नलाईन
नलाईन
जेवून झोपण्याच्या तयारीत असणारा पराग अंथरूणावर पडून फेसबुकवरच्या पोस्टी चाळत होता."घड्याळात साडे आकरा वाजल्या आता तरी की झोप की मुडद्या ... "म्हणून आईने दिलेल्या शिवीला कसलीच प्रतिक्रिया न देता फेसबुकमध्ये गुंतलेल्या पराग आपल्याच तंद्रित होता.
तेवढयात एका अनोळखी स्त्रीचा 'Hi' म्हणून आलेला इनबॉक्स मधला मेसेज परागसाठी काही नवा नव्हता.नवी होती ती मेसेज पाठवणारी व्यक्ती.एका स्त्रीने केलेला मेसेज आणि तिची ओळख नाही म्हणून काहीच उत्तर न देणारा पुरूष काही अपवाद वगळता व्हाटसप, फेसबूकवर सापडले तर तो निव्वळ योगायोग म्हणावा लागेल.
या मायावी जगात कुठे ना कुठे कुणाचे कुणाशी तरी बंध जुळलेत यातूनच हल्लीची रात्र डोळ्यांनी जागून निघते.
काही वेळेला पहाटे कोंबड्याची बाग ऐकून झोपणारे अगणित लोक आपल्याला आॕनलाईन दिसतात अगदी रात्रभर ही.
पराग आलेल्या मेसेज ला Hello अशी प्रतिक्रिया देऊन तिच्या मेसेज ची वाट पाहू लागला.आणि या 4G च्या युगात एकावर एक मेसेज येवू लागले - जावू लागले.अगदी कोणत्याही विषयावर जसजशी रात्र वाढत होती.तसा विषय ही वाढत होता.
रात्रीचे दोन वाजले.वेळ कसा गेला दोघांनाही काहीच कळलं नाही.डोळ्यांत झोप तरळत असतानाच पराग ने खात्री म्हणून विचारलं ,"तुझं अकाऊंट फेक तर नाही ना उगाच एप्रिल फूल व्हायला" दोन तीन स्माईली पाठवून ती हासू लागली. आणि क्षणभरात संध्याने तिचा फोटो पाठवून परागला तिचे फेसबुक अकांऊट फेक नाही याची खात्री करून दिली.
रात्रीच्या आडीच वाजता bby gnsd होऊन दोघेही आॕफलाईन गेले पण विचाराने रात्रभर एकमेकांच्या आॕनलाईनच होते.
एवढया भयान रात्री,अनोळखी पुरूषा बरोबर बोलणारी संध्या परागला खूपच धाडसी आणि अतृप्त वाटली.
पहाटे पहाटे झोपी गेलेला पराग कॉलेजला जायचं म्हणून उठला पण थोडा उशीर झाला होता.बी.ए.च्या दुसऱ्या वर्गात शिकणारा पराग हुशार ,चपलख भाषेतील गोडवा आणि संमोहनशास्त्रात पदवी घेतल्यासारखे चातुर्य त्याच्या बोलण्यात होते.अशा बोलण्याने सहज कुणालाही तो संमोहित करायचा.
संध्याला ही तो त्याच्या भाषाशैलीने संमोहित करण्यात यशस्वी झाला होता.चार पाच दिवस रोज रात्री संध्या व पराग आॕनलाईन येऊ लागली .आपापल्या सुखदुखाला एकमेकांशी शेअर करू लागली.पराग तिच्या सोबत बोलताना रात्र रात्र घालवू लागला.संध्याला हे आॕनलाईन बोलण्यातला मूड कमी होऊ लागला पण तरीही ती बोलत राहिली.परागची परीक्षा सुरू झाली पराग आता जास्त आॕनलाईन येत नव्हता.तिला हे जास्तच त्रासदायक वाटू लागले. कधीकधी आॕनलाईन आल्यावर दोघांत भांडणे होऊ लागली.
या भांडणाचा दोघांनाही कंटाळा आला.पण एकमेकांशी बोलल्या शिवाय दोघांचेही मन कशात लागत नव्हते.संध्यानेच तिचा मोबाईल नंबर मेसेज केला.
अन परागशी कधी कॉल तर कधी मेसेजने ती त्याला बोलू लागली.
आता दोघांत अधिकच जिव्हाळा वाढू लागला.
परागला आता परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी लागली होती.शेवटच्या वर्षाला अॕडमिशनला लागणारी फी ची जमवाजमव करायला पाहिजे म्हणून त्याने खाजगी कंपनीत काम शोधले.
संध्या आणि परागचा होणारा रोजचा संवाद दिवसेंदिवस आणखीनच कमी होऊ लागला...
संध्याची अस्वस्थता लक्षात आल्यावर परागचेही कामात लक्ष लागेना.कामात चुका होऊ लागल्या.मॕनेजरने एक दोन दा मोबाईल जप्त ही केला.पण परागचा नाइलाज होता.काम ही त्याच्यासाठी तेवढच महत्त्वाचं होतं.आणि संध्याशी बोलणं ही.
संध्याचा विरह परागला अस्वस्थ करत होता.पराग तिच्या आठवणीत आता रात्र रात्र जागू लागला.
कामावरचे लक्ष दिवसेंदिवस कमी होऊ लागले.पराग ज्या कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता. त्याच कंपनीत त्याचे मित्रही काम करत होते.
गुरूवारी परागच्या कंपनीला सुट्टी असायची.सुट्टी दिवशी फक्त संध्यालाच वेळ द्यायचा म्हणून तो स्वतःशीच बडबडत राहायचा.
एक दिवस पराग नेहमी प्रमाणे संध्याच्या विचारात पूर्ण गडून गेला.आणि चुकून अवजड जॉब त्याच्या पायावर पडला.हे चंदून पाहिलं तेव्हा त्याला मदत करायला धावत आला.पायाच्या अंगठ्यातून वाहणारं रक्त,नखाचा झालेला चुरा याच्या होणाऱ्या वेदना परागला जाणवत होत्या, पण चेहऱ्यावर कोणताही दुःखाचा भाव दिसत नव्हता.हे पाहून चंदू आश्चर्याने परागकडे पाहू लागला.
मनातली प्रत्येक गोष्ट चंदूला सांगणारा पराग हल्ली शांत शांत असायचा.
"पराग तू लका आता लय बदलाईस सारखा शांत असतोस, काय झालं ते तरी सांग?" न राहून चंदून विचारलं.चंदूचा असा प्रश्न परागच्या मनाला छळू लागला होता.काय उत्तर द्यायचं ? याला काय वाटेल? संध्या कोण म्हणून विचारलं तर पुढं काय? या प्रश्नांची वावटळ पुन्हा गोल फिरू लागली.पण शांत राहिल्यावर जास्तच गोंधळ उडेल.हे लक्षात आल्यावर तो जरा तोंड वाकडे करून खाली बसला.
आसपासच्या मशीनरीचा आवाज,कामगारांच्या हलचाली या गोष्टी त्याच्या विचारात अडथळा अणू पाहत होत्या.
चंदू तसाच उत्तराच्या प्रतिक्षेत परागकडे एकटक पाहत होता.परागने उत्तर देण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न,आणि उत्तर द्यायला झालेला उशीर चंदूलाच आता गंभीर वाटू लागला होता.
परागच्या बाबतीत खूपच गंभीर घटना घडलीय,आणि तो आपल्यापासून काहीतरी लपतोय हे हळूहळू चंदून जाणलं होत.या मागचं सत्य जाणून घेऊन त्याला धीर द्यायला पाहिजे हे त्याने मनोमन ठरवलं.
एवढा हासरा,तोंडभरून बोलणारा,सतत काहीही विनोद करून हासवणारा पराग हल्ली अस्वस्थ का असतो.नक्की काय झालंय ? हा विचार चंदूची पाठ सोडत नव्हता.
जेवणाची सुट्टी झाली.आणि कामगारांचा लोंढा कॅन्टीनकडे वळला. तरी पराग आपल्या जागेवर बसून होता.थोड्या वेळाने गार पाण्यानी तोंड धुवत त्याने रूमालाने तोंड पूसत स्वतःला आरशात पाहिलं.
हरवून गेलेला उत्साह,चेहऱ्यावर उमटलेल्या अस्वस्थ रेषा,पाण्याने भरलेले डोळे,त्यालाच आता छळत होते.यावर नक्की काय करावं मात्र काहीच कळण्याचा मार्ग नव्हता.
प्रेम ही भावनाच अशी स्वतःला खूप चांगली वाटतं असली, तरी ती दुसऱ्याला ती कधीच चांगली वाटतं नाही.मग उगाचच साधूचा आव आणून बोलणारे डिवचत राहतात.
(क्रमशः)
