नकोसा पाऊस
नकोसा पाऊस
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
पाऊस हा सर्वांना हवाहवासा वाटतो तसा तो मला ही आवडतो पण-----
मुंबईतल्या घराच्या खिडकीतून पाऊस पाहताना अचानक माझे मन माझ्या इवल्याशा गावाकडे भूर्रकन उडून जाते.सातारा जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यातील पाऊस माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो.कौलारू घर, आई , माझी भावंडं , राजा कुत्रा, गावातील मित्र सारं काही डोळ्यासमोर तरळतं.सातारा जिल्हातील रेंगडी हे डोंगरावर वसलेलं छोटसं गाव. या माझ्या छोट्या गावच्या मागे हिरवाईने नटलेले दोन डोंगर जणू काही आशीर्वादच देत आहेत असे उभे असून खालच्या बाजूस अजस्त्र डोंगररांगेत सातारा महाबळेश्वर हा घाटरस्ता आहे या मध्येच डोंगर कुशीत चिंचोळया आकाराचे माझे गाव आणि त्या गावात पडणारा धुवांधार पाऊस. महाबळेश्वरच्या जवळ असल्यामुळे व उंचावर असल्यामुळे तीन महिने येथे जोरदार पाऊस पडत असे .दाट धुक्याची झालर पसरून गाव जणू निद्रिस्त होत असे..
पाऊस काळच्या तीन महिन्यात कुणीच गावा बाहेर जात नसत.तीन महिन्याचा शिधा व सरपन याची व्यवस्था अगोदरच करून ठेवली जात असे.एकदा पाऊस सुरू झाला की सारे व्यवहार बंद.लावणीलाच लोक बाहेर पडत.लावणी सुरू झाली की धांदलच उठे.पावसाच्या दिवसात घरात सतत चूल पेटलेली , चुलीवर चहाचा टोप आणि संध्याकाळी जेवणात सुकंं मावरं मजाच काही और होती.माझे वडील मुंबईला तुटपुंज्या पगारावर कामाला असल्यामुळे माझी आई शेतीची मोलमजुरीची कामं करून आम्हा भावंडांचा सांभाळ करीत होती.पाऊसाची संततधार असताना ती भल्या पहाटे उठून आम्हाला जेवण करून लावणीच्या कामाला जात असे.संध्याकाळ झाल्यावर चातका प्रमाणे आम्ही तिची वाट पाहत असू.आमच्या घरामागे असलेल्या गावदरा डोंगरातील ओढा आवाज करीत जोराने वाहू लागायचा.पाऊसाचं प्रमाण वाढल्यावर, वारा जोराचा वाहू लागल्यावर , विजांचा कडकडाट ऐकल्यावर आम्ही भावंडं पार घाबरून जात असू आणि चुलीपुढे एकमेकांना बिलगून बसत असू.राजा कुत्रा ही मग सारखा आतबाहेर करू लागे.
दिवसभर पाऊस चांगला वाटायचा पण जस जशी संध्याकाळ होत जायची तशी तशी आईची आठवण यायची.आई पार भिजून यायची म्हणून आंघोळीसाठी मी चुलीवर पाणी तापत ठेवायचो.चुल लवकर पेटायची नाही तर कधी ओल्या लाकडामुळे घरभर धूर व्हायचा तेव्हा मला खूप रडू यायचं.पण त्या रडण्यापेक्षा ही पाऊसाचा जोर वाढल्यावर व काळोख दाटल्यावर आईच्या आठवणीने खरं रडू कोसळायच.तेव्हा तो पाऊस नकोसा वाटायचा.आईच्या काळजीने भिती वाटू लागायची.आई यायची ती पुर्ण भिजलेली तशाच अवस्थेत ती आमच्यासाठी चहा करायची तंगुस पिशवीतील एक एक बटर व ग्लासभरून चहा द्यायची, राजाला ही चहात भिजवून एक बटर द्यायची. चहा, बटर आणि बाहेर धो धो पाऊस भारीच मेजवानी वाटायची.आणि आई आल्याची मजाही.तरीही आईला पुर्ण भिजवणारा , घरी यायला उशीर करणारा पाऊस मला तरी नकोसाच वाटायचा.