STORYMIRROR

Vidya Shukla

Others

2  

Vidya Shukla

Others

विषय- नवरात्र

विषय- नवरात्र

2 mins
162

  नवरात्र सुरू झाले की सगळीकडे प्रसन्न आणि उत्साहाचे वातावरण तयार होते. प्रत्येक जण आपल्या देवीची पूजा करतात. आणि नवरात्र म्हणजे नवदुर्गा ,देवीचे नऊ रूपांची आराधना करतात .आमच्या घराण्याची कुलस्वामिनी कुलदैवत जोगेश्वरी देवी आहे. जोगेश्वरी देवीचे स्थान म्हणजे ती वसलेली आहे, धुळे जिल्ह्यात थाळनेर गावात ,गाव लहान गरीब शेतकऱ्यांचे आहे. थाळनेर हे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आजोळ आहे. जोगेश्वरी देवीची कहाणी किंवा अख्यायिका पूर्वजांनी सांगितलेली. ही देवी पूर्णपणे मूळ रूपातच आहे, म्हणजे तिची मूर्ती नाहीये तर तांदळाच आहे फार पूर्वी म्हणजे पेशवेकाळात एक संस्थानिक राजा होता. त्याने या जोगेश्वरी देवीची स्थापना केली. तेव्हा त्याने मंदिर बांधायला घेतले आणि सभामंडप बांधला पण देवी त्याच्या स्वप्नात गेली आणि तिने सांगितले की माझे मंदिर बांधू नको कारण मी जिथे स्थापन झाले, तिथे माझे फक्त गरीब शेतकरी आहेत, माझे स्थान शेतात आहे, त्यांना राहायला छप्पर नाही म्हणून मला पण नको . मी त्यांच्या सारखी साधीच राहील. नंतर सभामंडप पडून गेला. तिथे फक्त एक चौथरा आहे आणि त्यावर एक कडू लिंबाचे झाड आहे. ते सावलीसाठी लावलेले आहे. अगदी छोटेसे मंदिर आहे म्हणजे फक्त देवीच आहे . तिथे आत कोणालाही बसता येत नाही. आजही तसेच आहे कोणी बांधायचा प्रयत्न केला तर मोठे मंदीर तयार होत नाही. विशेष म्हणजे तिथे पूजा सांगायला कोणी पुजारी नाही. प्रत्येक जण येऊन आपापली पूजा करतात. नैवेद्य दाखवतात. पूर्वी शेतकरी वर्गाकडून फक्त गुळ ठेवला जाई. साधेपणाने नटलेली देवी आहे . तिथे चौथऱ्यावर बसायला जागा आहे. बाहेर बसून पूजा करू शकतो. आता आम्ही जाताना पूर्ण प्रसाद स्वयंपाक पुरणावरणाचा बरोबर नेतो .पूजेचे सर्व सामान न्यावे लागते. देवीच्या चौथऱ्या जवळ जायला पाऊलवाट आहे. तिथे दाट झाडी आहे आणि काट्याकुट्यातून जायला रस्ता आहे . मंदीर छोट्या टेकडीवर वसलेले आहे .मंदिराच्या मागे पाण्याचा छोटा ओहोळ आहे . त्या ठिकाणी राहणारी एक बाई आहे.ती रोज देवीच्या मंदिरात रात्री दिवा लावते, देवीची सेवा करते ,मंदिर व बाहेर झाडून स्वच्छ करते. मोबदल्यात तिची काही अपेक्षा नसते. आम्ही दरवर्षी जातो. तेव्हा तिची ओटी भरून तिला साडी-चोळी दक्षिणा व प्रसाद देतो. तिला नमस्कार करतो ती भरभरून आशीर्वाद देते तिच्या रूपात देवीच असते . त्या भागात जास्त मनुष्यवस्ती नाही . फक्त दोन शेत आहेत . घरात लग्नकार्य , शुभ कार्य झाले की सर्वजण देवीच्या दर्शनाला जातो. तिच्या कृपेचा वरदहस्त सदैव आमच्या घराण्यावर आहे. त्यामुळे आमचे कुटुंब अत्यंत सुखी आहे . इथलं वैशिष्ट्य म्हणजे सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे.


Rate this content
Log in