चोकोबार
चोकोबार
सहावीची परीक्षा संपून नुकत्याच उन्हाळयाच्या सुट्टया लागल्या होत्या. आमच्या गावाच्या बाजूलाच सात कि.मी. अंतरावर चाकरवाडी हे छोटेसे गाव आहे. त्याठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत ज्ञानेश्वर माऊली यांचं समाधीस्थळ व महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी आमावस्येला जत्रा भरते. पंचक्रोशीतील तसेच इतर ठिकाणाहून भावीक दर्शनासाठी येतात. गाडीने जाण्यासाठी एक जणाला पाच रु. तिकीट होतं. अशाच एका अमावस्येला माझा मित्र चम्या आणी मी सकाळी लवकर उठून पहाटेच चाकरवाडीला चालत निघालो. कारण दोघांकडेही पाच-पाच रुपयेच होते. उन्हाच्याआधी चालत जायचं आणी येताना गाडीने यायचं असं आम्ही ठरवलं होतं. मधल्या रस्त्यानं अंतर थोडं कमी पडत होतं. चालत चालत आम्ही चाकरवाडीच्या शिवारात आलो होतो. मंदिराचा कळस लांबुनच दिसत होता. थोडं पुढे आल्यानंतर जत्रा पण दिसु लागली. नारळवाले, पेढयावाले, फुलांच्या हारावाले येणाऱ्या भक्तांना नारळ,पेढे,हार घ्या म्हणून ओरडत होते. काही जणांची इच्छा नसतानाही बळंबळंच हातात देत होते. चहाचे हॉटेल, शेवचिवडयाचे हॉटेल व खेळण्यांच्या दुकानांनी जत्रा फुलून गेली होती. गरमा गरम भजे बघून तोंडाला पाणी सुटत होतं. पण भजे खावे तर उन्हाचं चालत जावं लागेल या विचारात जीव मारुन पुढं निघालोत. मंदिराजवळ खुपच गर्दी दिसत होती. तेवढयात चम्या म्हणला, “ चल बाहेरुनच पाया पडुत. लईवेळ गर्दीत थांबावं लागण.”
मी म्हणलो, “नगं बाबा, आईनं सांगीतलंय पाया पडूनच ये म्हणून.”
आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. गर्दी असल्यामुळे मागून ढकला ढकली होत होती. दहाच मिनिटात आमच्या मागेही मोठी रांग लागली. आम्ही बारीक असल्यामुळे गर्दीत गुदमरल्यासारखं होऊ लागलो. आधीच बुटका, त्यात बाजूला सगळी गर्दी, मला तर बाहेरचे काहीच दिसेना. माझं सगळं अंग घामानं निथळलं. चम्या बाहेर तोंड काढायला बघायचा पण गर्दी काही बाहेर निघु देईना. आधीच उन्हाळयाचे दिवस रांगेतल्या माणसांना पण घाम आला होता. त्यांच्या घामाचा दुर्गंध येत होता. आता रांगेच्या बाहेर पडणंही मुश्किल झालं होतं. कसा तरी एक तासानं देवा पुढं आलो. डोके टेकवतो का नाही तोवर पुजाऱ्यानं पुढं ढकललं.
आता बाहेर आल्यावर जरा मोकळा श्वास घेता आला. चम्या म्हणाला, “भजे खायचे का रं?”
मी म्हणलं. “ हो, पण आपल्याला पुन्हा चलतच जावा लागण.”
तो म्हणला, “आरं तु कशाला काळजी करतो? हिकडं बघ.”
मी त्याच्या हाताकडं बघीतलं, त्याच्या हातात पाकीट होतं. “म्हणजे, त्यानं गर्दीमध्ये कोणाचं तरी पाकीट मारलं होतं.”
मी त्याला म्हणालो, “ आरं देवाच्या दारात कशाला चोरी केलीस?”
तो म्हणाला, “आरं लई भुक लागली व्हती रं.”
मला पण भुक लागलीच होती भज्याच्या मोहानं मी ही त्याला होकार दिला आणी म्हणालो, “बरं एवढी वेळेस जाऊ दी पण आता इथून पुढं आशी चोरी करायची नाहीस.”
त्यानं ही होकार दिला. आम्ही भज्याच्या हॉटेलमध्ये आलो. गरमा गरम भजे तळणं चालु होतं. भज्या बरं कांदा, तळलेली मिरची होती. त्या हॉटेलमधील सर्वच आयटम आम्ही घेतले. वडापाव, जिलेबी, भेळ खावून खावून पोट भरलं. आता हयाच्यावर जाणारच नाही असं कळल्यावर आम्ही खाणं बंद केले. चम्यानं हॉटेल वाल्याला पैसे दिले. आता चालत जाण्याची गरज नव्हती. आता भरपूर मौजमजा करुनच घरी जायचं असा बेत आम्ही आखला. थोडा वेळ जत्रेमध्ये फिरलो. तेवढयात रसवंती दिसली. चम्या म्हणाला, “चल आता रस पिऊत.” माझ्या पोटामध्ये जागा नव्हती पण आता फुकट भेटायल्यावर नाही तरी कसं म्हणावं? म्हणून मी त्याला होकार दिला. रसाचा एक ग्लास पिल्यावर मला ढेकर आला. चम्यानं मात्र दोन ग्लास पेले. तो माझ्यापेक्षा अंगानं मजबुत होता. त्याला खायला पण खुप लागायचं.
त्यानं, रसावाल्याला पैसे जरा गडबडीतच दिले. आणी मला म्हणाला, “ आरं ज्याचं पाकीट मारलं ना मी तो माणूस इथच हाय.”
मला तर धडकीच भरली. हातापायातलं आवसान गळल्यासारखंच झालं. तो माणूस मी बघीतला नव्हता. पण एखाद्या माणसानं आमच्याकडं बघीतलं की मला वाटायचे हा तोच माणूस आहे. तो माणूस अचानक येवून चम्यासकट मला ही मारेल याची भिती वाटु लागली.
मी चम्याला म्हणलं, “चल जाऊ गावाकडं.”
“आरं थांब खालच्या मंदिरात जेवायला जाऊ.”
“ माझं पोट भरलेय ब्वा, आता तुच जेव.”
“नको म्हणु नको देवाचा परसाद थोडा तरी घ्यावा लागतो.”
आम्ही खालच्या मंदिरात जेवायला गेलो. मला भुक नव्हती. मी मला वाढलेलंही चम्यालाच दिले. चम्याने तेही संपवून टाकले.
आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. चम्या म्हणाला, “ तु थांब हितं, मी आत्ता आलो.”
चम्या माझ्यापासून गेला. मी त्याच्याकडचं बघत होतो. पठ्ठयानं त्याची तुटकी चप्पल ठेवून कोणाची तरी नवीच चप्पल पायात घातली. मला अजूनच भिती वाटायला लागली. मगा फक्त पाकीट वाल्याची भिती होती आता चप्पल वाल्याची पण भिती वाटु लागली. मी मनात म्हणलं उगाचचं याच्या बरोबर आलो हा नक्कीच आपल्याला मार बसवणार.चम्यानं चोरलेली चप्पल गावाकडं भेटत नव्हती. नक्कीच ती कोण्यातरी श्रीमंताच्या पोराची होती. त्या पोरानं जर पाहिली तर लगेच ओळखु येईल अशी वेगळीच डिझाईन होती.
दर्शन झालं होतं, जेवण झालं होतं, आता पटकन गावाकडं सटकनं गरजेचे होते. थोडं पुढं आलो तर एक हातात घालायच्या कडयाचं दुकान होतं. चम्या त्या दुकानाकडं गेला. मागं मागं मीही गेलो. तेथे आधीच खुप गर्दी होती. चम्यानं एक कडं हातात घालून बघीतलं. दुकानदाराला घासाघीस करुन कमी पैशात मागीतलं. दुकानदारानं दिलं नाही. चम्या म्हणाला, “एवढं महाग असतयं का? नग आम्हाला हे.” चम्या उठला चम्याच्या मागं मीही उठलो. दहा- पंधरा पाऊल गेलो तोच मागून कोणीतरी आमच्या मानगुटा धरल्या. चम्या धडपड करत होता. मी सडपातळ, किडमीडीत अंगाचा होतो. त्यामुळे मला हलताही येईना. मानगुट पकडल्यानं मागं पण बघता येईना. मनात आलं नक्कीच हा पाकीटवाला असणार. कसं तरी मागं बघीतलं तर तो कडयावाला दुकानदार होता. तो खुप चिडला होता. तो शिव्या हासाडतच बोलला, “ चोरी करता व्हयरं भाडयांनो?”
आता काय चोरी केली मला काहीच कळलं नाही.
तेवढयात कडयाच्या दुकाना शेजारचा गंडे-दोरे विकणारा दुकानदार तेथे आला. म्हणाला, “ मगापासून माझं हयांच्याकडं लक्ष व्हतं. चोरी करतात व्हयरं.”
असं म्हणून त्यानं चम्याच्या एक कानपटात ठेवून दिली. ईकडं मीच बोंबलायला लागलो. त्यानं चम्याच्या पँटीच्या खिशात हात घालून दोन कडे बाहेर काढले. म्हणजे चम्यानं बोलता बोलता कडे चोरले होते. मला पण त्याची खबर नव्हती. बघता-बघता तेथे चांगलीच गर्दी जमली. तेवढयात एक जण चम्याची झडती घेवू लागला. तर त्याच्या खिशातून मगाचं पाकीट निघलं. तर गर्दीतून आवाज आला, “ आरं माझं पाकीट हाय त्ये.” तितक्यात ते चप्पलवालं पोरगं पण आलं. त्यानं पण बापाला बोट दाखवून सांगीतलं. “पप्पा तीच चप्पल आहे माझी.” तसा तो पोराचा बाप पण चिडून आला. त्यानंही चम्याच्या दोन कानाखाली वाजवल्या. चोरी चम्यानं केली असताना मी त्याचा साथीदार म्हणून लोक मलाही मारत होते. सगळा तमाशाच चालु होता. मला तर खुप अवघडल्यासारखं झालं होतं. तेवढयात चम्यानं त्या दुकानदाराच्या हाताला हिसका दिला आणी काही कळायच्या आतच सुसाट पळत सुटला. मला काही पळता आलं नाही. तेवढयात एक जण म्हणाला, “ याला पोलीसांच्या हवाली करा, म्हणजे चांगलं तिंबून काढतेन.” कोणी म्हणत होतं, “ याला नागडं करुन पूर्ण जत्रेत फिरवा. म्हणजे पुन्हा चोरी करणार नाही.” असले वाक्य ऐकून मी मोठमोठयानं रडु लागलो. तितक्यात एक आजी आली. तिलाच माझी किव आली. ती मला मारणाऱ्या लोकांना थांबवून म्हणाली, “लहान आहे तो मारु नका त्याला.”
मी थरथर कापत होतो. हुंदके देत रडत होतो. आजीनं मला जवळ घेवून विचारलं, “ चोरी कशाला केलीस बबडया?”
मी म्हणालो, “ चोरी मी नाही केली, त्या चम्यानचं चोरी केली मी त्याच्या सोबत आलो होतो.”
आजीनं पदरानं माझे डोळे पुसले. आणी म्हणाली, “ आरे संगत चांगली धरावी कधी पण माणसानं. चोरी त्यानं केली, तो पळून गेला, मार तुला मिळाला किनई.”
आजीच्या प्रेमळ बोलण्यानं मला जरा हुरुप आला. आजी मला त्या मारणाऱ्या माणसांपासून दूर सोडून निघून गेली. पोलीसांच्या ताब्यात जाण्यापासून तसेच नागडं होण्यापासून आजीनं मला वाचवलं होतं. मी मनोमन ठरवलं. आता वाईट संगत कधीच धरायची नाही.
मी गावाकडं जाण्यासाठी काही वाहन भेटतयं का बघत होतो. गावाकडं जाण्यासाठी पाचच रु. माझ्याकडे होते. तितक्यात मला चोकोबारचा गाडा दिसला. दुसरी कुल्फी 1रु, 2 रुपयाला होती. पैसे जवळ नसल्यामुळे मी खुप दिवसांपासून मन मारलं होतं. मी मनातच ठरवलं आता चालत जायचं पण चोकोबार घ्यायचचं. मी चोकोबार कुल्फी घेतली. त्याला बाहेरुन खपटाचं आवरण होतं. चोकोबार कुल्फी भेटल्यानं मी थोडया वेळापुर्वी घडलेली घटना विसरुन गेलो. एखाद्या झाडाच्या थंडगार सावलीत बसून कुल्फी खाण्याचा मनसोक्त आनंद लुटावा असे ठरवून मी चाकरवाडी पासून थोडया दूर अंतरावर आलो. मी डांबरी रस्ता सोडून मधल्या कच्च्या रस्त्याला लागून झपाझप पावलं टाकत चालत होतो. डोक्यावर सुर्य आग ओकत होता. दूरूनच मला एक लिंबाचं झाड दिसलं, झाड दिसताच मी चोकोबार कुल्फीच्या वरील खपटाचे आवरण बाजूला काढले. झाडाच्या सावलीत आलो.एक घास खाणार तितक्यात माशा घोंगावत माझ्या डोक्यावर आल्या. बहुतेक मोहळाच्या माशा होत्या त्या. मी तेथून जोरात पळ सुटलो. उन्हाच्या काऱ्हात माशापण माझ्या डोक्यावर घोंगावत माझ्या बरोबरच पळत होत्या. मी जितक्या वेगाने पळत होतो तितक्याच वेगात माशा डोक्यावर घोंगावत येत होत्या. दूरवर नजर टाकली तर कोणीच दिसत नव्हतं. आता आपलं काही खरं नाही या माशा आपल्याला चावणार या भितीनं मी आणखीनचं जोरानं पळु लागलो. आधीच खुप उुन होतं त्यात पळाल्यामुळे माझ्या घशाला कोरड पडली होती, धापा लागल्या होत्या, घामानं सर्वांग निथळून निघालं होतं, डोळयापुढं अंधारी आली होती. माशा माझा पिच्छा सोडत नव्हत्या. आता मी पळून तरी मरणार नाही तर माशा चावून तरी मरणार हे नक्की झालं होतं. तेवढयात पळता पळता ठेच लागून मी रस्त्यात पडलो. मी पडल्यावर माशांनी माझा पिच्छा सोडला. बहुतेक त्या साध्या माशा होत्या. माझ्या डोक्यावरच्या तेलकट पणामुळं माझ्या मागे लागल्या होत्या. माशा गेल्यावर माती पोळाल्यानं मी भानावर आलो. उजव्या पायातल्या चपलेचा अंगठा तुटला होता. माझ्या पायाच्या अंगठयाला चांगलच लागलं होतं. रक्त बाहेर आलं मला त्या वेदना असहय होत होत्या. इतक्या दिवसापासून खाण्याची इच्छा असलेली चोकोबार कुल्फी मातीत भरली होती. त्याचं खुप वाईट वाटलं. तेवढयात मला एक युक्ती सुचली, मी पटकन एका हातात चप्पल आणी एका हातात चोकोबार उचलली. कुभांराची विहीर जवळच होती. पाय पोळत होते. मी पळतच विहीरीजवळ आलो. चप्पल काठावर ठेवली. विहीरीच्या बाजूलाच आंब्याचं झाड होतं. त्याची सावली विहीरीत पडली होती. विहीरीला उतरायल्या चांगल्या पायऱ्या होत्या. मी खाली उतरलो. एका पायरीवर बसून मातीने भरलेली वितळून अर्धी झालेली चोकोबार कुल्फी धुतली. थंडगार पाण्यात मगापासून चटके बसलेले पाय सोडले. आणी डोळे मिटून माझी कितीतरी दिवसांची चोकोबार कुल्फी खाण्याची इच्छा पूर्ण केली. विहीरीत थंडगार पाण्यानं चांगले हातपाय धुतले. बाहेर येवून जखमेवर कुऱ्हाडीचा पाला लावला. तितक्यात चम्या तिथं आला. माझ्याकडं हसून म्हणाला, “ कसं काय पळून गेलो मी?”
मला आधीच त्याचा राग आला होता. मी म्हणालो, “ मित्राला संकटात टाकून पळून जाणाराला मला बोलायचं नाही.”
तो म्हणाला, “नको बोलूस. माझं तरी काय जातय.”
एवढं बोलून तो निघून गेला. मी ही घरी आलो.
चार –पाच दिवसातच चम्याचे वडील घरातलं सगळं सामान-सुमान घेवून घरातल्या माणसासकट पळून गेल्याचं कळलं.कोठे गेले कोणालाच माहीत नव्हतं. इतकचं कळलं की कर्जबाजारीपणामुळे पळून गेले. चम्याच्या वडीलांनी जवळच्या सगळयांकडून उसने पैसे घेतले होते. तसेच काही खाजगी सावकारांकडूनही पैसे घेतले होते. ते फेडता न आल्यामुळे ते पळून गेले होते.
आज पंधरा वर्ष झाली चम्याची आणी माझी भेट नाही. तसेच मला संकटातून वाचवणाऱ्या आजीचीही भेट झालेली नाही.याच विचारात असताना अचानक चोकोबार कुल्फीच्या गाडयाच्या घंटीच्या आवाजानं मी भानावर आलो.मी पुण्याला जाण्यासाठी एका खेडेगावाच्या बसस्थानकात थांबलो होतो. तितक्यात मला चोकोबार कुल्फी खाण्याचा मोह झाला. मी गाडयाजवळ गेलो तितक्यात गाडी आल्यानं मी गडबडीनं कुल्फी घेवून पैसे न देताच गाडीकडे पळालो पण गाडी निघून गेली. तितक्यात मला ती संकटातून वाचवणारी आजीबाई दिसली. मला ती ओळखु आली कारण तिच्या हातावर विठ्ठल रुक्मीणीच्या मुर्ती गोंदलेल्या होत्या. आता खुपच थकली होती. मी तिच्याकडे जाणार तोच मला मागून कोणीतरी माझ्या नावाने आवाज दिला.अनोळखी ठिकाणी मला कोण आवाज देत आहे म्हणून मी कुतुहलाने मागे पाहिले तर कुल्फी विकणारा हसत माझ्या दिशेने येत होता. माझ्या लक्षात आलं याचे पैसे द्यायचे राहिले आहेत. पण याला माझं नाव कसं माहीत? मी निरखून पाहिलं तर तो चम्याच होता. इतक्या दिवसांनी भेटल्याने मी ही आनंदून त्याला मिठी मारली.
त्यानं सांगीतलं, “ गावातून निघून गेल्यावर माझे वडील अपघातात वारले. त्या दिवसापासून मी चोरी करणं सोडून दिलं आहे. आता मेहनत करुनच जगतो.” आम्ही दोघे मिळून आजीकडे गेलो. मी आजीला आठवण करुन दिली तेव्हा ती खुप खुष झाली.
मी चोकोबार कुल्फी खाण्यासाठी म्हणून थांबलो त्यामुळे माझी गाडी सुटली. पण पूर्वीचा वाईट पण आता सुधारलेला मित्र व मला संकटातून वाचवणाऱ्या व मला उपदेश करणाऱ्या आजीची भेट झाली त्यामुळं मी आनंदून गेलो.
