Pallavi Patil

Others

3.4  

Pallavi Patil

Others

मनाचा मनाशी झालेला संवाद

मनाचा मनाशी झालेला संवाद

2 mins
365


नात्यांची गुंफण ही एका रेशमी धाग्याप्रमाणे असते, सगळी गुंफण एकसारखी असेलच असे नाही... पण माळच ती! सुंदर भासते जेव्हा तिला सुंदर नजरेने पहिले जाते.  जगात अनेक प्रकारची माणसं आहेत. प्रत्येकाची इच्छा आकांक्षा वेगळ्या, त्याप्रमाणे त्यांचे व्याप! सध्या आपण एकमेकांशी व्हाट्सअप, सोशल मीडिया इत्यादीमुळे आहे तर संपर्कामध्ये... पण कीपॅडपुरते मर्यादित, जवळ असूनही एकमेकांपासून कोसो दूर! वरवरंच म्हणायला फक्त "जवळ".


मनाच्या कोपऱ्यात कितीही आपलेपणा आपुलकी आणि आठवण असली तरी दिसत नाही ना, दिसत तसं नसतं! स्वतःच्या विश्वाभोवती फिरताना नाही म्हटलं तरी सगळी नाती टिकवताना मनाची होणारी घालमेल, त्यापाठीमागचा आटापिटा कळून येत नाही, आणि हल्ली तेवढे कळवून घ्यायचे इच्छा वजा प्रयत्न करून घ्यायचे पण नसतात.पण ती ओढ कायम असते. गैरसमजाला वाव आहे पण समजूतदारीत मात्र शंका आहे. मग आपली वाटणारी नाती एका विशिष्ट काळानंतर निभावताना एक पुसटशी रेषा आखली जाते, एकमेकांप्रती आपुलकी धूसर होऊन जाते, इतकं कमकुवत असतं का हे "नातं"... हा विचार करायला भाग पाडणारा प्रश्न आहे, पण आपण लाईटली घेतो...अगदीच !!


आपली जुनी पिढी हे सर्व सहज जपताना दिसत होती, अदबीने हे सगळं करू पाहत होती, आजही आहे, त्याप्रमाणे आपणही प्रयत्न करतो, जपतो पण आपली आपुलकी मात्र मोजली जाते, मोजमाप नसतानाही, (माप कसं आहे अजून माहित नाही). त्या पाठीमागचा प्रामाणिकपणा हल्ली मोजला जातो, हल्ली 'प्रामाणिकपणा' हा फक्त शब्द झालाय! त्याला कारण आहे हं! आपलेपणाने कुणाची चौकशी जरी केली तर समोरच्याला त्यात काहीतरी दुसराच हेतू जाणवतो!


"हे का बरं चौकशी करत असतील?"


"काय झालं आणि?"


एक ना अनेक तर्क... मनात येतं हे अस किती करायचं याच माप हवं होतं, खरंच जर ते असतं तर? सगळे खुश राहिले असते नाही का?


आयुष्य खूप लहान आहे, आपण आज आहे तर उद्या नाही. आपल्या माणसांच्यात दडलेला आपलेपणा आपणच पारखावा आणि तेवढ्याच आपुलकीने तो जवळून जपावा, जवळ ठेवावा. शेवटी देवाघरी जाताना सगळं इथेच तर ठेवायचं आहे, उरणार आहेत त्या फक्त "आठवणी" मग त्या गोड की कडू ते मात्र आपल्यावर आहे. म्हणूनच...

लव्ह द लाईफ यू लिव्ह आणि लिव्ह द लाईफ यू लव्ह... जगा आणि जगु द्या नाही म्हणणार पण हे मात्र नक्की म्हणेन... आपलेपणाने जपावे या रेशीमबंधाना, नात्यांच्या निरागसतेला, मनमोकळेपणाने साधावा संवाद... आयुष्य खूप सोपं, सुंदर आणि आनंदी होऊन जाईल...


Rate this content
Log in