सैनिकाचे पत्नीस पत्र
सैनिकाचे पत्नीस पत्र
प्रिय शालू,
आज सकाळी प्रकाशच्या घरून पत्र आलं त्याला
तेव्हा आठवलं बरेच दिवसात मी तुला काही लिहिलंच नाही
मागच्या पत्रात लिहिलंस तू घर, आई, मुलांबद्दल
पण स्वतःबद्दल तू काही लिहितच नाहीस
दर दोन ओळींनंतर स्वतःला जपा
एवढे लिहितेस तेव्हा तुझा हात थरथरत असतो
नाही म्हणू नको सगळे मला कळते
संध्याकाळ झाली की तुझी आठवण छळते
डोळ्यात तेल घालून पहारा करतो
कारण कौतुक तुला माझ्या शौर्याचे
एकटा असतो कॅम्पवर पाकिटातला फोटो पाहून
शांत संध्याकाळ अधिकच कातर कातर होते
यावेळी दिवाळीला नक्की घरी येणार आहे
घाईने उद्यापासूनच लगेच तयारीला लागू नकोस
मुलं, घर, शेती, सगे सोयरे सगळे सांभाळतेस तू एकटीने
तुळशीजवळ दिवा लावताना एवढी का मग हळवी होतेस
या मातृभूमीनंतर तुझीच जागा माझ्या हृदयात
मी गेलो तरी एवढे नक्की लक्षात असू दे
आज रात्री झोप लागणार नाही मला कारण
कित्येक रात्री भीतीने तू झोपलीच नसशील
स्वतःला जप; काळजी घे स्वतःची
तुझ्या रेखीव कुंकवानेच माझे रक्षण होत आहे
देशासाठी बलिदान देईन तेव्हा रडू नको अजिबात
तुझ्या माझ्या विरहाचा तो सर्वोच्च कळस असेल
आता पुरे करतो पत्र ड्युटीवर जायचे आहे
येणारे घुसखोर रोखायचे आहेत
पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी नसेन
मला तू खूप आवडतेस एवढेच सांगायचे आहे