माझे वडील माझा आनंद
माझे वडील माझा आनंद
माणूस म्हणतो मला येथून ऊर्जा मिळते,ताकद ,बळ शक्ती ,हवं तर आधार म्हणा ते असतात आई वडील,पंरतु प्रेमाने झाकलेली ही शक्ती माणसाच्या कधी लक्षात येतच नाही,आपला जन्म झाल्यापासून आपले पालनपोषन आपले आईवडील करतात,आपणही तेच करतो आपला दोन तीन वर्षाचा मुलगा/ मुलगी आपणास अगदीच पाच मिनटे आपणास दिसली नाही तर, माझा बाळ कोठे आहे ? म्हणून आपण याला त्याला सर्वानाच विचारतो. आणि आपला जीव घाबरून जातो.याचा अनुभव आपणास आईवडील झाल्यानंतर प्रकर्षाने येतो.
माझे वडील माझ्यासाठी एक आनंदाचा माझ्या जीवनाचा ठेवा होता.साधरणतहा मुले म्हणतात माझ्या वडीलांनी मला मारपीट केली मला शिक्षा केली. सामान्यपणे वडीलांविषयी असे ऐकवायास मिळते.तेव्हा माझे वडील माझ्या समोर जसेच्या तसे उभे राहतात. माझ्या वडीलांनी मला कधी शिक्षा किंवा मारपिट केल्याचे माझ्या आयुष्यात मला आठवतच नाही,नव्हे नव्हे त्यांनी मला रागवल्याचेही आठवत नाही.म्हणजेच मी चुकलो असलो तरी भाऊंनी मला सहन केले होते,माझे प्रबोधन आपल्या कला गुणांनी केले.
भाऊंची वेशभूषा घोळदार धोतर पांढरा सदरा, सुंदर पटका बांधण्याची कला आणि विशेष म्हणजे हसरा आणि आनंदी चेहरा,तसे माझे वडील हडाचे शेतकरी , गावातील लहानथोर मंडळी त्यांना भाऊ म्हणून हाक देत असत, आम्ही चार भावंडे त्यांना भाऊच म्हणून बोलत असत त्यांच्या सोबत घालवलेले आनंदाचे क्षण मोजणे शक्य नाही, त्यांच्यासोबत माझे पूर्ण जीवनच आनंदी झाले म्हणून ते होतेच माझ्या जीवनात आनंद देणारे माझे पिताश्री भाऊ. त्यांच्याशी संवाद म्हणजे मेघ भरुन यावे आणि कोकीळ पक्षास कंठ फुटावा असे होते. माझे भाऊ.आनंद देणारे आनंद घेणारे.
ते एक शेतकरी होते. त्यावेळेस शेतीचे यांत्रिकीकररण आजीबात नव्हते, सर्व शेतीची कामे बैलाद्वारे चालत असत, भाऊंनी पेरलेले शेत शेजारी पहाण्यासाठी येत असत, फूलपट्टीने रेष ओडल्यासारखी भाऊंची पेरणी असे.भाऊ म्हणत पेरणीचे तास सरळ घातले म्हणजे पूढे कोळपणी छान होते, नसुते तन उलटून जाते धान निघत नाही.त्यांना शेतीत तन झालेले कधी सहन झाले नाही, ते लगेच कोळपणी खुरपणी करुन घेत असत,
साधरणतहा १९७० व पूढे त्यांचा काळ मला चांगलाच आठवतो गोठ्यात दोन बैल दोन गाई,एक म्हैस हमखास असे.ही जनावरे ते नेहमीच ताजीतवाणी ठेवत.घरी दूध, दही, ताक बनवत होते.त्याकाळी दूध विकले जायचे नाही. गावातील लोक ऐकमेकांना ताक दही फूकट देत असत *,कृतीतून प्रेम निर्माण होते* ,असे भाऊ म्हणत, म्हणून *आपली कृती चांगली असावी* असे ते म्हणत, त्यांना भजन भारुडे ऐकणे गाणे,विनोद करणे अशा सवयी होत्या,इंग्रजांचा काळ त्यांनी अनुभवला, ते भाषण खूप चांगले करायचे,महात्मा गांधीवर बोलायचे, म्हणून १५ आँगस्ट २६ जानेवारीला भाऊंचे भाषण ठरलेले असे.गावातील लोक भाऊंचे भाषण ऐकून उत्साही होत असत, म्हणून माझे पिता भाऊ यांच्याविषयी खूप स्वाभिमान आहे.
भाऊंचे धार्मिक जीवन अतिशय सरळ सोपे साधे होते, त्यांनी अंधश्रद्धा कधीच बाळगली नाही. ते म्हणत आपलं नित्य कर्म शुद्ध करावे,
चहाडीचुगली करु नये. दिवसभर शेत राखावे काम करावे सकाळ संध्याकाळ हनुमानाचे दर्शन घ्यावे.
आणि मुखी राम बोलावे,सत्य चालावे,
बोलावे तसे करावे, हा मोठा यज्ञ आहे.
हे मोठे पूण्य कर्म आहे.असे भाऊ अनुभवत असत, शिकवत असत. भावाभावाने भांडण करु नये,भरत लक्ष्मणासारखे भावाशी असावे हेच खरे अध्यात्म आहे.आनंद देवा घ्यावा,
आनंदाचे निर्माते आपणच आहोत, सणासुदीला प्रेम धरुन भेटावे त्यामुळे समाज एकसंघ राहतो.कधी मत्सर कोणाचा न करावा, मत्सर आपलेच शरीर खराब करतो. अशी भाऊंची शिकवण असे.भाऊ माझे आनंदाचे ठेवा होते.
भाऊ जूनी इयत्ता चौथी शिकले होते. वाचन लेखन उत्तम होते. उजळणी पावकी निमकी म्हणत असत, त्याकाळी क्यालक्यूटर,संगणक साधने नव्हतीच बुद्धीचा वापर होत असे.
भाऊंचे पहाटे उठणे,सर्वाश्रुत होते,
नित्य उपयोगी कामात शरीराचे आरोग्य राखावे, त्यासाठी वेगळा व्ययाम आवश्यक नाही.राष्ट्रसंत तूकडोजी महाराज आणि त्यांचा ग्रामगिता हा ग्रंथ भाऊंनी आपल्या जीवनात आदर्श मानला.
भाऊंना जवळजवळ ९७ वर्षाचे "आयुष्य लाभले.
स्टोरीमिरर आपणाकडून माझे वडील भाऊ यांच्यावर लिहीण्याची संधी प्राप्त झाली.
धन्यवाद .