बालपणीचा काळ सुखाचा
बालपणीचा काळ सुखाचा
कायम वरच्या स्थानावर असलेले आणि जीवनाला हर्षाची किनार लावून जाणारे बालपणीचे दिवस खरोखरीच न विसरता येणारे....आयुष्य पर्णाआड उगवलेल्या या बालपणीच्या आठवणींच्या कळ्या नेहमीच आकर्षित करतात मनाला... मुठीतून निसटून गेलेल्या त्या क्षणांच्या स्मृतीत कधी आपण आनंदाने बहरतो ...तर कधी दुःखाने झुरत बसतो.... निरागस, निष्पाप ,आनंदी असणारे बालपण हवेहवेसे वाटणारे... कालचक्र उलटे फिरून पुन्हा बालपणात जाण्याच्या बालिश कल्पना अनेकदा मोहात पडतात आपल्याला....प्रापंचिक जबाबदारी पार पाडताना दमछाक होत असलेल्या मनावर सुखाचा शिडकावा करत जातात.... फुलपाखरासम त्या स्वच्छंदी जीवनाचा पुन्हा नव्याने आस्वाद घ्यावा वाटतो....
छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईबाबांकडे केलेले हट्ट... मैत्रिणींसोबत भातुकलीच्या खेळात रममाण होत मैदानी खेळातही दाखविलेले प्राविण्य...! केलेल्या खोड्या मुळे आईच्या मारापासून स्वतःस वाचवण्याकरता आजीच्या पदराची केलेली ढाल... त्याच पदरात शिरून रात्री आजीने सांगितलेल्या जीवन समृद्ध करणाऱ्या गोष्टी ऐकताना आनंद शिखरावर जाणारे मन....उन्हाळ्यात गच्चीवर चांदण्या मोजत आकाशाची पांघरलेली शाल..... पावसाळ्यात येरे येरे पावसा म्हणत नखशिखांत भिजत कागदाच्या बनवलेल्या होड्या......दिवाळीला उडवलेले फटाके.... बनवलेले किल्ले... रंगपंचमीला सप्तरंगी रंगाने मैत्रिणींना न्हाऊ घालत सुख रंगात रंगलेले मन ....वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर सम्पताच मामाच्या घराची लागलेली ओढ...... बहिणी सोबत घालवलेले ते सुखद क्षण.... स्मृतिकोषाचे आवरण हलकेच बाजूला करताच जगण्याचा महोत्सव करत गेलेल्या त्या बालपणाच्या असंख्य सुखद स्मृती वातावरण सुगंधित करत सुखावून जातात मनाला....
खरंच...!!! बालपण म्हणजे जीवन वृक्षावर उमललेले एक सुगंधी फुल जणू.... जे जीवन वृक्षाची शोभा वाढवते ...सौंदर्य वाढवते .... त्या फुलाचा आस्वाद चिरंतन घ्यायचा ध्यास मनी लागतो ....पण कालचक्र का कधी कुणासाठी थांबत??? बालपणीचा काळ परत पुन्हा न अनुभवता येण्याचे दुःख सतत मनास होत असते ....त्या रम्य काळात रमलेल्या मनात हर्षतुषार थुईथुई नाचतात..... बालपणीची स्मृतीपुष्पे मनांगण सुशोभित करत जणू म्हणतात...
'बालपणीचा काळ सुखाचा
कधी न यायचा पुन्हा परतुनी
आनंदामृत ते चाखायचे
केवळ त्याच्या गोड स्मृतीतुनी
