मास्क
मास्क
थंडगार वातावरणातील एक सुंदर सकाळ होती. मी सातच्या आसपास सायकल घेऊन शाळेला निघाले होते.घरापासून थोडं दूर आले की काहीतरी विसरल्यासारखं झालं. नेमकं काय विसरलं होतं हे आठवत मी पुढे जात राहिले. मग डोक्यात प्रकाश पडला, अरेच्चा, आज तर मास्क घालायचा राहिला ! नंतर मी विचार केला की मान्य आहे सध्याच्या या कोविडच्या परिस्थितीमध्ये मास्क घालणं अपरिहार्य आहे; पण कोण कुठला तो चीन देश त्याने पसरवलेल्या रोगापासून वाचण्यासाठी आपल्याला या मास्कची इतकी सवय झाली आहे की इच्छा नसली तरी मास्कची उणीव ही जाणवतेच.
आमच्यासारख्या चष्मा वापरणाऱ्या लोकांना तर या मास्कचा शोध लावणाऱ्याचा अक्षरशः जीवच घ्यावासा वाटतो. ही भावना चष्मा वापरणाऱ्या वाचकांना नक्कीच कळली असेल. पण त्याला काही पर्यायच नाही ना. मास्क हा घालावा तर लागेलंच. म्हणजे पहा ना, मास्कचं न् माझं जमेना पण मास्कवाचून तर काहीच जमेना! तरी सध्या लसीकरण सुरू झाल्यामुळे जरा रस्त्यावर खाकी रंग दिसेनासा झालाय. नाहीतर काही दिवसांपूर्वी तर मास्क न वापरणाऱ्यांना पोलिसांचा लाठीचार्ज असायचा.
पण मास्क का वापरायचा? कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी? माझं तर यावर ठाम मत आहे - 'नाही'. मास्क वापरायचा कारण तोंड लपवायचंय! खरंतर आपण माणसं निसर्गाला तोंड दाखवायच्या लायकीचेच कुठे राहिलोय? कोणी नोटीस केलंय की नाही माहीत नाही पण मी तर नोटीस केलंय की निसर्गाने फक्त माणसालाच मास्कची शिक्षा दिली आहे, इतर प्राण्यांना नाही. कारण निसर्गाला सर्वाधिक त्रास आपणच तर दिलाय!
सध्याची परिस्थिती पाहता ही विश्वाच्या उत्पत्तीनंतरची पहिलीच घटना असावी कदाचित. कारण यापूर्वी प्लेग आला, स्वाइन फ्ल्यू आला; पण सध्याइतका कहर कधीच माजला नव्हता. 'भारतात लाॅकडाऊन' कधीच झाला नव्हता. फक्त डाॅक्टरांपुरता मर्यादित असणारा मास्क सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत कधीच गेला नव्हता. पण अनफाॅर्च्युनेटली हे सगळं घडलं आहे. पण कोणामुळे? कोणामुळे काय, नक्कीच आपल्यामुळे! आपण स्वतःच स्वतःवर मास्कची शिक्षा ओढावून घेऊन स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.
काहीही असो... लवकरच परिस्थिती बदलेल अशी आशा करू या आणि पुन्हा कधी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्नही...