी एक आहे की निदान ती तरी जीव ओवाळतेय. पण . . . पण माधवी. . . . . "

"अहो सर निदान जीव लावायला तुम्हास माणसं तरी आहेत. आमच्या नशिबी तर. . . . . . "नलू आता रडायला लागली.

"सदा सर लक्षात ठेवा माणसं निघून गेली, कोणी आपल्या पाट्या हिसकावून पुसल्या व रेघोट्या मारल्या तरी जिवनात आपली गेलेली पाटी पुन्हा हिसकावण्याची धमक ठेवावी माणसानं. ते ही होत नसेल तर दुसरी कोरी पाटी घ्यावी. पण लिहीणं सोडायचं नसतं जिवात जिव असेपर्यंत" नलू जीव तोडून ह्रदय उकलत होती.

'पाटी' ऐकल्याबरोबर सदा सर संतापानं थरथरू लागले.

"संताप, राग आवरा व त्या माऊलीची सरती भेट घ्या" म्हणत नलू बाहेर पडली. स्नान उरकत ती शाळेला निघाली.

सदा सर बराच वेळ तंद्रीत बसुन राहिले. 'दत्ता, आजी आठवून रडू लागला तर सली विक्रांत, माधवी यांच्या तिरस्कारानं लाल होऊ लागला. आणि आई…आई आठवताच तर तो नागापेक्षाही त्वेषानं फुत्कार सोडू लागला. बाल्या उठला होता तो खोलीत आला. सदा सरांना पाहून तो घाबरून कोपऱ्यात शांत बसला. त्याला जवळ घेत "बाल्या !" म्हणत सदा सर उठले. पण निसरणीला निघण्या ऐवजी भट्टीकडंच. मागोमाग येणाऱ्या बाल्याला परोपरीनं विनवत त्यांनी माघारी पाठवलं.  अंगात मव्हडा भिणताच डोक्यातून पाटी घुमू लागली. धूळ उठू लागली. ही धूळ आपण पाच -सहा वर्षांचे होतो तेव्हापासून सारखी राळ उठवतेय नी आपण त्यात पुरतं झाकोळून माखलं जातोय. आजी आजोबा जीव तोडून ही धूळ साफ करतायेत. तोच पुन्हा सलीनं ही अशीच धूळ उठवण्याची संधी विक्रांतला दिली नी मग आपण पुरतं गारद झालो. आता आजी थकल्यानं दत्ता, नलू मॅडम धूळ साफ करताहेत पण आपण धूळ माखलेच. यानं मग एकादी बाटली मारून निसरणीला निघायचं ठरवूनही सदा सर उठलेच नाही. दुपार पर्यंत त्यांचा टांगा पलटी होऊन घोडे फरार झाले.  सरीच्या गुत्त्याबाहेरच आडव्या पडलेल्या सदा सरांना शाळेतून परततांना नलू मॅडमनं पाहिलं नी तिच्या काळजात चर्र. .  झालं. ती तशीच शाळेत परतली व आठ दिवसाची रजा भरुन दुपारून बाल्याची शेजारी व्यवस्था लावत निसरणीकडं निघाली. निघतांना तिनं दत्ता सरांना फोन करून सारं कळवलं. जिपनं तालुक्याला व तेथून एस. टी. , रेल्वेनं नी मग पुन्हा एस.  टी पकडत रात्री च्या दहाला ती निसरणीत उतरली. गाडीत ती पुन्हा पुन्हा स्वत:लाच विचारत होती-का आपण इतकी धावपळ करुन जातोय?ज्यानं यायला हवं तो तर नशेत तर्रर्र होऊन पडलाय. मग आपण त्याच्याच साठी जातोय की आजीसाठी?नाही तरी आपलं म्हणून या जगात आपलं कोण आहे?केशव गुरुजी?की सदा सर?की आजी?. .


आजीनं काही नातं नसतांना जी माया दाखवली त्यासाठीच का? साऱ्या प्रश्नाच्या गाठींचा गुंता घेऊनच त्या पायऱ्या चढल्या. आजोबानं नलूस पाहताच " सदाची मोठमाय! बघ कोण आलं तुला भेटायला!" म्हणत उरातला हुंदका महत्प्रयासानं दाबला. आजीनं मोठ्या कष्टानं डोळे उघडत नलूचा हात हातात घेत मायेनं नलूला प्राशायला सुरुवात केली.  मग लगेच खाणाखुणा करत माझं पोरकं लेकरू सदा कुठंय? म्हणून इकडं तिकडं अधाशा सारखी पाहू लागली. नलूची मान खाली जाताच ती नजर तशीच कोरडी माघारली.

"सदाची मोठमाय,असेल पोर कामात!येईल. पोरगी तरी आली ना!"बाबानं मोठ मन करत खोटा दिलासा दिला पण तेही काळजातून हबकलेच.

आजी उठवत नव्हतं तरी उठत नलूला बिलगत होती. जमलेल्या शेजाऱ्यांनी जेवन आणलं . नलू दोन दिवसांपासून चहा व रात्रीच्या दोन चार घासावरच होती. पण तरी तिची जेवणाची वासनाच नव्हती. पण शेजारणीनं आजोबा व नलुस जबरीनं आग्रह करवून जेवू घातलं.  नलूनं परिस्थती पाहून लगेच दत्ता सरांनी सांगितल्यानुसार फोन करून कळवलं.  दत्ता सरांनी आपली कार काढत रात्रीच थरेवाडीचा रस्ता पकडला. रात्री एकच्या सुमारास त्यांनी ओळखीच्या माणसांना उठवत "आताच्या आता माझ्या सदाला शोधा" म्हणून फर्मान सोडलं. दत्तासर, सदा सर साऱ्या थरेवाडीचेच देव. त्यांनी लगेच अंधारात थंडीत झोपड्या झामलायला सुरूवात केली. दत्ता सर ही अंधारात धडपडत उठत फिरतच होते.

 नलू आजोबा रात्री दोन पर्यंत आजीच्या उशाशीच बसून होते. उत्तर रात्रीला सह्याद्री पर्वतातून निसरणीत थंडी उतरू लागली तसे आजीच्या ग्रहदशेला यम लागले. आजीची शुद्ध हरपायला लागली. नलूचा हात धरत "रेवती पोरी माझी गुणाची लेक शेवटी आलीच ना आईला भेटायला!"आजी बरळू लागली. आजोबा रेवतीचं नाव निघताच कडवट तोंडानं धाय मोकलू लागले. नलूला त्याही स्थीतीत आपण कशासाठी आलो याचं उत्तर सापडलं. आजीचं बरळणं सुरुच होतं. कधी रेवती तर कधी नलू.

. "नलू पोरी माझ्या सदाला सांभाळ गं!" म्हणत आजी बरळू लागली व नंतर घशाला घरघर लागली. पहाटे शेजारी उठले. त्यांनी नाडी ,ठोके पाहत आजीला भुईला उतरवत माधवला फोन लावला. सदासाठी नलूचा फोन दत्ता सरांच्या फोनवर खणखणला नी तिकडं सदा सापडला. भल्या पहाटेच दत्ताला पाहताच सदाच्या मनाचा सागर उचंबळला पण तो पावेतो आहे त्या स्थितीत दत्तानं त्याला गाडीत टाकलं व गाडी निसरणीच्या वाटेला लावली.

(क्रमश:)


Rate this content
Log in