उधारी
उधारी


एक अतिशय हुशार चोर होता. त्यात त्याचा हात कोणी धरू शकत नव्हता. चोरीसाठी तो गावोगावी फिरत असे व जंगलात लपत असे त्यामुळे तो कधी सापडला नाही. जंगलात राहिल्यामुळे त्याला पशु पक्षी यांची भाषा अवगत झाली. त्याच्या आधारावर त्याला चोरी करण्यात उपयोग होत असे. असाच एके दिवशी जंगलात बसला असताना झाडावरील 2 पक्षातील संभाषण ऐकले.
पहिला पक्षी म्हणाला, अरे शेजारच्या गावात एक व्यापारी आहे त्याच्याजवळ धन धान्य विपुल आहे त्यामुळे मला तिथे भरपूर अन्न मिळाले. पोटभर खाऊन पिलासाठी पण घेऊन आलो. तो खूप दानशूर आहे, दयाळू आहे. त्याच्याकडे कोणी काही मागण्यासाठी गेल्यास रिकाम्या हाती येत नाही.
हे ऐकून चोर विचारात पडला असा कोणता व्यापारी आहे हे जाऊन पाहिलं पाहिजे व त्याच्या तिजोरीची ठावठिकाणा बघितला पाहिजे म्हणजे तिथं मला चोरी करता येईल. असा विचार करून सकाळी चोर त्या गावाकडे निघाला. गावात जाऊन तेथील रेकी करण्याचा विचार करून त्याची माहिती काढली. व्यापारी खूप दयाळू व दानशूर होता. त्याच्याकडे कोणी काही घ्यायला गेल्यास परत येत नव्हता. त्याच्याकडे कोणी काही उधार किंवा कर्ज घेण्यास गेल्यास तो आपल्या मुनीमकडे पाठवून त्याची नोंद करून घेत असे. मुनीम फक्त कर्ज घेणाऱ्याला विचारीत असे की हे कर्ज केव्हा फेडणार"ह्या जन्मी की पुढच्या जन्मी" समोरची व्यक्ती प्रामाणिक असली तर ती म्हणे मी काय वेडा आहे का, मी हे कर्ज ह्याच जन्मी फेडणार तर काही अप्रामाणिक म्हणत आम्ही पुढच्या जन्मी फेडू असं म्हणून निघून जात व मनात म्हणत किती वेडा व्यापारी आहे की पुढच्या जन्मी कोण फेडत का! व निघून जात.
मुनीम फक्त वहीत नोंद घ्यायचा कोण कसं कर्ज फेडणार बस्स एवढच काम मुनीम करायचा व रक्कम देत असे. अश्याप्रकारे व्यापाराचा दिनक्रम चालू असे. हे त्या चोराने जाणून घेतले. तो तिजोरी पाहून घेण्यासाठी व्यापाऱ्याकडे गेला व कर्जाची मागणी केली. व्यापाऱ्याने त्याला मुनीमकडे पाठवले व कर्ज घेण्यास सांगितले. चोर मुनीमकडे गेला व कर्ज घेताना सांगितले की मी पुढच्या जन्मी फेडेल. मुनीमने तशी नोंद करून चोराला कर्ज दिले. ह्या प्रक्रियेत त्याने तिजोरी पाहून घेतली व परत जंगलात आला व विचार करू लागला की रात्रीच व्यापाऱ्याच्या घरी चोरी करायची अस ठरवून आराम करू लागला.
रात्र झाली व चोर चोरी करायच्या हेतूने व्यापाऱ्याच्या घरी आला व गोठ्यात लपून बसला व व्यापारी झोपण्याची वाट बघू लागला तेवढ्यात गोठ्यात म्हशीच्या बोलण्याची चाहूल लागली. त्या काय बोलतात हे ऐकू लागला त्याला त्यांची भाषा कळत होती जी त्याने जंगलात राहून आत्मसात केली होती.
पहिली म्हैस म्हणाली "का ग तू आजच ह्या गोठ्यात आली.
दुसरी म्हणाली "अगं मी मागच्या जन्मी ह्या व्यापऱ्याकडून कर्ज घेतले होते ते फेडण्यासाठी मी आज येथे आली. तू कधीपासून आहे"?
त्यावर पहिली म्हणाली "अगं मी येथे 3 वर्षापासून आहे. मी घेतलेल्या कर्जाची परतफेड दूध देऊन करीत आहे.
हे ऐकून चोराची मनस्थिती बदलली व तो परत गेला व सकाळी व्यापाऱ्याकडे येऊन घेतलेलं कर्ज परत देऊन गेला. अशाप्रकारे त्याला समजले की घेतलेले कर्ज फेडावेच लागते मग ते ह्या जन्मी असो की पुढच्या जन्मी.
आपणही ह्या विश्वात याचसाठी आलो आहोत कारण आपल्याला कोणाकडून घ्यायचे असते तर कोणाला द्यायचे असते .याप्रमाणें प्रत्येक जण काही न काही घेण्या देण्या साठीच सर्व हिशोब फेडायला आला आहे.
हे कर्ज फेडण्यासाठी कोणी मुलगा तर कोणी मुलगी बनून येते
कोणी बाप बनून तर कोणी आई बनून
कोणी पती बनून तर कोणी पत्नी बनुन
कोणी प्रेमी बनून तर कोणी प्रेमिका बनून
कोणी मित्र बनून तर कोणी शत्रू बनून
कोणी शेजारी बनून तर कोणी नातेवाईक बनून
सुख असो की दुःख हिशोब सर्वाना द्यावा लागतो हाच निसर्गाचा नियम आहे