स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्ततृत्ववान स्त्री - तानुबाई बिर्जे (पहिल्या महिला संपादिका)
स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्ततृत्ववान स्त्री - तानुबाई बिर्जे (पहिल्या महिला संपादिका)
वृत्तपत्र हे समाजात विचारांची देवाण-घेवाण करत बदल घडविण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. पूर्वीच्या काळी गावांमध्ये वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्राचे वाचन हे समूहाने व्हायचे, वृत्तपत्र वाटप करणारा व्यक्ती सायकलने गावाच्या वेशी पासूनच ओरडायचा "आज की ताजा खबर, आज की ताजा खबर" असे ऐकू येताच गाव खेड्यातील ज्येष्ठ मंडळी समूहाने मंदिराच्या पायथ्याशी गोळा होऊन वृत्तपत्रामधील बातमीचा चहासोबत आस्वाद घेत तर काही बातम्यांची देवाण-घेवाणही होत होती.
विशेष म्हणजे जेव्हा भारत इंग्रजांचा गुलाम होता तेव्हा वृत्तपत्रात छापलेल्या बातम्या वाचून अनेक लोक इंग्रजांविरुद्ध एकत्रित झाले होते. अनेक महान भारतीय नेत्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपले विचार जनतेपर्यंत पोचविले. वृत्तपत्र वाचनाने एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते. वर्तमानपत्र हे देशासाठी व समाजासाठी महत्वाचे योगदान बजावतो.
आधीच्या काळात वर्तमानपत्राला खूप जास्त मागणी होती. परंतु आजच्या आधुनिक इंटरनेटच्या युगात सर्व लोक इंटरनेटवरून माहिती प्राप्त करतात. आज आपल्याला पत्रकारीता, संपादन या क्षेत्रात अनेक महिला काम करताना दिसतात, पण ही सुरवात "तानुबाई बिर्जे" या महिलेने केली. ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं, अश्या काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, आणि ती चोखपणे बजावली.
इसवीसन अठराशेचा काळ स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नती चा काळ आहे. "जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी" स्त्रियांना शिक्षण दिल्यावाचून पर्याय नाही असे महात्मा फुले यांनी जाणले आणि ३ ऑगस्ट १८४८ रोजी पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.
"तानुबाई बिर्जे" या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शेजारीच राहायच्या. त्यामुळे त्यांच्या सत्यशोधकीय विचारांचा पगडा तानुबाई बिर्जे यांच्यावर अगदी लहानपणापासूनच पडलेला होता. तानुबाई बिर्जे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या होत. जन्माने पुणेकर असलेल्या तानुबाईंना लहानपणापासूनच आपले शेजारी असलेल्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अगदी जवळून सहवास मिळाला. आपले शालेय शिक्षणही त्यांनी महात्मा फुले यांच्या शाळेतूनच पूर्ण केले. तानुबाई यांचा वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजेच १८९३ साली वासुदेव बिर्जे यांच्याशी विवाह झाला. कृष्णाजी भालेकर यांनी काढलेलं सत्यशोधक समाजाच दीनबंधू हे बंद पडलेलं वृत्तपत्र "श्री बिर्जे" यांनी सुरू करून ती चालवायची जबाबदारी घेतली. परंतु अवघ्या नऊ वर्षातच त्यांचे दुर्दैवाने निधन झालं. आता हे वृत्तपत्र परत बंद पडते की काय असंच सगळ्यांना वाटलं आणि संपादकपदाची
सर्व सूत्रे "तानुबाईंनी" आपल्या हाती घेतली. आणि त्या दिवशी त्या बहुजन समाजातल्याच किंवा महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर भारतातल्या पहिल्या महिला संपादक झाल्या.
त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नव्हता पण शिक्षण होते. बत्तीस वर्षांच्या तानुबाईंनी संपादकाची ही भूमिका जबाबदार पणे पार पाडली. हे करताना त्यांना अनेक आर्थिक अडचणी आल्या वृत्तपत्र बंद पडू द्यायचे नाही म्हणून त्यांनी स्वतःचे दागिनेही विकले!
१९०६ - १९१२ अशी एकूण सहा वर्ष वृत्तपत्राचा संपादन केलं समाकालीन वृत्तपत्रांपेक्षा वेगळेपण जपत समाजकारण राजकारणाबरोबरच तानुबाईंनी कृषी, संशोधन, कला यासारख्या अनेकविध विषयांना आपल्या वृत्तपत्रात स्थान दिलं. वृत्तपत्रातल्या इतर मजकुराबरोबरच संपादकीय लेख हे वाचकांसाठी मुख्य आकर्षण असे. आपल्या लेखाची सुरुवात त्या नेहमी तुकारामांच्या अभंगाने करत असत. हातात असलेल्या वृत्तपत्रासारख्या शक्तिशाली शस्त्राचा त्यांनी समाज प्रबोधनासाठी पुरेपूर वापर केला. दुर्दैवाने त्यांची ही कारकीर्द अवघी सहा वर्षांचीच ठरली. १९१३ साली त्यांचा मृत्यू झाला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बहुजन समाजाबरोबरच, महाराष्ट्रातल्या एकूणच समाज प्रबोधनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पती निधनानंतर दीनबंधू हे वृत्तपत्र बंद पडू न देता ते स्वतः अत्यंत उत्तम पद्धतीने चालवून तानुबाई बिर्जे यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांचं कर्तृत्व सिद्ध केलं!!
नाविन्यपूर्ण विषय हाताळून
समाजातील विषमतेवर केला प्रहार!
होता महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव,
मांडला बहुजन शिक्षणाचा विचार!!
अशा या "तानुबाई बिर्जे "यांना त्रिवार वंदन...!!!