Pratik Mhatre

Others

3  

Pratik Mhatre

Others

मानसिकता

मानसिकता

3 mins
550


“अरे कल्पेश..लग्न ठरलं आणि सांगितलं सुद्धा नाहीस. आम्ही पार्टी मागू म्हणून घाबरलास कि काय ???”

“नाही रे, तसं काही नाही..”

“मग? काय झालंय? आणि तुझा चेहरा का असा पडलेला?”

प्रशांतच्या या प्रश्नाने कल्पेश विचारात हरवून गेला.

एक महिण्यापूर्वी कल्पेश आणि स्पृहाचं लग्न ठरलं होतं. खरं तर ते कल्पेशच्या घरच्यांनीच ठरवलं होतं. स्पृहा कल्पेश च्या आईच्या मैत्रिणीची मुलगी. दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते.त्यामुळे दोघांनाही लग्नाला लगेच होकार दिला. याच आनंदात त्यांच्या घरच्यांनी त्यांचा साखरपुडा उरकून घेतला. थोडे दिवस सुरळीत गेले आणि आणि मग त्या दोघांच्या आयुष्याला जणू ग्रहणचं लागलं.

कल्पेश आणि स्पृहा सिनेमा बघायला गेले होते.कल्पेशला सुट्टी मिळत नव्हती म्हणून त्याने रात्री उशिराच्या शो ची तिकीट काढली.आणि रात्री घरी येत असताना अचानक त्याची बाईक पंक्चर झाली.एवढ्या रात्री रिक्षा मिळणंही कठीण होतं. मग त्या दोघांनी चालतच घरी जायचं ठरवलं.जवळपास अर्धा तास चालले असतील आणि ते शहराच्या बाहेर पोचले. पुढचा गावपर्यंतचा रस्ता हा निर्जनचं होता.कोणी राहत नसल्याने त्या रस्त्यावर दारूडे,जुगारी यांचं राज्य असायचं.दोघेही चालत असताना स्पृहाला काही लोकं दारू पिताना आणि जुगार खेळताना दिसले. त्यातल्या एकाची आणि स्पृहाच्या एक क्षण नजरानजर झाली. स्पृहाने चटकन आपली नजर दुसरीकडे फिरवली आणि घाबरून तिने कल्पेशचा हात अजून घट्ट पकडला.कल्पेशने तिला धीर दिला.कल्पेशच्या त्या बोलण्याने तिला जरा हायसं वाटलं. तिथून थोडे पुढे गेले असतील तोच त्यांना त्यांच्या मागून पावलांचा आवाज ऐकू आला.कोण आहे ते बघण्यासाठी कल्पेश वळणार एवढ्यातच त्याच्या डोक्यात कसलातरी जबरदस्त आघात झाला आणि तो खाली कोसळला.स्पृहाच्या तोंडून एक आर्त किंकाळी बाहेर पडली.एक मन तिला सांगत होतं कि पळून जा पण दुसरं मन कल्पेशला त्या अवस्थेत सोडून जायला तयार नव्हतं. आजूबाजूला असलेल्या माणसांच्या तोंडून मद्याचा उग्र दर्प येत होता.आता काय होणार हे लक्षात येऊन तिने गयावया करायला सुरवात केली.पण वासनेच्या भावनेने आंधळ्या झालेल्या त्या नराधमांना तिच्या त्या करुण विनावणीचं काहीच वाटत नव्हतं. तिच्या त्या आर्त किंकाळ्या त्याच्या कानांना अजिबात भिडत नव्हत्या.एखाद्या जखमी हरणावर तरसांचा कळप तुटून पडावा तसे ते त्या निरागस मुलीवर तुटून पडले.

तिच्या त्या विनवण्या,किंकाळ्या,स्वतःला वाचवण्यासाठीची तिची चाललेली केविलवाणी धडपड याने त्या राक्षसांना काहीच फरक पडत नव्हता.कल्पेश अर्धवट शुद्धीत काय चाललंय ते फक्त बघत होता पण त्याच्या अंगात बोलण्याचे किंवा उठण्याचेही त्राण शिल्लक नव्हते.आपल्या होणाऱ्या बायकोचे चाललेले हाल तो फक्त लाचार होऊन बघत होता.

प्रशांतच्या बोलण्याने तो पुन्हा भानावर आला आणि नजर लपवून म्हणाला ” आमचं लग्न मोडलं.”

“काय!!!!”प्रशांतला जणू धक्काच बसला.

“हो…”

“का? काय झाल?”

कल्पेशने घडला प्रकार त्याला सांगितला आणि प्रशांतच्या च्या आश्चर्याचा जणू पारावरच उरला नाही.

“लग्न कोणी मोडलं? तू कि स्पृहाने?

“माझ्या घरच्यांनी”

“आणि तू त्यांना तसं करू दिलंस? जे काही झालं त्यात स्पृहाची काय चूक होती?”

“हे मलाही माहित आहे रे कि तिची काही चूक नव्हती.पण घरचे म्हणतात कि अशी मुलगी सून म्हणून कशी आणणार घरी..लोक काय म्हणतील!!!”

“लोकांच जाऊ दे रे..लोक काय दहा तोंडांनी बोलणार.पण तू एक विचार कर कि जे काही झालं त्यात तुझी असमर्थता नाही आहे का? तू जर तुझ्या होणाऱ्या बायकोच रक्षण नाही करू शकत तर तुला लग्न करण्याचा काहीही अधिकार नाही आहे. समज जर लग्नानंतर तिच्यावर अशी वेळ आली असती तर तू तिला असंच सोडून दिलं असतास?? तू तिथे असूनसुध्दा त्यांच्या तावडीतून तिला वाचवू शकला नाहीस आणि मग घरच्यांच ऐकून तू लग्न मोडून मोकळा झालास…हा तुझा निर्णय नाही तर तू शोधलेली हि पळवाट आहे..सगळा दोष तिच्या नशिबाला देऊन तू मोकळा झालास. या बद्दल पहिले विचार कर आणि मगच परत लग्न करण्याचा विचार कर.”

कल्पेशच्या मनात विचारांच वादळ उठवून प्रशांत तिथून निघून गेला. त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा असं वाटू लागल. प्रशांतच्या बोलण्यामुळे आपण करत असलेल्या चुकीची त्याला जाणीव झाली.

कल्पेश जो निर्णय घेईल तो घेईल.

पण आज खरच आपल्याला प्रशांतसारखा विचार करण्याची गरज आहे. आपला समाज अजूनही प्रतिगामी विचारांमध्ये अडकला आहे त्याला बाहेर काढण्याची गरज आहे आणि त्या साठी आपल्यालाच प्रयत्न करणं गरजेचं आहे.

(वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आणि जर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)                                                               


Rate this content
Log in