खूष राहता यायला पाहिजे
खूष राहता यायला पाहिजे
काही करता येत असो वा नसो, खूष राहता यायला पाहिजे,
चंद्र, तारे वगैरे नुसतं दिसणं वेगळं, ते पाहता यायला पाहिजे!
कोणी म्हणेल तुझ्याकडे हे नाही, तुझ्याकडे ते नाही,
आपण म्हणावं मला पुरेसं आहे माझ्याकडे जे काही,
आपल्याला काय हवंय ते त्यांना का कळणारे?
आणि कळलंच, तर ते काय त्यांच्यापाशी मिळणारे?
हवंय ते सुखंच ना - ते ज्याचं त्याच्यापाशीच असतं,
अहो, उडणारं फुलपाखरु ही फुलापाशीच बसतं!
मनालाही फुलासारखं उमलू देता यायला पाहिजे,
मग त्याचाच सुगंध घेऊन वाऱ्यासवे वाहता यायला पाहिजे,
काही करता येत असो वा नसो, खूष राहता यायला पाहिजे!
कुठल्या तरी मापदंडात बसवायला सुख म्हणजे काय विज्ञान वाटलं?
किंवा त्याचं सुख माझं सुख असं तोलायला वाण्याकडलं सामान वाटलं?
अहो, पावसात भिजण्यालाही सुख म्हणता येतं,
आणि आईजवळ निजण्यालाही सुख म्हणता येतं!
लहानसहान गोष्टींतही केवढा आंनद लपलेला असतो,
आणि हे न कळणारा धावपटू तर जवळजवळ संपलेला असतो,
त्याला जिंकूद्या ती शर्यत, आपल्याला थोडं थांबता यायला पाहिजे,
कोणाच्या तरी आनंदाश्रूतही मन भरुन नाहता यायला पाहिजे,
काही करता येत असो वा नसो, खूष राहता यायला पाहिजे!