Santosh Bhole

Others

1  

Santosh Bhole

Others

प्रवास आयुष्यरूपी स्वर्गाचा

प्रवास आयुष्यरूपी स्वर्गाचा

4 mins
557


श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सरस्वती तीरी वसलेल्या श्रीगोंदा शहरातील माझा जन्म. आज्जी, आई-वडील, भाऊ-बहीण आणि मी असे छोटसं आमचं कुटुंब. कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी वडील मोल-मजुरी करत सुखी संसाराचा गाडा हाकत असे. घरची परिस्थिती आणि वडिलांची धडपड आईलाही स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून आईही दुसऱ्याच्या शेतात मोल-मजुरी करत होती. संसाराला हातभर म्हणून ती कधी-कधी तलावावर भराव टाकण्या सारखी जोखमीची काम सुद्धा करायची. आई-आण्णा म्हणजे आमच्या कुटुंबाची दोन चाकचं, संसाररूपी गाडा जमल तसा ओढत असे.


वडिलोपार्जित जमीन नसल्याने आम्ही दुसऱ्याच्या शेतात राहायचो. काळही तसाच होता, माणसं माणुसकी जपायची. माझ्या शालेय शिक्षणालाही येथेच सुरवात झाली. भोळेवस्ती प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतलं. घरातही लहान आणि दिसायलाही लहान असल्याने सगळ्यांकडून खूप लाड झाले. आई-आण्णांनी काबाड कष्ट करून आम्हा भावंडांना शिकवलं. दुर्दैवाने दादा मोठा असल्याने शिक्षण त्याला लवकर सोडावं लागलं. कालांतराने हक्काची शेती भेटली. शेतीची कामं करायला आण्णांना दूरवर यावं लागायचं म्हणून चौथी पर्यंतच शिक्षण झाल्यावर आम्ही स्वतःच्या शेतात राहायला जायचं ठरवलं. वडिलांनी मग रानात छोटीसी झोपडी बांधली, आमच्यासाठी आण्णांनी बांधलेला तो महाल होता...!!!️


   पाचवीपासूनच शिक्षण येथूनच चालू केलं. घर गावापासून दूर असल्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेला आण्णा सायकलवर घ्यायला यायचे. आता शिक्षण सोडल्यामुळे दादाही कमवता झाला होता. जेमतेम परिस्थितीत संसाराचा गाडा सुरळीत चालू होता. स्वतःच असे शेतात पाणी आणल्याने घरच्यांना पाण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात पायपीट करावी लागत होती. हलाखीच्या परिस्थितीत जगता जगता माझ्या बापाचं आर्ध आयुष्य गेलं. कालांतराने स्वतःच घरचं पाणीही झालं. तरी माझ्या बापाने काढलेलं हलाखीच्या आणि कष्टाचं जीवन विसरता येणार नाही.


    कमावणारी तीन आणि खाणारी चार असे दिवस एक मागे एक जात होती, तशी माझ्या आणि ताईंच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न घरच्यांना सतावत होता. अशातच मोठ्या ताईच लग्न झालं आणि बारक्या तिनेही शिक्षणाला रामराम ठोकला. तोपर्यंत मी दहावीला पोहचलो. घरात आता एकटाच शिकणारा उरलो होतो. घरच्या परिस्थितीची जाण, शिक्षणाची जिद्ध त्यातच दादाचा दहावी पासूनच असलेला पाठीराखा यामुळे आयुष्याला एक वेगळीच कलाटणी बसत होती. आईला लिहता वाचता येत नव्हतं आणि आण्णांचंही शिक्षण जेमतेमच. मी शिकावं ही सगळ्यांची तळमळ होती पण परिस्थितीपुढे कोणाला काही करता येत नव्हतं. आपल्या वाट्याला आलेले कष्ट आणि भोग बारक्याच्या वाट्याला येऊ नये ही खंत दादाच्या मनात सतत खदखदत होती. 


आई-आण्णांचा आशिर्वाद आणि दादाने घातलेले वैयक्तिक लक्ष यामुळे मी दहावी चांगल्या मार्कने उत्तीर्ण झालो. घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर दुसरीकडे पुढच्या शिक्षणाचं काय म्हणून चिंताही. तरीही न डगमगता त्यांनी मला कॉलेजला पाठवलं. महाराजा जिवाजीराव महाविद्यालयात अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतलं खरं पण मराठी माध्यमातून आल्याने भीतीही खूप वाटत होती. कसंबसं तोडकमोडक इंग्लिश जमायला लागलं आणि बारावी उत्तीर्ण झालो. गावात उच्चशिक्षणासाठी चागली सोय नसल्याने मला आता बाहेर जावं लागणार होतं. खऱ्या अर्थाने आई-आण्णांवर मोठं संकट उभा राहील होत. बाहेर जाणं म्हणजे खर्च वाढणार होता. दादाने आण्णांना विचारलं काय करायचं आता, जमेल का बाहेर पाठवून याचा खर्च करायला? त्या परिस्थितीची आण्णा म्हणाले नाही पेलवणार आता आपल्याला एवढा खर्च, उद्या पासून याला जातो माझ्या सोबत कामावर घेऊन. बस झालं पुरेसं शिक्षण. दादाचा राग अनावर झाला आणि तो ही खूप काही बोलून गेला. काही काळ घरचं वातावरण तणावाखाली गेलं. आयुष्यात कधी बापाच्या डोळ्यात पाणी पाहिलं नव्हतं त्या बापाचे डोळे मात्र आज पाण्याने भरून आले होते...!!!


   परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. काही क्षण भविष्य सारं अंधारात गेल्या सारखं वाटत होतं. परिस्थिती जरी गरीब असली तरी माणसं घरातली मनाने श्रीमंत होती. दादा त्यावेळी खंबीरपणे मागे उभा राहिला, "तू शिक, मी आहे. माझ्या वाट्याला आलेले कष्ट तुझ्या वाट्याला नको" असे म्हणून त्याने घराची आणि माझी जबाबदारी अंगावर घेतली. आई-आण्णांनी ही त्याला साथ देत मला बाहेर शिक्षणाला पाठवायचं ठरवलं. चांगले मार्क्स असून सुद्धा इंजिनिअरिंग करता नाही आलं. मार्गदर्शनाचा अभाव तर होताच, काय करावं समजत नव्हतं. त्यातच BCS करण्याचा पर्यायी मार्ग शोधला. अहमदनगरच्या न्यूआर्टस् महाविद्यालयात BCS ला प्रवेश घेतला आणि पहिल्यांदा घर सोडून बाहेर राहायला गेलो. बाहेरच जग कसं असत ते खऱ्या अर्थाने कळायला लागलं. ती तीन वर्षे खूप काही शिकवून गेली. नंतरच शिक्षण पुणे येथे घेयचं ठरवलं आणि पुण्याला सिंहगड कॉलेजमध्ये MCS ला प्रवेश घेतला. 


    पुण्यासारख्या सुसंस्कृत माणसांच्या शहरात राहणं मला खूप नवीन होतं. त्यातच शहरी मुलांमध्ये खूप एकटं पडल्या सारख वाटायचं. वाढती महागाई आणि वाढता खर्च सगळ्यांचा चिंतेचा विषय बनत चालला होता. घरच्यांची जास्त ओढाताण होत असल्याने मग education loan घेतलं. जसजसं MCS complete होत गेलं, तसं Job ची चिंता वाढतं होती. सुसंस्कृत, मॉडर्न आणि स्वाभिमानी पुण्याच्या IT sector मध्ये आपण कसे टिकायचो याचंही tension येत होतं. सगळ्या मित्रांनीही प्रत्येकवेळी सांभाळून घेतलं. या pappa-mammi म्हणणाऱ्या modern जगात माझ्या आई-आण्णांचा आशीर्वाद सदैव पाठीशी होता. त्यांच्या आशिर्वादाने तो क्षण आला, माझं TCS या नामांकित IT company मध्ये selection झालं. आई-आण्णां आणि दादाचं मला माझ्या पायावर उभे करायचे स्वप्न पूर्ण झालं.


   Job साठी केलेला Ahmadabad-Chennai-Pune प्रवास अविस्मरणीय राहिला...!!!या दरम्यान भरपूर जिव्हाळ्याची माणसं भेटली, त्यांचे आभार...!!! आई-आण्णा, दादा आणि ताईचा support येथपर्यंत घेऊन आला, त्या सगळ्यांना नमन...!!! तुमची साथ अशीच सदैव पाठीशी राहु द्या. सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला आशिर्वाद कायम मिळो हीच अपेक्षा...!!!


Rate this content
Log in