आठवणी
आठवणी
आठवत का रे तुला?
एक छोटस घर होत.
खाली जमीन शेणाची,
आभाळ ताऱ्यांच वर होत.
आकाशात ताऱ्यांची झुंबड,
पण चंद्र मात्र एकटा होता.
राजबिंडा राजपुत्र असा,
ध्रुवतारा देखणा होता.
कधी झोपी जायचो,
रात्र जशी मंतरलेली.
जमिनी वर फुलांचा सडा,
मखमली चादर जणू अंथरलेली.
चुली वरच्या चहाला,
जशी अमृताची सर होती.
अंगणात पक्षांची किलबिल,
निसर्गसौंदर्यात पडलेली भर होती.
अंगणाच्या वेशीपलीकडे,
नजरव्यापी शेतमळा होता.
सर्जाराजाला माझ्या,
डोलणाऱ्या पिकांचा लळा होता.
कड्याकपारीतून वाहणाऱ्या नदीचा आवाज,
शांतता भेदून जायचा.
नदीकाठच्या दगडांवरून सूर मारणाऱ्या मुलांचा खेळ,
लक्ष वेधून घ्यायचा.
बघता बघता चोहीकडून,
सावली नाहीशी व्हायची.
भुकेलेल्या पोटाला,
पेजेची थाळी साद घालायची.
थकलेल्या देहामध्ये आता,
नवा त्राण असायचा.
चेहरे नवे,नव्या वाटा,
पण कोणीच अजाण नसायचा.
पक्क्या रस्त्यांच्या सरती,
पायवाटांची सुरवात होती.
डोळे जमिनीवर जरी,
नजर स्वर्गात होती.
पाऊले वळायची दाही दिशांना,
तरीही समुद्रच गाठायचो.
माणसं भेटायची परकी,
पण त्यांना आपलेच वाटायचो.
पायवाट अडचणीची,
झाडझुडपांचा वेढा होता.
थाऱ्यावर नव्हते चित्त,
शिवबाच्या गाडाचा ओढा होता.
स्पर्श कर्त्या लाटा पाउलाना,
प्रवास सरतीचा दाखला होता.
जसा हा विशाल समुद्र,
माझ्या महाराजांचरणी आदराने वाकला होता.
किनाऱ्यापासून गडापर्यंतचा होडीचा प्रवास,
सोबतीला शिवप्रेमी,मनात हर्षोउल्हास.
गडाचं प्रेवेशद्वार जणू स्वर्गाच दार,
आत ऐश्वर्य,सुख-समृद्धीची आरास.
आगमन गडावर,
जसा स्वप्नपूर्तीचा सोहळाच होता.
महारांजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा,
आमचा सिंधुदुर्ग किल्लाच वेगळा होता.
अभिमान महाराष्ट्राचा असा,
माझा सिंधुदुर्ग जिल्हा होता.
सोनेरी इतिहासाचा अलंकार जसा,
माझ्या दैवताचा किल्ला होता.
रचुनी शिल्पावर शिल्पे
साकारला उंच मिनारा होता
वळून पाहता मागे,
नजरेआड गेलेला समुद्रकिनारा होता.
पेचात पाडेल शत्रूला,
अशी तटबंदी अभेद्य होती.
आत स्वराज्य शिवबाचं,
सुखसमृध्दीची नांदी होती.
कानाकोपऱ्यात गडाच्या जसा,
शिवरायांचाच वास होता.
जिजाऊंच्या शिवबानं घेतला,
स्वराज्याचा ध्यास होता.
अजब होती ती जाणीव,
तो श्वास,म्हणून हा श्वास होता.
चरणी आई भवानीच्या,
महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास होता.
उलगडता उलगडता पाने इतिहासाची,
सूर्य क्षितिजापलीकडे जायचा.
अंधुकशा प्रकाशात,आकाशातला चंद्र,
परतीची वाट करून द्यायचा.
पाऊलावर टाकत पाऊले,
उंबरठा घरचा गाठायचो.
मोहीम फत्ते करून आलेल्या,
मावळ्यांसारखे वाटायचो.
जीव आता विसावलेला,
दिसभराच्या आठवणी गिरवायचा.
चुलीकडून येणारा मासळीचा सुगंध,
मेजवानीचा विलंब नकोसा व्हायचा.
पुन्हा ती रात्र मंतरलेली,
काजव्यांची गर्दी दाट होती.
रात्रीपलीकडे अंधाऱ्या,
नवी सोनेरी पहाट होती.
आठवणींचा संग्रह तो,
पुन्हा आज चाळला.
थेम्ब डोळ्यात आनंदाश्रूंचा,
पुन्हा नव्याने वाळला.
पुन्हा जगावं ते सर्व,ते सुवर्ण पर्व
आणि तो आठवणींचा पसारा.
तू माझ्यात नी मी तुझ्यात,
आणि तो असीम समुद्रकिनारा.