Ketaki Soman

Others

2  

Ketaki Soman

Others

मी कोरोनग्रस्त बोलतोय!!!

मी कोरोनग्रस्त बोलतोय!!!

6 mins
6.7K


मी कोरोनग्रस्त बोलतोय!!!


होय! मी कोरोनाग्रस्त रुग्ण. पण तुम्ही घाबरून जाऊ नका मी लांबुनच बोलतोय. सोशल डीस्टंसिंग पाळूनच. फारंच नवे नवे शब्द असे कानावर पडले ना ह्या काळात , सोशल डीस्टंसिंग , लॉकडाऊन , क्वारंटाईन , विलगीकरण असे बरेच. तुम्ही तर फक्त ऐकले आहेत , हे शब्द मी जगतोय. आज तुमच्याशी बोलू शकतो हे माझं सुदैवच, मला तर हेही माहित नाही कि मी उद्या असेन कि नाही.


असो, शेवटी ‘कल हो ना हो’. मी आज तुमच्याशी गप्पा मारतोय ते काही कोरोना पासून कसं वाचायचं , काय काळजी घ्यायची हे सांगण्यासाठी नाही. ते काम करण्यासाठी हजारो हात आज पुढे सरसावले आहेत. पण मी आज बोलणारे तुमच्या भविष्याबद्दल, अर्थात मी राहिलो तर माझ्या भविष्याबद्दलही, माझे अनुभवाचे काही बोल. हा कोरोना संपूर्ण मानवाला खूप बोध देऊन जाईल. ह्या हाहाकाराची गरज होतीच मुळी. मी बोललो ते चुकीच वाटलं असेल ना तुम्हाला ? वाटणारच ...मला तुम्ही निर्दयी म्हणा देशद्रोही म्हणा नायतर कोरोनाग्रस्त ऐवजी मनोविकारग्रस्त म्हणा पण हेच सत्य आहे. फक्त देशाला नाही तर संपूर्ण मानव जातीला अशा जबरी धक्क्याची गरज होतीच. विश्वाची सगळी मालकी फक्त मानवाकडेच आहे अशा रुबाबाला तडा देण्यासाठी निसर्गाने केलेली कल्पना म्हणजेच कोरोना. ह्या प्रकोपाने मला जाग आली मित्रांनो पण त्याला उशीर झालाय . आता तुमच्याच हातात भविष्य आहे .सांभाळा आपल्या धरणीमातेला आणि ह्या निसर्गाला.


आजपर्यंत आपण ज्यांना डोक्यावर घेऊन फिरत होतो त्यांनाच आज आपण नाव ठेवतोय. मीही काही वेगळा नाही. माझा मित्र परदेशातून आला म्हणून गेलो उत्साहात भेटायला. आज त्याच्याच नावाने खडी फोडत बसलोय ह्या चार भिंतींच्या तुरुंगात, काय बरं म्हणतात त्याला ते विलगीकरण कक्ष. आजपर्यंत आपण काय केलं! सगळा माल मेड इन चायना चा. चार हाणा पण मेड इन चायनाच म्हणा सारख. दर वेळी आम्ही कुरकुर करणार कि माल खराब मिळतात पण तरीही वापरणार त्यांचाच माल . आज काय झालं बघा ना त्याच चीनवर आपल्याला बहिष्कार घालावा लागला. ज्या ज्या देशांचं आपण मोठे देश म्हणून कौतुक केलं त्यांच्याच देशातले मृतांचे आकडे पाहून आज आपण भयभीत होतो. आपण सगळे पाश्चात्य संस्कृती म्हणजे आपल्या जुनाट पौराणिक संस्कृती पेक्षा कैकपटीने चांगली असं समजतो. आज अख्ख जग नमस्ते म्हणत भारतीय संस्कुतीचं स्वागत करतंय. मित्रांनो कोणीतरी म्हणून गेलय कि तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी ते आता पटत.


तुम्हाला वाटत असेल ह्या म्हाताऱ्यासारखं सुखी कोणी नसेल , निवांत झोपलाय, सरकार खायला देतंय फुकट, वर माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी वेगळीच . बरोबर ना? तुम्ही म्हणताय तेही काही चुकीच नाही पण इतक्या सुविधा ठेवून मानसिकता थोडीच बदलणारे . मी माझ्या आयुष्याची वाट लावून घेतली हि गोष्ट नेहमी मनात घर करते आता. संत बोलून गेले आहेतच कि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. झाड कापली, घरं बांधली, गगनचुंबी इमारती बांधल्या आणि दाखवून दिला विकास. पण हा खरा विकास आहे का रे? दिवसभर स्वतःचा विकास करण्यासाठी वेळ, आरोग्य, निसर्ग ह्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आपल्या सगळ्यांना घरात कोंडून घ्यावं लागतंय. त्यानिमित्ताने का होईना पण घरातील सदस्यांचा संवाद वाढला हि गोष्ट समोर येते. पण आपणच केलेल्या चुकांचा फटका किती महागात पडतो बघा ना. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक कृतीत विज्ञान आहे, धार्मिकतेचा अभ्यास केला तरी त्यातूनही वैज्ञानिक दृष्टीकोनच समोर येतो. काही अनिष्ठ प्रथा-अंधश्रद्धा सोडल्या तर प्राचीन संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे. मित्रांनो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा कि ‘ विकास करील भकास ‘. आपल्या कल्पनेप्रमाणे आपण विकासाची खूप चुकीची व्याख्या केली आहे ती म्हणजे ‘ नैसर्गिक संपत्तीचा वापर मानवाचा सुखसोयीकरिता करून निसर्गाला संपवायचं.’ निसर्ग आपल्याला खूप मदत करतो त्याची शक्ती अफाट आहे ,पण मेरे शक्तीयोन्का गलत इस्तमाल हो रहा है हा क्रिश पिक्चर मधला डायलॉग इथे अगदी बरोबर बसतो. निसर्गाकडे असलेल्या शक्तीचा वापर आपण चुकीच्या पद्धतीने केला. आणि आता तो भोगवा लागतोय . ह्यालाच तर म्हणतात निसर्गनियम, तुम्ही जे करता ते पुन्हा तुम्हालाच भोगावा लागतं.


बर! एवढ सगळं निसर्ग दाखवतोय , कोरोना जगभर महामारी आणतोय आता तरी सुधाराल कि नाही !काय रे ह्या माणसाचं करायचं तरी काय!!! आपले लाडके माजी राष्ट्रपती डॉ कलाम त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात adversity always presents opportunity for the introspection म्हणजे संकट सुद्धा आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी देतं. हीच ती वेळ आहे मित्रांनो आपल्या चुका सुधारण्याची. ह्या संकटातून वाचायचं असेल तर जीवनशैलीत बदल करण्याशिवाय गत्यंतर नाही. हे मी नाही निसर्शाक्तीलाच आपल्याला हे सूचित करायचं आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या बहिणाबाई सुद्धा सांगतात कि आधी हाताले चटके मग मिळते भाकर. पण हे आता आपल्या अती सुशिक्षितांना कोण सांगणार. मी आपलं परदेशातून आलेल्या मित्राला बघायला म्हणून गेलो आणि वाट लावून घेतली स्वतःची. तेव्हा कोरोनाची बातमी पण नव्हती. त्यामुळे मी एवढ्या मोठ्या गर्तेत अडकलो जाईन ह्याची पुसटशी कल्पनाही नव्हती आली. पण आता येतायत ना बातम्या समोर ,आता तरी सुधारुया ,पण कसलं काय कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच.


आजपर्यंत आम्ही ज्या सरकारला नाव ठेवली ज्या शासकीय यंत्रणांना बदनाम समजलं आणि बदनाम केलं, तिच सगळी यंत्रणा डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करतीये. तुम्हा-आम्हा सामान्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करतीये. ppe किट्स नसताना सुद्धा डॉक्टर माझी विचारपूस करून जातात. सरकारचे कष्ट जेव्हा टी.व्ही. वर बघतो ना तेव्हा वाटत मीच चुकलो , मी चुकलो आपल्या यंत्रणेला ओळखायला मी चुकलो सरकारला दोष देताना .


असो उशिरा का होईना पण जाग आली , पण बाकिंच्यांच काय .शिका रे काहीतरी शिका . माझ्या बासष्ट वर्षाच्या ह्या आयुष्यामध्ये असा गंमतीदार रोग मी बघितलाच नव्हता. बघा ना आधी हा रोग सर्दी खोकल्यासारखा कोणालापण होत नाही , फक्त एखाद्या कोरोनाग्रस्त रुग्णाबरोबर संपर्क आला तरच होतो. आणि याहून महत्त्वाचं म्हणजे सोप्पा आणि स्वस्त असा उपचार. उपचार कायतर घरी बसून राहा १४ दिवस. खर्च एक रुपया पण नाही. अहो म्हणजे कोरोना पेक्षा सर्दी वाईट असच म्हणावं लागेल. असो पण हा हाहाकार पसरला फक्त निष्काळजी पणामुळे हे ह्यावरून सिद्ध होतं. सरकारने पहिल्यांदा जनता कर्फ्यू जाहीर केला ,सगळे म्हणाले यशस्वी झाला सुद्धा पण छे! पूर्ण नियोजन फसलं सरकारचं. २२ तारखेला खरच कोणी बाहेर पडलं नाही. अरे पण २१ आणि २३ चं काय. जत्रेला सुद्धा नसते एवढी गर्दी केली सगळ्यांनी . दिवाळीला विकत घेतात तसं पोती भरून दुकान घरी न्हेली आणि ह्या गर्दीतच जनता कर्फ्यूच्या उद्देशाचे तीन तेरा वाजवले. टाळ्या नि थाळ्यांबद्दल करावे तेव्हडे कौतुक कमीच . नंतर आपल्या सरकारने लॉकडाऊन जारी केला, खर तर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जनतेनेच सहकार्य करण गरजेचे होत. पण झालं भलतच लॉकडाऊन नंतर सुद्धा सरकारी यंत्रणांचं कोणीच ऐकायला तयार नाही. मला तर कळतच नाही सरकार आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठीच करतंय ना मग ऐकुया ना त्याचं , का मांडून ठेवायचा म्हणतो मी हा उच्छाद. सरकार ज्या जनतेसाठी करतंय ती जनता काय करतीये हे रोज टी व्ही वर बघून खरच डोळ्यात पाणी येतं. त्या दिवशीची ती मुलुंड टोलनाक्यावरची दाखवलेली ती गर्दी, बापरे! देवाला सुद्धा पश्चात्ताप होत असेल मानवाला बुद्धी दिल्याचा. रोज पोलिसांना खोटी कारण सांगून भटकत बसायचं, उगाच भाजी मार्केट मध्ये गर्दी करायची पोलिसांवरच हात उगारायचे, डोक्टर-नर्स ह्यांना छाळायचं काय हे काय मिळ्त ह्यातुन. त्यात ते बिचारी पोलीस असो डॉक्टर असो वा त्या नर्सेस. स्वतःच्या जीवाची बाजी लावून काम करतात हे काही पाप आहे का म्हणून त्यांना छळायला. लाज वाटली पाहिजे ह्या नराधमांना .आता तरी सुधारा . करा आत्मपरीक्षण.



बास खूप झाल हेच... मुलांनो तुम्हीच देशाच भवितव्य आहात . बदला स्वतःला आणि बदला ह्या मानसिकतेला. विवेकाच भान ठेवा आणि सत्कार्याचे पाईक बना . ह्या इमारती बांधून नाही रे कोणाच भलं होणार . चला पुन्हा संस्कृतीच्या मुळाशी जाऊया .पुन्हा आपली पाऊले गावाकडे वळवू, शेती करूया ,झाडे लावूया , कष्टाची फळे चाखूया. रानात हिंडू फिरू , निसर्गाशी नाळ जोडू ,पक्षांना पुन्हा बोलावू ,नदीत पुन्हा डुबक्या मारू, तेच जुने दिवस पुन्हा जगू. फक्त स्वताःसाठी नाही रे बाळांनो ह्या लाल- काळ्या धरणी मातेसाठी . जिच्यामुळे आज आपण जगतोय त्याच आईसाठी जीवन बदलू. चला खूप काही बोललो तुम्हाला ओवरडोसच झालं असेल पण एकदा ह्या अनुभवी म्हाताऱ्याच्या बोलण्याचा विचार करून बघा फक्त. तुम्हाला खूप पैसा असलेला हा विकास हवाय कि आयुष्यभर तुम्हाला खुश ठेवणारा निसर्ग. निर्णय तुमच्याच हातात. मानव जात टिकवायची असेल तर निर्णय विचारपूर्वक घ्या. बाकी माझं बघू किती दिवस राहतोय. तुम्ही ठणठणीत आहात ना मग काळजी घ्या आरोग्याची ....हेही दिवस जातील ...धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल बाय बाय...




Rate this content
Log in