गाडी बुलाया रही है...........
गाडी बुलाया रही है...........
गाडी बुला रही है
शकुंतला एक्सप्रेस चा विषय निघाला त्यामुळे बालपणीच्याआठवणी ताज्या झाल्या. त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे.
मुर्तीजापुर ते यवतमाळ या नॅरोगेज मार्गावर असलेले दारव्हा हे माझे जन्मगाव. माझे दहावीपर्यंत शिक्षण येथेच झाले. बालपणी रेल्वे येण्याच्या वेळी स्टेशन वर मित्रांसोबत खेळायचं. शकुंतला गाडी क्वचितच ठरलेल्या वेळी यायची. त्यामुळे बराच वेळ स्टेशनवर खेळणे व्हायचं . खेळताना स्टेशन मास्तरला विचारले की गाडी किती लेट आहे तर त्यांचे कायम उत्तर असायचे की गाडी आल्यावरच कळेल.
शकुंतला गाडीला जेमतेम तीन किंवा चार डबे असायचे तिच्या वेगा बद्दल गमतीने म्हणायचे की गाडी सुरू असताना पहिल्या डब्यांमधून खाली उतरून आवश्यक विधी उरकून तिसऱ्या डब्यामध्ये बसता येते. कधीकधी गाडी चढावावर थांबून जायची प्रवासी म्हणायचे चला खाली उतरून गाडीला धक्का मारुया.
आमच्या शाळेची सहल दरवर्षी शकुंतला गाडीनेच व्हायची. दारव्हाहून पश्चिमेला 20 किलोमीटर वर नदीकाठी तपोना हे गाव आहे तिथे महादेवाचे जुने मंदिर आहे. वर्गात शिक्षकांनी विचारले यावर्षी कुठे सहलीला जायचे तर सर्व मुले एक साथ ओरडायची तपोना. यामध्ये स्थळ दर्शन पेक्षा मित्रांसोबत शकुंतला मधला प्रवासाची जास्त मजा असायची. एके वर्षी अशाच सहलीच्या वेळी घढलेला किस्सा. सर्व मुले शकुंतला मध्ये बसली गाडी सुरू झाली आणि मुले गाण्याच्या भेंड्या किंवा इतर खेळामध्ये दंग झाली. थोड्यावेळाने गाडी थांबली मुले म्हणाली चला उतरा तपोना आले. खाली उतरून बघितले तर गाडी दारव्हा स्टेशन वर परत आली होती. त्यादिवशी आमची शकुंतला तपोनचा चढाव चढू शकली नाही. आम्ही दारव्हा स्टेशन वरच डब्बा पार्टी करून घरी परत आलो .
शकुंतला गाडीला गरिबांची गाडी म्हणायचे तिकीट खिडकीवर कोणीच नसायचे पण गाडीत मात्र भरपूर गर्दी.
अशी आमची शकुंतला म्हणजे आमचे करमणूकीचे साधनच होती. आता ही गाडी बंद आहे. फक्त आठवणी बाकी आहेत.
