जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष
"जीवन आहे एक रम्य पहाट
संकटानी गजबजलेली एक वादळवाट "
हो खरंय, आपल्या जीवनातील रम्य पहाट म्हणजे आपल्याला देवाने मानवी रूपात जन्माला घालून दिलेले एक वरदान. आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जगण्यासाठीचा संघर्ष, ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष, ती ओळख टिकवण्याचा संघर्ष या गोष्टींनी भरलेली, गजबजलेली एक वादळवाट म्हणजे जीवन.
पण मग या जीवनातील संघर्षाच्या संकटांना घाबरून चालणार नाही; भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातल्या आपल्या कर्तृत्वावर विश्वासाने पाय खंबीर ठेवून मिळवलेला आनंद हा कस्तुरीपेक्षाही अधिक मौल्यवान ठरतो.
श्री समर्थ रामदास म्हणतात, 'यत्न तो देव जाणावा!' याच यत्नदेवाची आराधना करून,निष्ठेचे फूल वाहून आयुष्यात प्रत्येक संघर्षावर मात करत यश संपादन करणाऱ्यांचे आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत -जसे उदाहरणार्थ हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज, रामशास्त्री प्रभुणे ख्यातनाम न्यायमूर्ती, आधुनिक काळातही लोकमान्य टिळक,महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,अथक प्रयत्नांनी विविध शोध लावणारे संशोधक. या सर्वांनी यत्नदेवाची उपासना करूनच आपली मनोकामना पूर्ण केली.
यशस्वी आयुष्याचा प्रवास करायचा असेल तर दुःखाचे डोंगर कोसळतील आणि सुखाचे पडणारे हळुवार चांदणेही अनुभवायला मिळतील.म्हणून आयुष्याच्या मावळतीपर्यंत म्हणजेच मृत्यूपर्यंत जीवनातील संघर्षाला न घाबरता लखलखण्याची जिद्द ठेवावी आणि किर्तीरुपे उरावे.
शेवटी म्हणवासं वाटत की-
"सूर्यास्त तर आहेच
आयुष्याचा ठरलेला
आनंदाने पार करावे
जीवनाच्या संघर्षाला"
