Vasudev Patil

Others

2  

Vasudev Patil

Others

निवदाचा नवस४

निवदाचा नवस४

9 mins
569


  भाग. ::-- चौथा


  नरक चतुर्दशीला दिवाळी पर्वाचे गावात दिवे चढू लागले. मातलेल्या अंधारावर मिणमिणत्या पणत्या विजय मिळवण्याचा प्रयत्न करू लागल्या.मिनलने दिवा चढवलाच नाही.शितलताई, संदेशराव, किरण यांच्या जाण्यानं सुनाजीरावांचं घर प्रकाशाला मुकलंच होतं.आज संध्याकाळी मात्र दिला आतून वाटलं की निदान एक तरी पणती चढवावी. भेदरलेल्या रघूला दुपारी बरं वाटत असतांना तो ग्रामपंचायत मध्ये परतू पाहत असतांना आबांनी त्याला जाऊच दिलं नाही. मिनल- मिनाला पाहतांना त्याला कसंकसंच होत होतं. पांढरी साडी त्याला तिचं गेलेलं स्वामित्व आठवून देत होतं. रघूला आपल्या घरीच का आणून सोडावं? रघूनं मिनलला पाहून तिच्या मिना या माहेरातल्या नावानं हाक मारली म्हणजे यांची पुर्वीची ओळख कशी? शिवाय रघूला रात्रीबाबत कुठेच वाच्यता न करण्याचं सांगितलं तरी दिवसभरात भुनाजीबाबत काहीच बोंब का उठली नाही.असे अनेक प्रश्न आबांना सतावत होते.तर रघूला बाल्ट्या, पारी, शितल, संदेश किरण आठवू लागले व त्यांनी भुनाजी काशीला कसं शिजवलं ? ते जसंच्या तसं नजरेसमोर फिरे नी मग शितलनंच आपल्याला त्यांच्या तावडीतून का काढलं? तिच्या लग्नात ओझरती भेट मिनानं घडवली होती व तिनं हातात हात घेत ' मी बाबांना समजवीन व करते काहीतरी लग्नानंतर असं मिनाला सांगितलं होतं. अशा विचारांचा गुंता वाढवत साऱ्यांनी जेवण घेतलं .

  मिनलनं सारी झाकझूक करत राजला घेत झोपायला वरती गेली.आबांनी आपल्याजवळच  रघूचा बिछाना घालावयास लावला.त्यांना आजही काही तरी विपरीत घडेल अशी भिती होतीच. तापीकडून येणारी बोचरी थंडी अंधारात पहूडल्या गावाला आपल्या कवेत घेऊ पाहत होती.तापीचं पात्र पूर्ण भरलेलं.मिनल या विचारानं सैरभैर झाली.पूर्ण भरलेल्या पात्रातही काठ कोरडा रहावा तसंच आपलं झालंय.

 बोचरी थंडी ,दिव्याचा प्रकाश या गोष्टीपेक्षा मातलेला अंधारच आपल्या जिवनात दाटून उरलाय अशा विचारातच ती तळमळू लागली. तिच्या मनात अंधारागतच शितलच्या लग्नापासूनचं सारं सारं  दाटू लागलं.

.

.

   शितल लग्न करून आली व काही महिन्यातच सरपंच झाली.त्याच वेळी छोट्या राजच्या येण्याची ही चाहूल लागताच सारं घर आनंदानं न्हाऊन निघालं. आबांच्या घरी काळजी घेणारी बाईच नसल्यानं आबांनी शितलला लगेच माहेरी ठेवलं. मग माहेरी संदेशराव, किरण, आबा याच्या वारंवार फेऱ्या होऊ लागल्या.मिना तर रघूच्या जाण्यानं उदास ,भकास वावरत असे. तरी पण शितल साठी मात्र ती सारं विसरत धावाधाव करी.शितललाही रघूबाबत माहित असल्यानं वडिलांनी कितीही कटकट केली तरी शितल मिनास काहीच बोलेना.आई वडिलांनी तर मिनाला एकटंच पाडलं होतं. ते मिनानं रघूला विसरत लग्नास तयार व्हावं म्हणून मिनाला समजावण्याबाबत शितलला सांगू लागले.

 किरण मात्र काहीही कारण नसतांना वहिणीचं निमीत्त करत वारंवार येऊ लागला.त्याच्या मनात भावाच्या लग्नापासूनच भावाची साली मिना भरली होती. त्यानं तसं संदेशरावांना सांगितलं. संदेशरावास वाटलं मिना, सासरे तयार होतीलच. त्यांनी एक वेळा आधी शितलकडे विषय काढला.पण मिनाचं मन माहित असल्यानं शितलनं तो विषय दुसरा विषय काढत टाळला.किरण तर मिनामागेच लागला.पाणी डोक्यावर जातंय हे पाहताच मिनानं त्याला स्पष्ट नकार देत तडकावलं. शितलला मुलगा झाला. त्याच खूशीत आबांनी व्याहीजवळ मिनासाठी शब्द टाकला.बाबांना तर आंधळा मागतो एक नी..... प्रमाणंच झालं. दोन्ही पोरी एकाच घरात जातील ते ही आबांसारख्या श्रीमंत असामीकडं मग काय हवंय. त्यांनी होकार भरला. हे किरणला कळताच किरण मोकाट सुटला. त्यांनं सासऱ्याचा होकार मिळताच मिनेला गृहीत धरलं. पुन्हा तो मिनेला भरीस पाडू लागला. मिनानं पुन्हा त्यास उडवून लावलं पण आता तिला हे असह्य होऊ लागलं.एकतर रघूचा तपास नाही त्यात किरण ,वडिल यांचा लग्नाचा बेत,ती बिथरली. शितल व बाळास संदेशराव घ्यायला आले त्यावेळेस एकांत पाहत मिनानं शितल व मेव्हण्यास हात जोडत रडतच " प्लिज किरणरावांना समजवा, मला जगू द्या, अन्यथा आजच मी......" टाहो फोडला. संदेशरावांनी तिला उठवत जवळ बसवलं .मिना नुसती रडत होती पण काहीच बोलेना.मग शितलनं रघूबाबत सारं काही सांगत मिना रघूशिवाय दुसरं .....शक्यच नाही सांगितलं. संदेशरावांनाही मिना आपल्याच घरी यावी अशी तिव्र इच्छा होती पण मिनाचा कल पाहून त्यांनी किरणला दुसरी मुलगी पाहतो असं सांगत मिनास आश्वस्त केलं.

  शितल राजसोबत वलवाडीत येताच साऱ्या गावाला आनंद झाला.तो पावेतो सरपंच निवडीच्या नाट्याला पडदा पडला होता.बाल्ट्या व पारी 'परागंदाच' झाले होते. भुनाजीनंही तात्पुरतं शांत राहणंच पसंत केलं होतं.

  पण आबांच्या घरी आताच खरं महाभारत सुरू झालं.मिनाबाबत संदेशरावांनी आबांना रघूबाबत काहीच न सांगता ' मिनास किरण पसंत नसल्यानं किरणला नकार दिलाय' असं सांगत किरणसाठी आपण दुसरी मुलगी पाहूयात सुचवलं. पण आपण त्यांच्यापेक्षा श्रीमंत, शिवाय सुस्वरूप शिक्षीत असुनही मिनेस एवढा कोणता ताठा आलाय की तिनं आपणास नाकारावं! यानं तो पेटला.वहिणी पहील्यापासुनच याबाबत शांत आहे म्हणजे वहिणी व दादांचीही इच्छा नसावी म्हणून किरणरावात ठिणगी पेटली.किरणराव स्वैर वागायला लागला.त्याची संगत बदलू लागली.सवयी बदलू लागल्या.सच्छील सदाचारी आबांच्या घरात या सवयी नसल्यानं ते लगेच लोकांच्या नजरेत भरलं. भुनाजीला तर लगेच समजलं. सरपंच पद गेल्यानं शेपटीवर पाय पडलाच होता.म्हणून तो फणा काढून तयारच होता. त्यानं किरणरावास जोजारण्यास सुरूवात केली. सुरुवातीस कसं ही झालं तरी किरणराव आबाचंच रक्त ,त्यानं भुनाजीस हुडकावून लावलं.मारक्या गोऱ्ह्यानं पाठीवर‌ हातच ठेवू देऊ नये त्याप्रमाणं किरणरावानं भुनाजीस कोलवलं. मग भुनाजीनं किरणला नाथ तर घालायचीच व आपल्या गव्हाणीस बांधायचाच.म्हणून त्यानं हातात कोवळं लूस घ्यायचं ठरवलं.

   तापी पल्याड भुनाजीची सासरवाडी होती.त्याची साली ही लग्नाची होती.त्यानं सालीस बोलवून घेतलं.

   भुनाजीच्या सालीचं स्थळ गावातीलच प्रतिष्ठीत मार्फत आबांकडे न जाता परस्पर किरणरावाकडं गेलं. अचानक दोन दिवस आधी तिची व किरणची रस्त्यात नजरानजर झाली असतांना किरणनं सोबत्याला ' नविन असामी कोण?' म्हणून विचारणा केली असतांना विरोधी पक्षनेत्याची साली म्हणून त्यास चिमटा ही काढला होता.नी आता तेच स्थळ आल्यावर मग ' नाही सत्तारूढ पक्ष्याची साली तर विरोधीचीच सही' म्हणत किरणनं मनावर घेतलं.

  भुनाजी व किरणच्या भेटी होऊ लागल्या. ही भणक संदेशरावास लागली.आधीच किरणरावाचं पिणं, मौजमस्ती, कामावरील दुर्लक्ष यानं संदेशराव दुखावला होताच.पण भाऊ आहे आपला.कुठं जाईल व वय म्हणून त्यानं दुर्लक्ष केलं होतं पण आता हे दुर्लक्ष करण्यासारखं नव्हतं.

" आबा ,किरणला स्थळ आलंय भुनाजीच्या सालीचं"

" भुनाजीची माझी पायरी चढायची लायकी तरी आहे का?" आबा संतापत बोलले.

" म्हणूनच त्यानं ते स्थळ परस्पर किरणकडं नेलं" 

" संदेश तोंडाला येईल ते बरळू नकोस! परस्पर मुलाकडं कसं जातील?"

" पहा कळेलच आपणास!" म्हणत संदेशराव अतिव दु:खानं झोपायला गेले. शितलला सारं कळत असुनही मिनाचं मन मारणं तिला पटेना.

 किरण मिनाला डिवचण्यासाठी व खानदानी रक्ताची उसळी म्हणून भुनाजीच्या सालीला पाहून भुनाजीस गारद करण्यासाठी सालीला पाहण्यास भुनाजीच्या घरी गेला.भुनाजीची सालीही मिनापेक्षा वरचढ.पण त्याला हा संबंध करून घराण्याची इज्जत घालवण्याइतपत तो वाहवला नव्हता. त्यानं भुनाजीस आपली पसंती असल्याचं सांगत परत फिरला.

  आबाजीस हे कळल्यावर आबानं संदेश व शितलला काहीही करून मिनाला राजी करण्यास विनवलं. संदेशराव शितलला घेऊन सासरी निघाला.इकडं भुनाजीनं गावात एकादशीस तुळसीचं लग्न होतात सालीच्या किरणसोबत लग्नाची वावडी उठवली. 

   शितलला मिनास लग्नाचं सांगतांना मनात पिळ पडू लागला.कारण रघूचा तपास नसल्यानं मिना पार ढासळत चालली होती.संदेशनं सासऱ्यास किरणबाबत सांगताच सासरा मिनास मारायलाच चालून गेला.पण शितलनं मध्ये पडत मिनाच्या इच्छेला प्राधान्य दिलं.पण या ही वेळेस साफ नाकारलं.शेवटी शितल व संदेशनं " तुझी इच्छा नाही तर नको करू पण काही दिवस सोबत वलवाडीत चल" सांगत तिला वडवाडीस आणलं.घरीही वडिलांचा तगादा नको व वलवाडीस राहून किरणबाबत मिनाचं मन वळलं तर वळलं म्हणून शितलनं तिला सोबत आणलं.मिनास ववलवाडीसही किरणचा ससेमिरा राहीलच पण शितलचाच तिला आता आधार वाटे म्हणून ती तयार झाली.

  रात्री नऊ वाजेला सारे वलवाडीत परतले. संदेश आबा झोपले .राजला खेळवत मिना शितल ही झोपणार तोच अकराच्या सुमारास दरवाज्यावर थाप पडली.शितलनं दरवाजा उघडताच एक नवखा माणूस उभा.

 " कोण? काय हवंय?"

" मी सुनसवाडीहून आलोय.हिंतचिंतक समजा.भुनाजीराव आमचं मेव्हणं बेरकी माणूस.किरणरावाला सुनसवाडीत आणलंय व आजच त्याचं काही तरी बरंवाईट करण्याचा प्लॅन आहे.संदेशरावाना सांगून त्यांना लवकर परत बोलवा.हात जोडतो.आबाजीराव देवमाणूस म्हणून जिवावर उदार होऊन तापी ओलांडून आलोय सांगायला."

" थांबा मी त्यांना उठवते....अहो!" घाबरत शितलनं आरोळी ठोकली.

पण तो पावेतो तो माणूस निघूनही गेला.

संदेशराव, आबांनी आजुबाजुला पाहिलं पण कोणीच नाही भेटलं.

" संदेश दुपारी किरण बरळत होता रे की ' त्या भुनाजीला तुमच्या पायावर नाक घासायला आणतोच! त्यानं माझ्या दादा ,वहिणीला निवडणूकीत त्रास दिलाय.पण सालीसाठी त्याला आणतोच' असं नशेत बोलत होता.

" आबा आपला किरण किती ही वाहिला तरी भुनाजीला मिळणार नाही हे मी जाणतोय पण तो भुनाजी नितीभ्रष्ट्र आहे तो किरणला धोखा करेलच." संदेशनं बुलेट काढली.

तोच शितलनं राजला मिनाकडं देत 

" मिना आम्ही आलोच राजवर लक्ष ठेव" म्हणत संदेशपाठोपाठ निघाली.

"अगं रात्रीचं तू कुठं येतेय? त्याला रस्त्यातच गाठतो व परत आणतो" संदेशराव शितलला समजावत परतवू लागले. पण शितलनं ऐकलंच नाही. ते गेले ते गेलेच. त्यानंतर तापी पात्रातून बुलेट खालून शितल व संदेशरावाचं प्रेतच तिसऱ्या दिवशी काढलं. 

  मिनल घामाघूम होत उठली. घड्याळात एकचा टोल झाला. रघू व आबा शांत झोपले होते. तोच बाहेर काठाकडनं कुत्र्यांचा जोरजोरात विव्हळण्याचा आवाज येऊ लागला.अमावास्येला प्रारंभ झालेला.मिनलच्या घशाला कोरड पडलेली. ती पाण्यासाठी उठली.तोच तिचं लक्ष खाली अंगणाकडं गेलं.अंगणातल्या पायरीवर दिवा जळत होता.आपण तर नाही चढवला दिवा मग कुणी लावला? ती खाली आली कवाड उघडवलं.तोच सर्रकन अंगाजवळून काही तरी गेलं.मिनानं मागं पाहिलं तर कवाडातून कुणी तरी आत आल्यागत तिला जाणवलं.क्षणात मिनल दिव्याकडं न जाता कवाडजवळच आपोआप बसली.तिचे तेथेच डोळे जडावले.

 " मिने! ऐक नं! झोपू नको! आम्ही नाव उलटून नाही गं गेलो" 

.

.

मिना कवाडातच निद्रावली नी तिला सारं दिसू लागलं.

.

.

  संदेश राव शितल सोबत निघाले.भवानी मातेजवळच तापीकाठावर पैलाड जाण्यासाठी सोमा नावाड्याच्या दोन नावा चालायच्या.एक ऐल तिरावर तर दुसरी पैलतिरावर.कारण खलवाडी वलवाडीतील बऱ्याच जणाची शेती पैलतिरावर असल्यानं पंधरा सोळा किमीच्या फेरावरील पुलावरून जाण्या पेक्षा शेतकरी नावेवरून मजुर, खत वा इतर वस्तू नेत. रात्री बाराचा सुमार असेल.सोमा भवानी मंदीरावर झोपला असावा.संदेशनं त्याला न उठवता.खुटीतील दोर तंग बांधत नाव काठाकडं ओढली.जवळच पडलेल्या पाट्या लावत त्यानं बुलेट नावावर चढवली. शितल चढली.दोर सोडत त्यानं नाव वल्हवत पैलतिराकडं नेऊ लागला. एक सारखा नाव वल्हवतच होता.पण नेहमी लवकर येणारा पैलतीर काही येईना.

  पैलतिरावरून त्याला भुनाजीच्या सासरवाडीला किरण पोहोचण्या आधीच गाठून त्याला परत फिरवायचं होतं वा पोहोचला तरी त्याला भुनाजीच्या तावडीतून सोडवायचं होतं.

तो नाव वल्हवत पैलतीर जवळ करू लागला.

  किरणराव सुनसगावात केव्हाचाच पोहोचला होता.भुनाजीनं किरण सालीच्या पूर्ण कह्यात आलाय हे पाहून एक अट घातली.

 " किरण मी तुला साली देतोय पण त्या आधी तू तीन मेंबर फोडून अविश्वास आणत आमच्या मंडळीस सरपंच करावं म्हणजे तुझं लग्न मग फिक्स!"

किरण काय ते समजला.

" भुनाजी चालेल.तीन काय सातही सदस्य फोडतो पण त्या आधी तू आमच्या हवेलीवर येऊन आबांजवळ लग्नाची बोलणी करायला ये"

" किरण शुद्धीवर आहे का? मी हवेलीवर पाय ठेवणार नाही.उलट लग्नानंतर तुलाही हवेलीवर राहू देणार नाही"

" भुण्या तोंड सांभाळ! नाही तर फोडून तुझ्यात हातात देईन ते! दारू प्यायलो असली तरी मी अजुन इज्जतीची शुद्ध नाही हरपलोय! दोन भावात फूट पाडण्याचा प्रयत्न केलास तर सासुरवाडीतच जिता गाडीन." किरणनं धमकी दिली व निघाला.भुनाजीनं सासरवाडीत खेळ नको . याला रस्त्यातच गाठू व ठोकू, असं ठरवत त्याला निघू दिलं.व मागोमाग निघाला.पण किरणनं त्यास गुंगारा देत नदीचा मार्ग दाखवून पुलाकडंनं निघून घरी आला.

पण तोपावेतो नदीत वेगळच नाट्य घडत होतं.

   संदेश नाव वल्हवत होता .नाव पैलतीर जवळ करत होती पण पैलकाठ काही येईना.नाव नदीपात्रातच फिरू लागली.नाव वल्हवून वल्हवून संदेश व नंतर शितलच्याही तोंडास फेस आला. तोच नावेत पात्रातून पोहत पोहत दोन जण नावेत बसू देण्यासाठी विनवू लागले.नावेवर चढताच त्यांच्या हातात बादल्या आल्या. साऱ्या पात्रात वास दरवळला. तोच मटणाचा वास.

" संदेशराव मागच्या वर्षांपासून आम्ही निवदाचा नवस फेडण्या साठी फिरतोय.बसा ना ! पाच जणांना जेवु घातल्या शिवाय आमचा नवस फेडला जाणार नाही!"

संदेशरावांना तारी , बाल्ट्या आठवला. तोच ते उभे राहून बादलीतील गरम भाजी संदेशरावावर टाकू लागले.शितल आडवी झाली.तारीनं तिच्या ही अंगावर बादली टाकली.संदेश व शितल अंग भाजल्यानं नावेतच आकांत करू लागले नी नाव हिसके खाऊ लागली. तोल गेला व दोघेही एकमेकांना धरत पाण्यात पडले.पाण्यात अंगाची लाही कमी झाली पण तोच बाल्ट्यानं नावेतली बुलेट त्याच्या अंगावर दाबत त्यांना तळाशी नेलं.बराच वेळ हवेचे बुडबुडे वर निघत होते.शेवटी फपs s s s फुस्स आवाज निघाला व शांतता पसरली.नाव पाण्यात हिचकोले खात तेवढ्याच जागेत गोलगोल तरंगू लागली.

   घरी पोहोचलेल्या किरणला कळताच त्यानं तेवढ्या पहाटे पाच सहा लोकांना उठवत नदी काठावर नेलं.नाव काठावर नाही. सोमा मंदिरावर. त्यानं ओळखलं.सकाळी पट्टिचे पोहोणारे पात्रात उतरले. सारं पात्र धुंडाळलं जाऊ लागलं. रात्र झाली तरी शोध चालूच.दुसऱ्या दिवशी सकाळी बुलेट सापडली. व नंतर नदीथळी किरण मिना आबाचा आक्रोश घुमला......

.

.आबा उठले. त्यांना मिनल दिसेना ते खाली आले कवाड उघडं व मिनल तिथंच झोपलेली.त्यांनी‌ मिनलला उठवलं.

" मिनल इथं का झोपली नी हा दिवा कसा?"

"आबा ताईनं मांडीवर झोपवलं नी इथंच गाढ झोप आली" मिनल उठत म्हणाली.

आबांनी पोरीला उठवत घरात नेलं. 

" पोरी ! शितल दोन दिवस आली म्हणजे तिला तुला काही तरी सांगायचंय नक्कीच!" आबांनी तिला म्हटलं.

मिनलच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती पुन्हा विचार चक्रात हरवली. व आबा ही.

 .

.

 शितल गेल्यावर मिनल राजला घेऊन माहेरी आली.पण जातांना शितलचं वाक्य तिला आठवू लागलं.'राजवर लक्ष ठेव!'.

   नंतर तर आबाच्या घरी दिवा लावायला ही लक्ष्मी उरली नाही. रघूचा तपास नाही. मिना द्विधा अवस्थेत सापडली.

" रघू मी थांबेन रे! हयातभरही!" आणि नंतर "राजवर लक्ष ठेव!" सरतेशेवटी राजसाठी व मेलेल्या बहिणीच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून व आबांचं घर तोलून ठेवण्यासाठी मिना मिनल होत किरणशी विवाहबद्ध झाली.राजची मावशी राजची आई झाली. पण पुन्हा...

पण पुन्हा...

बाल्ट्या व तारीनं किरणला गाठलं . त्यांचा निवदाचा नवस फेडणारा तिसरा.

  किरण जळगाव वरून कामतवाडीला उतरला. तेथेच रेल्वे स्टेशनात लावलेली गाडी काढत गावात येत असतानांच भवानी मातेच्या नाल्यातच गाठला. गाडीचा अपघात...गाडीचा स्फोट....किरण भाजला....की.....भाजला..? पण मिनल विधवा झाली....

.

.

.

 आबांनी व्याहीस बोलवून घेतलं. सल्ला दिला घेतला व लवकरच मिना व रघूचं ठरवलं.


समाप्त.


(कथा पूर्णत: काल्पनिक)



Rate this content
Log in